Wednesday, 26 March 2014

डू बाई डू

 

 "आज मी इथे आहे तो केवळ माझ्या आईमुळेच" ह्या वाक्यानंतर जितका कापरा आवाज, डोळ्यात पाणी दिग्दर्शकाने करायला सांगितले होते तेवढे करून महामहिम गुरुजींनी पॉज घेतला. श्रोतृवर्गावर कॅमेरा फिरला. अनेक डोळ्यातून अश्रू, रुमालांची हालचाल इत्यादी टिपल्यावर कॅमेरा परत महामहिम गुरुजींवर आला. 'तुम्ही मराठी' या चॅनेलच्या "डू बाई डू "ह्या कार्यक्रमाचे चित्रण चालू होते.

 खरी गोष्ट अशी होती की त्यांची आई अतिशय रागीट होती. एखादी छोटी जरी चूक झाली तरी ती कान पिरगळून खेचत न्यायची. आपोआपच एक हात कानाला धरून दुसरा हात आणि दोन्ही पाय ह्यांच्या प्राणाच्या आकांताने अशा काही वेड्यावाकड्या हालचाली व्हायच्या की बस रे बस!! जशी चुकांची संख्या वाढत गेली तशी ह्या प्रसंगाची व आपोआप होणाऱ्या नृत्याची संख्याही वाढत गेली. पण दिग्दर्शक म्हणाले की नृत्याच्या शिक्षणाविषयी हे असे नाही सांगता यायचे जाहीर मंचावरून. 

मग महामहीम गुरुजी कॅमेर्याकडे पाहत म्हणाले,"माझी आईच माझी नृत्याची प्रेरणा आहे. माझा रियाज नियमित व्हावा ह्या कडे तिचे नेहमीच काटेकोर लक्ष असायचे." प्रेक्षकानी टाळ्यांचा कडकडाट केला. 

तो कडकडाट थांबल्यावर मग निवेदकाने परत " ह्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजेत "सांगून प्रेक्षकाना पुन्हा एकदा टाळया वाजवायला लावल्या.

 " 'डू बाई डू ' हा कार्यक्रम अतिशय उत्तम आहे.मराठी गुणवत्तेला व नृत्यकलेला वाव देणारा आहे.एवढे सांगून मी सध्यापुरता थांबतो" महामहिम गुरुजींचे बोलणे संपताच निवेदकाने लगेच "तुम्ही मराठी" चे मालक हरीश पुंजानी ह्यांना कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याची विनंती केली. 

आता गेले दीड वर्ष चालू असलेल्या कार्यक्रमाचे आत्ता परत उद्घाटन का होते आहे असा प्रश्न कोणालाही पडला नाही. 'तुम्ही मराठी ' चानेल हमेशा मराठी संस्कृतीची जोपासना करायला वचन बध्द राहेल म्हणजे राहेलच. मायबाप प्रेक्षकांचा आणि स्पोन्सर्स चा आशीर्वाद मिलाला तर आम्ही काय बी करू शकतो. एवडे बोलून मी आजच्या कारेक्रामाचे उद्गाटन झाले असे जाहीर करतो."

लगेच " डू बाई डू " चे टायटल सॉंग वाजायला सुरुवात झाली.

 "डू बाई डू, डान्स डू

नव्या रिती पाडू,,

सारे नियम तोडू

 डू बाई डू डान्स डू "

त्या गीतावर नृत्य करत चारी मेंटोर चे आगमन झाले.ते नाचत नाचत गीतलेखक दिलशा कातील ह्यांच्या खुर्चीजवळ गेले व त्यांना पुष्पगुच्छ दिला. त्या वेळी चार शब्द बोलताना दिलशा कातील ह्यांनी आपले हे टायटल सॉंग लोकप्रिय केल्याबद्दल पब्लिकचे आभार मानले व ह्या गाण्याद्वारे असामान्य प्रतिभा दाखवल्याबद्दल आपल्याला अ.भा.भा..म.प. ने सन्मानित केल्याचे सांगितले. अ.भा.भा.म.प.चे म्हणजेच अखिल भारतीय भायखळा मराठी परिषदेचे पण त्यांनी जाहीर आभार मानले. एवढ्या सुरुवातीनंतर एक ब्रेक तो होनाही मंगता था..त्या प्रमाणे तो झालाच.

 डू बाई डू च्या ह्या पर्वातील हा २४ वा एपिसोड होता. महाराष्ट्रातील मुलांच्या नृत्यगुणाना वाव मिळावा, त्यांच्या कलेचा विकास व्हावा ह्या हेतूने हा कार्यक्रम सुरु झाला होता. त्याच्या नावापासूनच मराठीचे प्रेम व संस्कृती जोपासण्याची तळमळ दिसून येत होती. कार्यक्रमाला सुरुवातीपासूनच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता.

 'डू बाई डू ' च्या निवड फेरीची तयारी करून घेणारे क्लासेस जोरात चालू होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या तील, गल्लीबोळातील, छोट्या मोठ्या शहरातील मुले मुली ह्या कार्यक्रमाद्वारे झळकायला मिळावे म्हणून उत्सुक होती.

 पहिले चार एपिसोड निवड फेरीचे चित्रण झाले होते. त्यातून २४ स्पर्धक निवडले गेले होते.. प्रत्येक मार्गदर्शक ज्याला कार्यक्रमात मराठीमध्ये मेंटोर असे म्हणाले जायचे, ६ जणांना मार्गदर्शन करीत होता. पाचव्या एपिसोडपासून त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेले नृत्यप्रकार केले जात होते.दोन जण परिक्षक होते. ज्यांचा नृत्याशी कधीही संबंध आला नव्हता असे लोक मुद्दाम परीक्षक म्हणून येतील ह्याची काळजी घेतली गेली होती. सगळ्यात ज्येष्ठ महापरीक्षक म्हणजे महामहीम गुरुजी होते.

 प्रत्येक मुलाचा नाच, मग त्यानंतर निवेदकाचे असंबध्द बोलणे, मग परीक्षक स्वतःची जीवन कहाणी सांगणार, मग महामहीम गुरुजी चार शब्द म्हणून एक गोष्ट सांगणार, ह्यात मध्ये मध्ये टाळ्या, त्या नन्तर ब्रेक, मग दुसऱ्या मुलाचा नाच व परत हे सगळे चक्र असे करत २४ स्पर्धकांची एक फेरी पूर्ण होईपर्यंत आणखी ४ एपिसोड गेले होते. मग त्यातील २० मुलांना निवडले गेले.

 त्यानंतर विषय दिला गेला होता महाराष्ट्रीय शास्त्रीय नृत्य. ह्या मध्ये स्पर्धकांनी मेंटोर च्या सल्ल्याने झुम्बा, टॅंगो, हिपहॉप, जाझ असे मराठमोळे प्रकार सादर केले. काही स्पर्धकांनी हळूच आम्ही कथ्थक,भरत नाट्यम व कुचीपुडी करू शकतो का असे विचारले.

त्यावर त्यांना,"यु स्टुपिड,अरे ते काय मराठी प्रकार आहेत का?" असे उत्तर मिळाले. ह्यात परत ४ एपिसोड गेले.आता टी आर पी जरा कमी झाला होता. त्यामुळे मग ह्या नंतर २० पैकी १६ स्पर्धक निवडताना परीक्षकांच्या मतभेदांचा वग दिग्दर्शकांनी बसवून घेतला. 

प्रत्यक्ष कार्यक्रमाआधी सतत जाहिरात करून "काय होणार पुढे?" असे प्रेक्षकांच्या कानावर दिवसातून शंभरदा पडेल, ह्या मतभेदाच्या वगातील निवडक दृश्ये पाहायला मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली. त्याचा योग्य तो फायदा होऊन टी आर पी परत वाढला होता.

आता १६ जणांचा कसून सराव सुरु झाला होता. त्या सरावाचे चित्रीकरण, स्पर्धकांची राहण्याची जागा दाखवणे, त्यातील त्यांचे प्रेम व भांडणे दाखवणे ह्यात अजून २ एपिसोड गेले. कार्यक्रमाच्या ह्या गतीवर स्पॉन्सर्स फारच खुश होते.

आता मराठी वातावरण चित्रित करणारे नृत्य अशी फेरी होती. ह्यात मग कोंबडी पळाली, दे धक्का, हम को आजकाल हैं इंतेझार, मुंगडा ओ मुंगडा, चिकनी चमेली इत्यादी भावगीतांवर नृत्ये बसवली गेली. आत्तापर्यंत कार्यक्रम सुरु होऊन तसे पाहिले तर साधारण ४ महिनेच होत होते. पण कार्यक्रमातील १०-१५ वयोगटातील स्पर्धक मात्र ह्या चार महिन्यात कमीतकमी ५ वर्षे वय वाढल्याप्रमाणे नृत्ये करायला लागले होते. त्यामुळे ह्या ‘भाव' गीतातील 'भाव ' दर्शन त्यांनी फारच जाणकारीने केले. न राहवून, समाजाला परिपक्व करणारा कार्यक्रम म्हणून महामहीम गुरुजींनी एकदा कौतुक देखील केले.

ह्यानंतर 'तुम्ही मराठी' च्या मूळ उद्देशापासून कार्यक्रम भरकटत चालला आहे का अशी चर्चा वर्तमानपत्रात, विविध संस्थळांवर घडवून आणण्यात आली. त्यामुळे जे लोक हा कार्यक्रम आधी बघत नव्हते ते देखील उत्सुकतेने हा कार्यक्रम बघू लागले. चर्चेचा उद्देश सफल झाला. 

आता नृत्यात व भाव दर्शनात उत्तम तयारी असलेली १२ जणेच ह्या कार्यक्रमात उरली होती. मग एकदा त्यांना त्यांच्या गावाला नेऊन आणून व मंदिर,मस्जिद,चर्च,गुरुद्वारा अशा शक्य त्या सर्व धार्मिक ठिकाणी नेऊन आणून २ एपिसोड खर्च केले गेले व जनमत तयार केले गेले. कारण ह्या पुढच्या फेरीपासून एसेमेसद्वारे जनतेला विजयी स्पर्धकांची निवड करता येणार होती.

आता एसेमेस महत्वाचे असल्यामुळे दूरध्वनी कंपनीचे गिलानी शेठ मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत रस घेऊ लागले होते!!! 

एका बाम बनवणाऱ्या कंपनीने पण प्रायोजकत्व देऊ केले होते. त्यांची अट फक्त एवढीच होती की नृत्याच्या स्टेप्स अशा पाहिजेत की शरीराचे तमाम अवयव सर्व दिशांनी आणि सर्व कोनांतून हलायला पाहिजेत. म्हणजे मग त्याची नक्कल जेव्हा अगदी बालक मंदिरापासून ते कॉलेजपर्यंतच्या स्नेहसंमेलनापर्यंत, तसेच गणपती उत्सवापासून ते लग्न समारंभापर्यंत होईल तेव्हा बऱ्याच लोकांचे बरेच काही लचकले वा मुरगळले पाहिजे. तरच आमच्या बामचा खप वाढू शकेल. 

दिग्दर्शकांनी त्यांना सांगितले," तुम्ही काळजीच करू नका हो अजिबात.अहो, सुरुवातीच्या एपिसोड मध्ये गणेश वंदनेला देखील मुलांनी एवढे लचके झटके केले. आता तर काय शेवटच्या व महत्वाच्या फेऱ्या आल्या आहेत. आता जोरदार असतील स्टेप्स. तुमच्या बामचा खप दोनशे टक्क्यांनी नाही वाढला तर हा कार्यक्रम सोडून देईन बघा मी!! "

संशोधन सहाय्यकाने इमाने इतबारे महाराष्ट्रातील नृत्यप्रकारावर गुगल सर्च करून त्याची प्रिंटआउट दिग्दर्शकाच्या हातात आणून दिली. दिग्दर्शकाने त्याकडे एकदा नजर टाकताच त्याचे डोकेच फिरले. त्या कागदावर बाल्या नृत्य, आदिवासी नृत्य, गोंधळ, जोगवा असले काय काय लिहिलेले होते. " किस गधेने इसको रिसर्च असिस्टन्ट बनाया रे? टी आर पी कम करना हैं क्या? आता फक्त लावणी आणि कोळी नृत्यच होऊ शकेल. कोळ्यांनी कधी जन्मात पहिल्या नसतील अशा स्टेप्स आता त्यांना बघायला मिळतील आणि फडावरच्या बाया पण आमच्या शो मधून नव्या स्टेप्स शिकतील. असल्या धम्माल नाचानेच तर आपला टी आर पी वाढेल. जा, ये कागज कचरेमे फेक दे."

आता पुढच्या एपिसोडस ची जोरात तयारी सुरु आहे. वातावरण तयार केले जात आहे. दूरदर्शन वरून, "लहान मुलांनी लावणी नृत्य करणे योग्य की अयोग्य?" ह्या विषयावर चर्चा घडवून आणली जात आहे.

आपल्या बिनधास्त शैलीसाठी प्रसिध्द असलेले पत्रकार श्री. माथेफिरू ह्यांना भरभक्कम पैसे देऊन भडक शैलीत कार्यक्रमावर टीका करणारे लेख पुंजानी शेठ लिहून घेत आहेत. 

"असेच नृत्य सादर होणार असेल तर हा कार्यक्रम कौटुंबिक वेळेला ठेवावा की रात्री उशिरा ", “ ह्या कार्यक्रमाचा नृत्याशी काही संबंध आहे की फक्त व्यापार चालू आहे?” अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्या जात आहेत म्हणजे घडवून आणल्या जात आहेत.

हवा तापत आहे. त्याचा फायदा कार्यक्रमाला मिळत आहे. "डू बाई डू "कार्यक्रम जोरात चालू आहे. ह्या कार्यक्रमाने पुंजानी शेठना आर्थिक समाधान मिळत आहे. प्रत्येक स्पर्धकाने नृत्यानंतर जय म्हाराष्ट्र म्हणणे त्यानी सक्तीचेच केले आहे.

 एकूण मराठी संस्कृतीला आणि नृत्याला सुगीचे दिवस आले आहेत ह्यात कोणाला शंकाच नसावी!!

|| जय म्हाराष्ट्र || 

-वृंदा टिळक 

(ऋतुगंध ग्रीष्म २०१२/१३)



No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...