Sunday, 30 March 2014

वंगरंगी रंगले मी

 मागच्या ' वर्षा' अंकात आपण बोलत होतो ते पावसाविषयी आणि कवींविषयी. मग तोच धागा धरून बंगालातल्या कवींविषयी लिहायचे ठरवल्यावर सर्व प्रथम नाव आठवले ते कवी जयदेवाचे. 
कवी  जयदेवांच्याच लेखणीतून  अवतरले आहे  राधाकृष्णाच्या भक्तीची अनेकविध रूपे साकारणारे महान काव्य,"गीत गोविंद".कृष्णभक्तीने प्रेरीत होऊन, कृष्णचिंतनात तल्लीन होऊन एका वेगळ्याच भावावस्थेत जयदेव असायचा व त्याच भावावस्थेत त्याने गीत-गोविंद लिहिले असे म्हणतात.
जयदेवाचे जन्मस्थान केंदूली हे ओरिसातले केंदूली की बंगालातले ह्यावर वाद चालू आहे. त्याच्या जन्मस्थानाविषयीचा वाद काहीही असो, बंगालात जयदेव अत्यंत प्रिय आहे. बंगालातल्या केंदुलीला दर मकर संक्रांतीला जत्रादेखील भरते, जी प्रामुख्याने बाऊल कलाकारांसाठी प्रसिद्ध आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या वासूदेवाप्रमाणेच ही बाऊल परंपरादेखील नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे
 कोलकाता मुक्कामी आल्यावर एका मेट्रो स्टेशनच्या नावाने माझे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे कवी नझरूल. शिवाय एका रस्त्याचे नावही दिसले काझी नझरुल इस्लाम. १८९९ मधे एका गरीब मुस्लीम घरात जन्मलेला हा मुलगा. धार्मिक शिक्षण  त्यांनी घेतले होते, पण काव्य, नाट्य, साहित्य, संगीताशी त्यांचा संबंध आला तो नाटक कंपनीबरोबर काम करताना. पुढे ब्रिटिश सरकारची काही काळ चाकरी देखील केली. मग ती नोकरी सोडून देऊन कोलकाता येथे पत्रकार होण्याचे त्यांनी ठरवले. ब्रिटिश सरकारच्या जुलुमांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या कवितांमूळे विद्रोही कवी असा जनमानसाकडून किताब मिळाला आणि त्याचवेळी ब्रिटिश सरकारने अनेकदा लादलेला कारावासही सोसावा लागला. त्यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आजही " नझरुल गीती  " ह्या नावाने प्रसिद्ध आहेत. लघूकथा, कादंबरी, निबंध आदि अनेक प्रकारचे लेखन केले असले तरी त्यांची प्रामुख्याने ओळख कवी नझरुल हीच राहिली. बंगाली गझल हा नवा काव्यप्रकार त्यांनी लिहिला
दुर्दैवाने.तरूण वयातच त्यांना एका असाध्य रोगाने पछाडले आणि वाचा व स्मृती गमवावी लागली. अगदी शेवटी बांगला देश सरकारच्या निमंत्रणावरून ते बांगलादेश मधे वास्तव्यास गेले व तिथेच त्यांचे निधन झाले.
जे कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत आणि तरी त्यांच्या एका कवितेला त्या कादंबऱ्यांपेक्षाही अमाप प्रसिद्धी मिळाली, एवढेच नव्हे तर स्वातंत्र्यलढ्यात त्या  कवितेने मंत्राचे काम केले, त्या वंदे मातरम चे लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हेही बंगालचेच. एक कविता काय करू शकते, कसा इतिहास घडवू शकते ह्याचे वंदे मातरम ’ हे समर्थ उदाहरणच आहे.

          हे सर्व कवी प्रसिद्ध असले तरी  बंगालवर ज्या कवीची नाममुद्रा उमटली आहे ते म्हणजे कवीकुलगुरू रवीन्द्रनाथ ठाकूर. असा कर्तृत्ववान माणूस तर खरोखरीच विरळाच.काव्य, कथा, कादंबरी, नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला, शिक्षण साऱ्याच क्षेत्रांत गती असलेला आणि तरीही ज्याचे कवीपण ह्या साऱ्यांतून झळकत रहाते असा हा कवी. खुद्द रवीन्द्रनाथांनीही माझा धर्म कोणता असे विचाराल तर तो कवीचा धर्म आहे असे म्हटलेले आहे.
     कोलकाता येथे अनेक रस्त्यांना, इमारतींना, मेट्रो स्टेशनला रवींद्रनाथांचे नाव दिलेले आढळते. त्यांचे वंशपरंपरागत घर असलेल्या कोलकाता येथील ’ जोराशंको ठाकूरबारी ’ ह्या वास्तूत रवींद्रनाथांचा जन्म झाला. आता त्या भव्य इमारतीत रवींद्रभारती विद्यापीठ व संग्रहालय आहे.
     रवीन्द्रनाथांचे ’ शांतीनिकेतन ’ हे तर जगभरातल्या लोकांना मोहवणारे एक महाकाव्यच. शांतीनिकेतनाविषयी मी  इतके सारे वाचले होते, ऐकले होते की तिथे प्रत्यक्ष  जाणे हा केवळ, फक्त एक उपचार उरला आहे असे वाटत होते. तसेच  एखाद्या गोष्टीविषयी खूप ऐकलेले असावे आणि प्रत्यक्षात मात्र भ्रमनिरासच व्हावा, असे शांतीनिकेतनच्या बाबतीत तरी  होऊ नये अशी मनोमन प्रार्थना करीतच शांतीनिकेतनाला जायला निघाले. 
      वैश्विकीकरणाच्या रेट्यामूळे बाकी सगळ्या महानगरांसारखेच  बनू पहाण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असलेले कोलकाता तोपर्यंत माझ्या ओळखीचे झाले होते. मॉल्सच्या शिळ्या, थिजलेल्या थंडगार हवेत फिरताना ह्या प्रदेशाची  ही ओळख फार वरवरची व अपूरी आहे, खरा बंगाल तर आपल्याला अजून भेटलाच नाही अशी रुखरुख सतत मनात होती. 
     कोलकात्यापासून २०० कि.मी. अंतरावर असलेल्या शांतीनिकेतनाला जाण्याचा रस्ता मात्र ह्या रुखरुखीवर चंदनलेप लावून गेला. ग्रामीण बंगालचे सुखद रूप पहायला मिळाले. खरे तर ह्या वर्षी  बंगालातील काही जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. पाण्याअभावी करपलेली रोपे पहायला लागणार की काय ही आशंका मन कुरतडत होती.
     पण माझ्या भाग्याने मला पुन्हा एकदा योग्य वेळी योग्य ठिकाणी नेले होते. नुकत्याच झालेल्या पावसाने हिरवीगार दिसणारी झाडे, भाताच्या लवलवत्या शेतांनी दिलेले नव्या नव्हाळीचे हिरवेपण, अधून मधून आढळणारी केळीची बाग वा आमराई, ताडाची व नारळाची झाडे, शाकारलेली घरे, सतत सोबत करणारी अनेक छोटी छोटी तळी, निवांत चरणारी गूरे, शेतात, पाण्यावर, गूरांच्या पाठीवर बसलेले पक्षी.सारेच जणू स्वप्नवत होते.  कुठल्यातरी दूसऱ्याच जगातले असावे तसे आणि ह्या जगातले सारे व्यापताप विसरायला लावणारे होते.
ह्या प्रवासात नव्याने पहायला मिळाली ती तागाची शेती. ह्या परिसरात तागाचे सगळी रूपे व अवस्था पहायला मिळाल्या. लवलवत्या सुकुमार सडपातळ तरूणीप्रमाणे  तागाचे रोप असते. झाडांच्या जमातीतील ताग ही झिरो साईझवाली अभिनेत्री असावी! एका विशिष्ट उंचीपर्यंत वाढताच ती रोपे  कापून ,पाण्यात भिजवून ठेवतात. ह्यासाठी शेताच्या कडेकडेला खाचरे करून पाणी साठवलेले असते. ती बराच काळ भिजल्यावर म्हणजे जवळपास कुजल्यावर, त्यातून हाताने ओरबाडून त्याची साल काढतात व मधल्या कडक काठ्यांच्या मोळ्या बांधून उन्हात वाळत ठेवतात. जी साल निघालेली असते ती कापडाप्रमाणे दोरीवर, कुंपणावर वाळत ठेवतात. त्यातूनच तयार होतो रेशमाप्रमाणे चमचमणारा ज्यूट. त्याचे मोठाले गठ्ठे बांधून मग तो रवाना होतो. अक्षरश:  प्रत्येक भागाचा उपयोग होत असल्याने ही झाडे म्हणजे शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्षच. शाळेत असताना गाळलेल्या जागा भरा ह्या प्रश्नातील , {भारतातील तागाची सर्वात जास्त लागवड ----- ह्या राज्यात होते },त्याच राज्यात मी प्रवास करीत होते व तागाची लागवड प्रत्यक्ष पहात होते !
अशा सुंदर रस्त्यांवरून प्रवास करीत करीत आपण शांतीनिकेतन व श्री निकेतन परिसरात पोचतो.रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी साधी, देखणी घरे, अंगणात उभारलेली शिल्पे, सृजनचे  प्रवेशद्वार, सुगंधाची लयलूट करणारे वृक्ष आपल्याला आपण कलावंताच्या जगात प्रवेश करतो आहोत ह्याचा प्रत्यय देत रहातात. एक मातीचे छोटेसे घर आपले लक्ष वेधुन घेते. त्याच्या छपराच्या मधोमध तालवृक्षाचा शेंडा डोकावत असतो. झाडांवर प्रेम असल्याने, झाड तसेच ठेवून त्याच्या भोवती आपले घर बांधणाऱ्या तेजेशचंद्र सेन ह्या शांतीनिकेतनातील पहिल्या पिढीच्या शिक्षकाच्या रसिकतेला आपण मनोमन दाद देतो.

पूढे गेल्यावर झाडांखालच्या वर्गांच्या जागा दिसतात. अजूनही शाळेचे वर्ग तिथेच भरतात. शिक्षकांसाठी एक छोटा चबूतरा आणि विद्यार्थी त्यांच्या भोवती बसतात. विद्यार्थी व शिक्षकांची आसने मिळून एक वर्तुळाकृती पूर्ण होते. ह्यावर्गांवर सावली ढाळत उभे आहेत ते बकूल व आम्र वृक्ष. ह्या भागाचे नावच मूळी बकूळविथी व आम्रविथी असे आहे. विथी म्हणजे रांग. वर्गात विद्यार्थी अभ्यास करत आहेत. नजर जाईल तिकडे त्यांना भव्य वृक्ष दिसत आहेत. वाऱ्याच्या एखाद्या झुळकीबरोबर आकाशातून बकूळपुष्पे तरंगत खाली येत आहेत. हे कल्पनाचित्रदेखील किती सुखावणारे आहे ना !

        
शांतीनिकेतनाचे स्वप्न रवींद्रनाथांनी पाहिले तेच मूळी भारतीय संदर्भ घेत, विश्वभरातले ज्ञान देणारी,बंदिस्त नसलेली अशी गुरू कूल पद्धतीची शाळा उभारायची हे मनाशी पक्के करून. शांतीनिकेतनाच्या अनेक गुणवान विद्यार्थ्यांपैकी आपल्या सगळ्यांनाच माहिती असलेली नावे म्हणजे सत्यजित राय, अमर्त्य सेन व वर्ष /दोन वर्षे तिथे शिकलेल्या इंदिरा गांधी. अमर्त्य हे नामकरणदेखील रवींद्रनाथांनी केले असे म्हणतात. अमर्त्य सेन ह्यांचे एक घर ह्या परिसरात आहे जिथे त्यांच्या मातोश्री शेवटपर्यंत रहात होत्या.
शांतीनिकेतनातील इमारतींची, रस्त्यांची,भागांची नावेदेखील रसिक व कवीवृतीची निदर्शक आहेत. सारीच नावे सुंदर व अर्थगर्भ.
विद्यापीठातील निरनिराळे विभाग पहात पहात आपण येऊन पोचतो, ’ उत्तरायणात. ’ उत्तरायण हा ठाकूर कुटुंबियांनी  निरनिराळ्या वेळी बांधवून घेतलेल्या व रवीन्द्रनाथांनी  वास्तव्य केलेल्या घरांचा समूह आहे.
सध्या तिथे उभ्या आहेत त्या उदयन, कोणार्क, श्यामली, पुन:श्च व उदिची ह्या वास्तू. विविध वास्तूशैलींच्या संगमाने बनलेले उदयन लक्षवेधक आहे. ह्याच वास्तूतून रवींद्रनाथ अगदी शेवटी बोलपूरहून कोलकात्यास उपचारांसाठी गेले. " कोणार्क " मधे एक प्रदर्शनी लावलेली आहे. ’श्यामली’ आहे कवीच्या स्वप्नातले मातीचे घर. ते काही वर्षांनी गळायला लागल्यावर नव्याने बांधलेली वास्तू ती "पुन:श्च ". "पुन:श्च " मधे कोंडल्यासारखे वाटायला लागल्यावर कवीला हवेसे वाटले ते खुलेपणाचा अनुभव देणारे ,चहूबाजूंनी क्षितिज दिसणारे घर,ते  झाले "उदिची "ही सगळी नावे कवीराजांच्या कवितासंग्रहांची नावे म्हणून आपल्याला माहिती असतात. ' उदिची ' च्या शेजारी आहे,कवीराजांचा हस्तस्पर्श व निगराणी लाभलेली मोठी व फुलांनी बहरलेली बाग.
         ह्या परिसरात आणखी एक केवळ साहित्यात वाचलेले,ऐकलेले सुखनिधान लाभले ते म्हणजे " माधोबी" (माधवी ) ची फुले व वेल  प्रत्यक्ष पहायला मिळाले हे. रवींद्रनाथांच्या कवितासंग्रहाचे नाव म्हणुन तसेच इतरही जुन्या साहित्यात माधवी ह्या फुलांचे नाव अनेकदा ऐकले होते. पण ती प्रत्यक्ष कधी पाहिली नव्हती.त्याचा मंद सुगंध अनुभवला नव्हता. ती माधवी भेटली ती कवीच्या वास्तव्याने पूनीत झालेल्या परिसरात व योगायोगाने ज्या वेळी सिगापूरात शब्द-गंध सुरू असणार होता त्याच वेळी. 
    तिथे जवळच ऑगस्ट आला तरी अजुनही फुलत राहिलेला बहावा भेटला. बंगालीतले त्याचे नाव म्हणे ’ बांदरलाठी ’  म्हणजे माकडाच्या शेपटीसारखे घोस असणारे. पण इतके रुक्ष नाव वापरतील तर ते बंगाली लोक कसले ! नक्की नांव विचारले नाही, पण साधारण तशाच प्रकारच्या आपल्या 'संकासुरा' ला ते म्हणतात,’राधाचुरा’ म्हणजे राधेचा केशसंभार !! राधेचे केस इतके कुरळ्या लटांचे व सुंदर  असतील अशी कल्पना करून त्या झाडाचे नामकरण करणाऱ्या रसिकतेला सलाम ! विविध  छटांच्या जांभळ्या फुलांचे घोस असणाऱ्या झाडाला म्हणतात ’जारूल’.तशाच प्रकारच्या गुलाबी फुलांच्या झाडाला 'गोलोपी' म्हणतात की आणखी काही ते मात्र  विचारायचे राहूनच गेले.
  त्याच परिसरात आहे  ’ विचित्रा ’ ही वास्तू. तिथे एक कायमस्वरूपी संग्रहालय तसेच वाचनालय आहे. मूळ नोबेल पारितोषिक गहाळ झाल्याने आता त्याची प्रतिकृती आपल्याला पहायला मिळते. त्या गहाळ होण्याविषयी ह्या लेखात काही न लिहिलेलेच बरे.
       शांतीनिकेतनातील सुविधा,व्यवस्था ह्या त्या काळच्या किंवा ५० वर्षांपूर्वीच्या शांतीनिकेतनाला योग्य अशाच आहेत.तिथेच विश्वभारती विश्वविद्यालय पण आहे.सरकार दरवर्षी करोडो रुपयांची मदत करते. तरीदेखील ह्या सर्व परिसराला डागडुजीची,सुव्यवस्थेची गरज आहे असे सतत भासत रहाते. जाताजाता दोन घटनांचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. 
    संग्रहालयाजवळच्या पुस्तकांच्या दुकानात गेले असताना पूर्ण दुकान अस्ताव्यस्त होते.हे कशामूळे असे विचारले असता,तेथील विद्यार्थ्यांनी केले असे तो कर्मचारी म्हणाला .गेले दोन महिने फी वाढीविरुद्ध विद्यार्थी आंदोलन तिथे चालू होते. तसेच विश्वभारतीचा मानबिंदू व खासियत असलेला वसंतोत्सव यावर्षी विद्यार्थ्यांच्या निदर्शनांमुळे होऊ शकला नाही हे  ही आपल्याला माहिती आहेच.
      का होते आहे हे सारे? विद्यार्थ्यांच्या मागण्यांत काही तथ्य आहे की राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपामूळे हे सारे होते आहे? याला अनास्था जबाबदार आहे की भ्रष्टाचार? ह्याविषयी पुन्हा कधीतरी बोलू या.असो.
   तेथील संग्रहालयात रवींद्रनाथांची छायाचित्रे,त्यांच्या उपयोगात असणाऱ्या वस्तू तसेच त्यांनी काढलेली चित्रे,ते वाजवत होते ती वाद्ये एवढेच काय त्यांनी केलेले अप्रतिम लाकूडकाम,त्यांनी तयार केलेली पाठ्यपूस्तके हे सगळे तिथे आपल्याला पहायला मिळते. एक माणूस एवढा गूणवान कसा असू शकतो ह्याचा अचंबा परत परत वाटत रहातो. अवघ्या दीड शतकापूर्वी होऊन गेलेल्या व कर्तृत्वाचे  प्रत्यक्ष पूरावे असलेला हा चमत्कार पहाताना मन भारावून जाते.       
    रवींद्रनाथ तर कधीच बंगालच्याच काय पण भारताच्याही सीमा ओलांडून विश्वकवी बनलेले आहेत.पण .आत्ता  खुद्द बंगालात त्यांची किती जणांना माहिती आहे,त्यांच्या साहित्याचा परिचय आहे याची मला उत्सुकता होती.मी घरकामात मला मदत करण्यासाठी येणाऱ्या मुलीला विचारले की तुला ह्यांची कविता पाठ आहे का एखादी? तिला कविता पाठच काय पण  माहितीदेखील नव्हती.अर्थात शिक्षणाशी तिचा संबंधच आलेला नाही.त्यामूळे एखाद्या माहिती असलेल्या "गानाचे" कर्ते ते रोबीन्द्रोनाथच हे तिला माहिती असणार नाही.. साहित्य,कला ह्या सगळ्या भरल्या पोटी करायच्या गोष्टी आहेत हे खरे आहे की काय? खरेच हे  खरे असावे की काय?असा विचार मी करीत राहिले.
    नंतर मी तिला  विचारले,"तुला हे रोबिन्द्रो्नाथ ठाकूर कसे माहिती मग ?"तेव्हा ती उत्तरली,"टी.व्ही.वर त्यांचा फोटो दाखवतात ना?"त्यांच्या जन्माला १५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने इथे अनेक कार्यक्रमांचे आयोंजन सतत चालू असते..
  नंतर रविंद्र सदन व नंदन हा कला अकादमीसारखा साहित्य तसेच नाट्य,चित्रपटविषयक घडामोडींचा  परिसर बघत असताना, काही तरूण मूलींशी संवाद साधला.त्यांना रवीन्द्रनाथ किती माहिती आहेत,जवळचे आहेत ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्यांना अभ्यासात तर रविन्द्रनाथांची कविता,नाट्य उतारे होतेच .शिवाय आता आपापले  नोकरी व्यवसाय सांभाळून काही जणी रविन्द्र संगीत शिकत होत्या तर काहींनी रविन्द्र शैलीतील न्रुत्योनाट्यो चा अभ्यास केलेला होता. रविन्द्रनाथांच्या समग्र साहित्याचे वाचन करायचे आणि कलांचा आस्वाद घ्यायचा तर एक जन्म अपूराच अशीच त्या मूलींची भावना होती. मग घरी येणाऱ्रया इलेक्ट्रीशियन,प्लंबर,सुतार आदि मंडळींना रवीन्द्रनाथ किती माहिती आहेत ह्याचा शोध घेण्याचा उपक्रम मी सुरू केला. बऱ्याचजणांना एखादे रोबिन्द्रोगान पूर्वी येत होते. आता मुखोद्गत नसले तरी कोणी सुरुवात केली तर आपल्याला ते पूर्ण म्हणता येइल हा विश्वास होता.कोणी कधीतरी रोबिन्द्रोसंगीत ऐकलेले होते.ह्या सगळ्यांशी बोलल्यावर रवीन्द्रनाथ हे केवळ एक दंतकथा बनून रहाणार नाहीत व कलाक्षेत्रातील उच्चभृंची मक्तेदारी बनून रहाणार नाहीत,तर जनसामान्यांच्या जगण्यात ते झिरपत रहातील,विचारात फूलत रहातील हा दिलासा मिळाला.
       अर्थात रवीन्द्रनाथांमूळे त्यांच्या जगण्यात,विचारात कसा व किती बदल झाला,त्यांच्या आयुष्यावर किती प्रभाव पडला हे जाणून घ्यायचे तर मला ह्या कारागिरांशी संवाद साधता येणारी बंगाली भाषा शिकून घ्यायला हवी. तेव्हा तो प्रकल्प भविष्यकाळासाठी राखून ठेवला आहे ! 
    ठाकूर घराण्यात दत्तक गेलेले द्वारकानाथ म्हणजे रवीन्द्रनाथांचे पूर्वज.रवीन्द्रनाथ धरून त्यांच्या वडिलांना एकूण १५ मुले झाली. नियतीच्या अजब खेळाने आजमात्र  त्यांच्यापैकी कोणाचाही ,एकही वंशज आज हयात नाही.मूलींची मुले,नातवंडे  देखील नाहीत. त्यांचा संपूर्ण वंशच खुंटला असे आमचा मार्गदर्शक पुन्हा पुन्हा खेदपूर्वक सांगत  होता.मला त्याला म्हणावेसे वाटले ," ही सारी ग्रंथसंपदा,रोबीन्द्रोसंगीत, हे आहेच की वंशाचे  नाव चालवायला पूरेसे."
      नुकतेच मला असे कळले आहे की रवीन्द्रनाथ कोलकात्यात रहायचे ती जोराशंको ठाकूरबारी,विश्वनाथ दत्तांचे घर,( जिथे त्यांचा नरेन्द्र नावाचा मुलगा,जो पुढे विवेकानंद ह्या नावाने जगविख्यात झाला तो रहायचा) , शिवाय जगदीशचन्द्र बसू व प्रफ़ुल्लचन्द्र राय ह्यांची घरे हे सारे चालत चालत १०/१५ मिनिटांच्या परिसरात आहे. दोख्खिनेश्वर ही काही मग फार दूर नाही. शिवाय नावेत बसून गंगा ओलांडली की त्या तीरावर बेलूर आहेच. ह्या सगळ्यापासून थोडे दूर पण कोलकात्यामधेच नेताजी भवनही आहे. किती जादूई व भाग्यवान  माती असेल ती,जिथे अशा नररत्नांचे वास्तव्य झाले,त्यांचे कर्तृत्व  बहरले !.
    
        .
     
     

No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...