स्मरणाचा उत्सव जागुन जणु दुःख घराला आले
दाराशी मी बसलेला दुःखावर डोळे पसरुन
क्षितिज जसे धरणीला श्वासानी धरते उचलुन
विश्रब्ध किनारे दूर जाऊन कुठे मिळताती
जणु हृदयामागून माझ्या झाडांची पाने गळती
नाहीच कुणी अपुले रे प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंदविणारे "
प्राणावर नभ धरणारे कोणी नसल्याची खंत..दु:ख, वास्तव आणि कल्पना यांचे असे काही गूढ मायाजाल तुम्ही निर्माण करायचात .... की त्या नादमयी अनोख्या शब्दांच्या प्रेमात पडण्याखेरीज दुसरा काही पर्यायच उरायचा नाही.
" ही माझी प्रीत निराळी संध्येचे शामल पाणी
दु: खाच्या दंतकथेला डोहातून बुडवून आणी
हाताने दान कराया पोकळीत भरला रंग
तृष्णेचे तीर्थ उचलतो रतीरंगातील नि: संग
शपथेवर मज आवडती गाईचे डोळे व्याकूळ
घनगंभीर जलधीचेही असणार कुठेतरी मूळ
आकाश भाकिते माझी नक्षत्र ओळ ही दंग
देठास तोडतानाही रडले न फूलांचे अंग
तुम्हाला दिसणारे आकाशच वेगळे होते. संध्यारंग ल्यालेले. ना आदी ना अंत असे घनव्याकूळपण बरसवणारे तुम्ही...घन गंभीर जलधीचेही असणार कुठेतरी मूळ....शोधायचेच झाले तर मग विचार करावा लागेल की कसे होतात तुम्ही? ते तर कधी कुणाला सांगताच आले नाही. कारण तुमच्या सारखा झंझावाती वारा, हातून निसटणारा पारा असा का सहज शब्दात मावणार होता?
ग्रेस हे नाव तुम्ही घेतलेत ते परमेश्वरी कृपा ह्या अर्थाने. पण खरोखरीच तुम्ही मराठी काव्य सृष्टीची "ग्रेस "होतात. तुमची सही देखील 'पोएट ग्रेस ' अशी.कवीपणाचा दिमाख मिरवणारी. हे कवीपण जपणे सोपे नव्हतेच. ते जपण्यासाठी तुम्हाला काय काय सहन करावे लागले ते तुमचे तुम्हालाच माहिती. असा कवीपणाचा पेटता निखारा हातात धरून ठेवत, तो दाह तुम्ही सतत जागता ठेवलात. त्याची धग तुमच्या कवितेतून सतत जाणवत राहिली.
कोणत्याही परंपरेत बसवता येईल अशी तुमची कविता नव्हतीच कधी, ना तिच्यावर कोण्या पूर्वसुरींचा उमटला होता ठसा. ती होती संपूर्णपणे स्वयंभू. तिच्यावर उर्दू काव्याचा वा इंग्रजी काव्याचा प्रभाव आहे असेही म्हटले गेले. तुमच्या कवितेची म्हणावी तशी दखलही घेतली गेली नाही. पण ह्या कशाचाच परिणाम करून न घेता, सगळ्या चर्चेपासून अलिप्त रहात तुम्ही लिहित राहिलात. एकटेपणा,अलिप्तता आणि विरक्तीच्या मार्गावर चालत राहिलात.
एकांताविषयी तुम्ही म्हणालात की एकांतात मी सर्वत्र विहार करू शकतो. कोणताच काळ मला अवरुध्द करू शकत नाही. कवीच्या कल्पनेने मी कुठेही जाऊ शकतो, काहीही पाहू शकतो. पोएट ग्रेसचे घरटे अशी पाटी असलेल्या असलेल्या घराच्या दारावर,"मी मोकळा आहे पण उपलब्ध नाही" असे लिहू शकणारे केवळ तुम्हीच असू शकता.
"गेले उकरून घर, नाही भिंतीना ओलावा; भर ओंजळी चांदणे करू पाचूचा गिलावा.",
"आण लिंबोणी सावल्या, नाही आढ्याला छप्पर; वळचणीच्या धारांना लावू चंद्राची झालर " असे म्हणण्याची कुवतही तुमचीच.
तुमची कविता लेवून आली होती एक अप्रतिम शब्द कळा, जी केवळ तुमचीच असू शकत होती. वाचक त्या शब्दांच्या मोहात नाही पडला असे कधी झालेच नाही. पाउस, गाय, कावळे, सांज, कृष्ण ,निळाई ह्या तुमच्या कवितेत नेहमी आढळणाऱ्या संकल्पना.. हो संकल्पनाच. कारण त्या केवळ प्रतिमा म्हणून येत नाहीयेत तर स्वत:चे विश्व घेऊन अवतरतात.
ती गेली तेव्हा निनादत असणारा पाउस, दु:खाचा मंद सूर वाटणारा पाउस, कधीचा पडणारा, ताऱ्याच्या प्रहरापाशी कोसळणारा अशा अनेक रुपात पाउस तुम्हाला भिजवत होता व वाचकालाही तोच प्रत्यय देत होता. अनवट, नादमयी शब्दांचे एक भांडारच तुम्ही रसिकांना खुले करून दिलेत.
ती कविता समजण्याइतकी नव्हतीच आमची कुवत कधी आणि सुरुवातीला तुम्हीही कधी ती समजावून सांगायच्या भानगडीत पडला नाहीत. म्हणालात," मी काही माझ्या कवितेचा प्रियकर नाही.मी कशाला तिची पाठराखण करू? " त्या काळात तुमच्या कवितेतून वाचकांनी काही पारंपारिक अर्थ लावायचा प्रयत्नही केला. तरीही तुम्ही अलिप्तच. तसेही एकदा लिहून झाले की मग ते लेखन वाचकाचे. त्यांनी आपापल्या समज शक्तीच्या परीघानुसार तिचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा आणि मग मला कविता समजली म्हणून खुश व्हावे. कवीला त्याच्याशी काय देणेघेणे !!
पण काळाच्या एका टप्प्यावर अचानक तुम्ही आपली अलिप्तता सोडून मुलाखती द्यायला लागलात, सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊ लागलात. आपल्या कवितेचा, एकमेवाद्वितीय अशा प्रतिमासृष्टीचा अर्थही सांगू पाहिलात. तुमचे अनुभव विश्व, त्यातील प्रतिमा, अस्सल भारतीय परंपरेतील रामायण आणि महाभारतातले संदर्भ एका वेगळ्याच दृष्टीकोनातून तुम्ही दाखवलेत.
" आईंची नेहमीची उदात्त महन्मंगल मातृत्वाची कल्पना मी मांडत नाहीये तर तिच्यातील आदिम मादीपण मी मांडतोय " असे तुम्हीच सांगितलेत. त्या अनुभवाने होरपळलेले बालपण एक भळभळती जखम होऊन तुमच्या कवितेत वाहात राहिले. तुम्ही ती जखम सतत नखलून कायम ठसठसत ठेवलीत. म्हणालात,"आईचे आदिम मादी रूप, बीजरुपातील मादीचे अव्यंग रूप, सृजन रूप हेच माझ्या काव्य व गद्य विश्वाचा कणा आहे. माझे सगळे कल्पनाविश्व त्याभोवती उभे केलेले आहे. तिचे मादीपण हा माझ्या अस्तित्वाला सर्पाने घातलेला विळखा आहे. "
सतत जाणवत राहिले तेच तुमच्या कवितेत प्रगट होणाऱ्या भाव विश्वातही. तिच्या मनस्वीपणात आणि देहस्वीपणात तुम्ही होतात साक्षीदार .त्याची मुद्रा तुमच्या आयुष्यावर कायमची कोरली गेली होती. आईला, तुमच्या शब्दात सुमित्रा बाईला, म्हणालात,
"तुझा आला ग साजण, नको त्याच्यापुढे जाऊ,
त्याने यात्रेत भेटल्या कोण्या पोरीला दिले आभाळाचे बाहू,
त्याला हात नाही वेडे.उभा अंधारी साजण..तिने जीव दिला तरी, त्याने वाहत्या पाण्याचे ..इथे आणले पैजण.."
तुम्ही असेही म्हणालात की सुमित्रा बाईचा देहस्वीपणा तिच्या आतले आणि बाहेरचे गोंदण गाव जाणून घ्यायचे तर आत्मदिपाचा प्रकाश पाहिजे." आयुष्यावर उमटलेला आईच्या ठसा कसा आहे ह्या विषयी म्हणालात ," आज ती निवर्तल्यावरही, ह्या कधी वैराण तर कधी बहरलेल्या चंद्र माधवीच्या प्रदेशात मला तिच्या हाका ऐकू येतात...मी कुठेही जात नसताना, तिच्यापासून पळत नसताना ती मात्र माझा सुसाट पणे पाठलाग करते आहे."
एकदा वाचल्यावर तुमची कविता देखील नाही का वाचकाचा पाठलाग करत रहात? दर वाचनाबरोबर नव्याने उलगडत, झोंबत, कुरतडून टाकत आणि तरी मोहात जखडत ती वाचकावर गारूड करते. तुमची कविता आहे एक चांदणचकवा. परत परत वाचकाला स्वत:कडे खेचणारा, स्वत:पाशी बांधून ठेवणारा. तुमची कविता समजली आहे असा भास होतोही क्वचित कधी पण तो भासच.
तुम्हीच म्हटले आहेत ना ,"कर्णाला ज्याप्रमाणे जन्मतःच कवचकुंडले मिळालेली होती, तशी माझ्या काव्याला जन्मतःच दुर्बोधतेची बेसरबिंदी टोचलेली आहे...माझी कविता जगता जगता वाढेल..तोच तिचा... वंश-वृक्ष!''
माझ्या कवितेशी थांबणार्या माझ्या रसिकाचे काय होत असेल? याची कल्पना मी करु शकत नाही. 'गाईच्या दुधाला आच दिली की साय धरणार' असे निर्मितीचे साधे कोष्टक घेऊन तो उभा रहात असावा..पण माझी प्रश्नचूर निर्मिती असल्या साध्या प्रश्नांची उत्तरे देतेच कोठे?,
ती म्हणुन टाकते--'चंदनाच्या झोपाळ्याला, इंधनाचे भय, वाघिणीच्या दुधावर आली कशी साय'...
माझी कविता हे एक बेटच आहे, मी ही एक बेटच आहे...बेटावर माणसे सफरीसाठी येतात, किंवा समुद्र जिवावर उठला तर... माझ्या कवितेच्या बेटावर येणार्या काव्यरसिकाला परतीच्या बोटीची कुठलीही हमी मी देऊ शकत नाही...परतावेसे वाटले तर स्वतःच होडी झाले पाहिजे!'
स्वत:च्या कवितेविषयी अभिमानाने तुम्ही म्हणालात, ती मर्त्य मानवासाठी नाहीच.. ती आहे एखाद्या सुफी फकीराप्रमाणे विष देखील अमृतासारखे पिणाऱ्यासाठी.एखाद्या एकांत ताऱ्यासाठी. तुम्ही म्हणालात देखील एकदा,"कोण पाण्याला शिवतो, गूढ घावांचे अस्तर, नांगी पिळून विषाचे जसे काढावे अत्तर" "मी रसिकाच्या हातात देतो आहे एक ओल्या,जिवंत वेळूची बासरी.." स्वत:च्या कवितेच्या वंश वृक्षाविषयी बोलणारे तुम्ही म्हणता ,"माझ्या मृत्युनंतरची माझ्या कवितेची व्यवस्था मी केव्हाच करून ठेवली आहे.' घरभर सरणाचे पात्र सांडून जाई..फिरुनीफिरुनी माझा निर्वंश होई.'
तुमच्या कवितेसारखेच तुम्हीही समजायला अवघड. एकांत आवडणारे तुम्ही, माणूसघाणे नव्हतात. एकदा मैत्र जुळले की मग तुम्ही दिलखुलास गप्पा मारायचात. वेदनेच्या, दु:खाच्या कविता लिहिणारे तुम्ही प्रत्यक्षात किती जिंदादिल होतात ह्याचे वर्णन तुम्हाला भेटून येणारे लोक नेहमी करत रहातात. कशाचे तरी भय, झाकोळून टाकणारे भय वर्णन करणारे तुम्ही मृत्यूला कसे हसत, टेचात सामोरे गेलात ह्याचेही वर्णन आम्ही वाचले.
" भयभारच देहाचा का? ते जादूचे परिमाण;
लाजते सुरीची जात ठेविता तिच्यावर मान. "
तुमचा मनस्वीपणा, झोकून देऊन एखादी गोष्ट करण्याची तुमची वृत्ती, अगदी खास ग्रेसची अशी.
मृगजळाचे बांधकाम करू शकण्याची शक्ती देखील खास तुमचीच.
स्वत:च्या अक्षरातली अर्पण पत्रिका ही तुमची खासियत.
तुम्ही लिहिलेत,
" पण मला तर हे बांधकाम, तुझ्याच निर्मितिसत्त्वाचे शील म्हणून करणे भाग पडलेय ना ?
तेव्हा हे मृगजळाचे बांधकाम, मी तुलाच अर्पण करतोय.
अर्पण, तर्पण, समर्पण आणि दर्पण (ही) यांचे,
या सर्वांचे काही वेगळे अर्थ, अनर्थ असतात काय? संभवतात का..य? "
आज तुमच्या स्मरणाचा उत्सव जागत असताना वाटते आहे ह्या लेखाचा शेवट कसा होईल? नाही..होणारच नाही खरे तर ह्या लेखाचा शेवट.. कारण तुम्ही होतात आणि तुमच्या कवितेच्या रुपात तुम्ही आहात आणि राहाल.
फोटो आंतरजालावरून साभार.-वृंदा टिळक
-(ऋतुगंध -वसंत २०१२ )

No comments:
Post a Comment