Saturday, 20 December 2014

वंगरंगी रंगले मी- शिशिर

आज अनेक वर्षांनी तिला भेटायला जात होते. कशी असेल ती? इतक्या वर्षात मी तर कितीतरी बदलले. माझे विचार, माझ्या धारणा इतकेच काय माझा स्वभाव देखील थोडा फार बदलला. मग ती किती बदलली असेल? ती स्वत: किती बदलली असेल हे खरे तर नाहीच महत्वाचे. तिच्यामुळे आसपासचा परिसर कसा सुपीक झाला, ती कशी जीवन दात्री ठरली? कधी कोपिष्ट होऊन तिने हाहाकार माजवला? हेच महत्वाचे.

तिला भेटले होते जिथे, गंगोत्रीला, ती होती तिच्या जीवनाची सुरुवात. तिचे निर्मल, प्रसन्न, नितळ पाणी खरेच खूप कोवळे वाटत होते. तिला गंगामैय्या म्हणणे म्हणजे एखाद्या ४/५ वर्षाच्या मुलीला नउवारी नेसवून, उगीच मोठे केल्यासारखे वाटत होते. पुढे हृषीकेशला भेटली तीही अशीच मैत्रिणीसारखी. दगड धोंड्यातून खळाळत वाट काढणारी. जिच्याशी मनातले सारे बोलावे अशी स्वागतशील अन निवांत.

पण हरिद्वारला बघावे तर तिचे रूपच पालटलेले. धार्मिक बंधनात करकचून आवळली गेली असल्यासारखी वाटली ती. किती प्रौढ दिसत होती. तिचे विशाल पात्र अनेकांची पापे पोटात घेत होते म्हणे. जिच्याशी मैत्री होऊ शकेल अशी राहिलीच नव्हती ती. ती आता झाली होती पूजनीय आणि वंदनीय अशी गंगामैय्या. भर वेगात वाहात होती. सांज आरतीच्या वेळी तिच्या पात्रात असंख्य दिवे सोडले जात असताना, ओझरती दिसल्यासारखी वाटली खरी जुनी मैत्रीण तिच्यात, पण ते तेवढेच. 

आज इतक्या वर्षांनी आणि इतक्या अंतरावर परत एकदा भेटणार होते मी तिला. गंगोत्री ते गंगासागर. शेकडो किलोमीटर. तशी हुगळी म्हणून तिलाच कोलकात्यात भेटले होतेच. हावडा ब्रिज म्हणजेच रवींद्र सेतू कडे अगदी 'आ ' करून बघून झाल्यावर पुलाखालून संथपणे वाहणाऱ्या तिचे भान येते. वाटते, हिला भेटण्यासाठी यायला पाहिजे एकदा पहाटवेळी वा संध्याकाळी. जेव्हा सूर्य असेल मवाळ आणि शहराच्या दिव्यांनी केलेला नसेल अजून आपला लखलखाट. झाली नसेल रोजच्या आयुष्याची वर्दळ सुरु तिच्या किनारी. अशाच निवांत वेळी भेटायला हवे तिला. असे अनेकदा मनात येऊनही तिला तिथे भेटायला जायचे राहून गेलेच खरे. तसे तर हुगळी म्हणूनच बेलूर मठाच्या बागेतून दिसणारे तिचे विरागी रूप ही अनुभवले होते.

पण आज मी निघाले होते गंगासागराला. जिथे गंगा मिळते सागराला, ज्या ठिकाणी मकर संक्रांतीला भारतातली सगळ्यात मोठी यात्रा होते त्या गंगासागराला. मनात खूप उत्सुकता होती. "सब तीर्थ बार बार, गंगा सागर एक बार " असे ज्या गंगा सागराचे वर्णन केले जाते ते कसे असेल?

थोडा गाडीने प्रवास, मग गाडी नावेत टाकून नदी पार करायची आणि मग परत रस्त्यावरून प्रवास, असे मनाशी योजिले होते. पण इथे नदी पार करायला फक्त प्रवासी नाव होती. गाडी व चालक अलीकडच्या  तीरावरच ठेवून आम्ही निघालो. तिकीट खिडकीपासूनच रांगेला सुरुवात. भारतातील निरनिराळ्या प्रदेशातून भाविक व प्रवासी आले होते. एकच प्रवासी बोट असल्याने आपोआपच सगळे वर्ग भेद मावळले होते! बोट येई पर्यंतचा वेळ निरनिराळी भजने, घोषणा, फेरीवाले, भांडणे, यात्रेकरूंच्या आपापसातल्या गप्पा, नवसांच्या कथा, त्यातच ज्योतिष सांगणारेही हजर होते. एकूण अगदी मस्त वेळ गेला. जनसागराचा भाग होणे म्हणजे काय ह्याचा प्रत्यय येत होता !! 

नावेत बसताच लोकांचा भक्ती भाव अगदी उफाळून आला होता. गंगेचे भव्य पात्र आपोआपच नतमस्तक व्हायला लावत होते. तो विशाल प्रवाह किती दु:खे पचवून, किती कहाण्या मनात साठवत तिथपर्यंत आला होता. किती जणांची श्रद्धा ठाम करत, किती जणांच्या जगण्याचा आधार बनत गंगौघ तिथेपर्यंत पोचला होता. सगळे सामावून घेत, सगळे सोसत, स्वत:ची उदात्तता टिकवून ठेवायची कशी ह्याची शिकवण देत तिथे तो शांत होता. 

भाविकांनी हात जोडले, गंगामैय्याचा जयजयकार केला. पैसे फेकले. नैवैद्यही दाखवले व पात्रात फेकले. नदीतल्या माशांसाठी पाण्यात खाणे टाकले आणि मग शेवटी त्या प्लास्टिकच्या पिशव्याही नदीतच टाकल्या. जिला क्षणभरापुर्वी आपण हात जोडले तिला कचरा टाकून कसे घाण करावे असा तिळमात्रही संदेह त्यांच्या मनात आला नाही.


जय गंगा मैय्या!

ह्या सगळ्यासकट, किंबहुना हे असे असताना सुद्धा तो प्रवास अद्भुत होता. भारताची संस्कृती, धर्म जिच्या तीरावर नांदले, अनेक राजवटींचा उदय व अस्त जिने पाहिला त्या एका पुरातन अस्तित्वाचे भान येत होते. पण त्याचवेळी मातेच्या प्रेमळ व आश्वासक स्पर्शाचा प्रत्ययही, तिचा जलौघ देत होता. विश्वाच्या विराट पसाऱ्यात स्वत:च्या अस्तित्वाचे क्षुद्रपण जाणवून माणसाला नम्रत्व येत होते. आजूबाजूचे सारे जग विसरून गेले होते आणि तिच्याशी आपले जन्मोजन्मीचे नाते आहे असा प्रत्यय येत होता. मला वाटते भारतीय मनाला असणारी गंगेची ओढ ती हीच असावी. 

 असे म्हणतात की गंगेत आपली पापे धुतली जावीत म्हणून स्नान करणाऱ्या लोकांची पापे तीरावरच्या झाडावर त्यांची वाट पहात बसलेली असतात. ते लोक स्नान करून परत येताच त्यांच्या मानगुटीला बसण्यास तैयार!! तसेच आपल्या मनाचेही असते. उदात्ततेच्या, अपार शांतीच्या प्रदेशात, विशाल होऊन ते फार काळ रहात नाही. जमीन पायाला लागताच आम्ही स्पेशल गाडी शोधायच्या गडबडीत मग्न झालो. अफाट जनसमुदायाचा भाग वगैरे फार वेळ झेपणारी गोष्ट नाही !! 

अगदी चिंचोळा जमिनीचा पट्टा. काहीही निगा न राखलेल्या अनेक गाड्या. आवश्यक सुविधांचा असलेला अभाव. तिथे मकर संक्रांतीला जमणाऱ्या गर्दीत अनेक लोक चेंगरून वा आजाराने वा अपघातात मरतात, त्या बातम्यांचे आता मला कधी नवल वाटणार नाही. त्या गाडीने सोडल्यावर परत एक सायकल रिक्षा. पैशांचा अभाव, उत्पन्नाची अपुरी साधने ह्यामुळे जेव्हा मिळेल तेव्हा जास्तीत जास्त मिळवण्याची स्वाभाविकपणेच बनलेली मानसिकता. ह्या सगळ्याला तोंड देताना त्या भेटीतील उदात्तता कधी संपून गेली कळलेच नाही. आता उरले होते फक्त उपचार. 

कपिल मुनींचा आश्रम पूर्वीच्या जागेपासून हलवून आता किनाऱ्यावर आहे.


कपिल मुनी आश्रम 

गंगासागराला स्नान करावे, पूजा करावी, पूर्वजांचे श्राद्ध करावे म्हणजे हिंदू रूढीनुसार अपार पुण्य मिळते असे सांगणारे पुजारी मागे लागत होते. ह्यातले काहीच करायचे नसल्याने आम्ही निवांत होतो. ते आमचे निवांतपण पाहून वेगवेगळ्या प्रकारचे लोक मागे लागले. मालिश करून घ्या, आमच्याच हॉटेलात खायला या, रंगीत माळा विकत घ्या, दान करा वा भविष्य जाणून घ्या!! नुसतेच आमचे काही न करता तिथे असणे त्यांना नामंजूर होते बहुधा!! 


जिथे सागरा गंगा मिळते!

भर दुपारी उन चटके देत होते. ह्या सगळ्या लोकांना वैतागून आता इथून लवकर निघूया अशा निर्णयाला पोचलो होतो. आपल्याला ५ मिनिट चप्पल काढली तरी जिथे चटके सोसत नाहीयेत तिथे ह्या दान मागणाऱ्या लोकांची अवस्था किती बिकट असेल असा विचार करून मी एका वयोवृद्ध महिलेला पैसे दिले आणि सांगितले, " खाउन घे मावशी काहीतरी ". त्यावर तिने मला सांगितले ,"अभी तो रोजा हैं, रात को खायेगी!!" मी चकित. गंगासागराला दान मागणे आणि रोजा असणे ह्यातली गुंतागुंतीची सामाजिक, आर्थिक वीण समजावून घ्यायला हवी एकदा.

गंगासागराची भेट हा आमच्या कोलकाता वास्तव्यातला शेवटचा निवांत दिवस होता. दुसऱ्या दिवशीपासून मूवर्स, त्यांची पाहणी आणि अंदाजपत्रके, खोकी, सामानाची बांधाबांध ह्यांनी दिवस व्यापले जाणार होते. 

किती मजेची गोष्ट आहे ही! माझा कोलकाता वास्तव्यातला पहिला दिवस सुरु झाला होता तो पहाटेच झालेल्या रवींद्र सरोवराच्या दर्शनाने आणि शेवटचा दिवशी मी होते गंगा सागराला. ह्याला योगायोगच म्हणावे तर अत्यंत प्रिय असा योगायोग होता तो.

कसे होते मला दिसलेलं कोलकाता? भिशोन सुंदर! जुन्या काळाच्या स्मृती मिरवणारे, मोठाल्या बागा, मैदाने तळी असलेले. प्रत्येक छोट्या छोट्या भागातही भाजी बाजार, मिठाईचे दुकान आणि सराफाचे दुकान हे हवेच!! खूप सुंदर सुती साड्या अजूनही रोज नेसणाऱ्या सुंदर स्त्रियांनी कोलकात्याला नि:संशय एक खानदानी सौंदर्य प्राप्त झालेले आहे. सामान्य माणसात अजूनही बऱ्यापैकी नितीमत्ता टिकवून असलेले, स्त्रीयांविषयीचा आदर केवळ पुस्तकात न ठेवता प्रत्यक्ष वागण्यातही दाखवणारे असे हे कोलकाता.

 "ईश्वरासाठी लिहिलेला अभंग आणि प्रेयसीसाठी लिहिलेले गान सारख्याच तोलाचे आहे, जर का अभंग तेवढा चांगला लिहिला गेला असेल तर !! " असे म्हणणारे रसिक रवीन्द्रनाथ तिथल्या हवेत ती आस्वादक वृत्ती ठेवून गेले आहेत बहुधा!! त्यांची कविवृत्ती, सुभाष चंद्राचा क्रांतिकारी बाणा, विवेकानंदांची धर्माकडे पाहण्याची नवी दृष्टी, अनेक वैज्ञानिकांचे वास्तव्य लाभलेली महाविद्यालये ह्या सर्वांचे अद्भुत मिश्रण कोलकात्याला त्याचा विशेष स्वभाव बहाल करते.. 

कोलकात्याच्या वनस्पती उद्यानात एक प्रचंड मोठा वटवृक्ष आहे.त्याचा विस्तार अवाढव्य आहे. खास गोष्ट म्हणजे त्याचे मूळ खोड वाळवी लागल्याने कधीच नाहीसे झाले आहे. पण पारंब्यांचा विस्तार प्रचंड वाढला आहे. कोलकात्याला पाहताना वारंवार त्या वटवृक्षाची आठवण येत रहाते. फरक एवढाच की तो पारंब्यांचा विस्तार हिरवागार, रसरशीत आहे आणि कोलकाता मात्र...

 कायदा वा सुव्यवस्थेची स्थिती प्रचंड प्रमाणात ढासळलेली. सगळेजण कोणाच्या तरी भीतीच्या छायेत असण्याचे विषारी वर्तुळ असलेली. उद्योग धंदे अनेक प्रकारच्या दहशतीमुळे मोडकळीस आलेले. भेदरलेले लोक आणि कामगार समस्यांनी ग्रासलेले उद्योग धंदे, वाढती नक्षलवादी हिंसा, राजकीय फायद्यासाठी काहीही करू शकणारे राजकारणी हे सगळे पाहिले की एखाद्या मोडकळीस आलेल्या पण अजूनही आपले गतवैभव सांगणाऱ्या जुन्या इमारतीची आठवण होते.

स्थिती एवढी वाईट आहे म्हणावे तर अजूनही रस्त्यावर ५ रुपयांना पोटभर पोळी भाजी मिळते, अजूनही भाजी बाजारात अगदी गरीब माणूस ५ रुपयांना एक वांगे, दोनचार भेंड्या, दोनचार परवर, छोटासा भोपळ्याचा तुकडा असे विकत घेऊ शकतो, जे आज मुंबईत शक्य नाहीये. अजूनही ज्यांच्यावर विश्वास ठेवावा असे सामान्य लोक आहेत. अजूनही माणसामध्ये जीव गुंतवणारे वेडे लोकही आहेत. 

" तुमसे मोन लाग गया हैं " म्हणत रडणारी व मला रडवणारी माझी घरकामातली मदतनीस, कोलकात्यातील गर्दीत, लबाड माणसांत मादामजींचा निभाव लागणार नाही ह्या समजुतीने रक्षणकर्त्याची भूमिका घेणारा आमचा नेपाली वाहन चालक, 'इतना रेंट देनेसे तो आप कोठी खरीद ही लेंगे तो सस्ता पडेगा ',असा अनाहूत सल्ला देणारा सोसायटीच्या ऑफिस मधला तरुण मित्र, "आपके घरमे तो हमारे जैसोन्के ७/८ घर हो जायेंगे असे निर्व्याजपणे सांगणारा क्लीअरंस एजंटचा माणूस, आमच्या कोलकाता आवडण्याचे कौतुक असलेले , बंगाली शिकून घ्या आता लवकर असे सांगणारे, आम्ही सोडून जाणार म्हणून हळहळणारे आमचे घरमालक जोडपे, कितीतरी लोक. न गुंतायचे ठरवूनही ,' मोन तो हमाराभी लग ही गया था!" 

 मला भावलेला बंगाल हा असा होता. फार थोडा काळ व्यतीत केला मी तिथे. तिथल्या समाज जीवनाची पुरती ओळख नाहीच करून घेता आली. अळवाच्या पानावरच्या थेम्बासारखे माझे राहणे झाले. पण त्या अलीप्ततेतही वंग रंगाने मला इतके रंगवून टाकले. मला रंगवून टाकणारा वंग रंग तुम्हा सगळ्यांनाही रंगवो ह्यासाठीच होता हा सगळा लेखन-प्रपंच.

संपेलच आता हे ऋतुचक्र आणि त्या बरोबरच ही लेख-मालिकाही. ह्या ऋतुचक्राचे सरणे सोसण्यासाठी आणि नव्या ऋतुचक्रातील आनंद उत्साहाने अनुभवण्यासाठी हार्दिक शुभकामना.

पाडगावकरांच्या एका कवितेतल्या काही ओळी वाचणार का?

फुलणं ही जशी फुलाची भाषा असते

तशीच असते कोमेजणं ही फुलांचीच भाषा

कितीही कोमेजलेली फुलं जरी असली तरी

एकदा ती फुलली होती हे नाही विसरता येत..

न बोलता उभे होतो एकमेकांसमोर

यापुढे भेटलो तरी आपण परके असणार

कोमेजलेली फुलं पुन्हा फुलत नाह

हे ज्यांना कळलं ते फुलणंसुद्धा सोसतात..

-वृंदा टिळक . 

ऋतुगंध शिशिर २०११


Monday, 20 October 2014

वंगरंगी रंगले..

बालमित्रांनो, 


स्वामी विवेकानंद म्हणले की आपल्या डोळ्यापुढे उभे रहातात ते भगव्या कपड्यातले, हाताची घडी घालून, धीरगंभीर नजरेने पाहणारे विवेकानंदच उभे रहातात ना? लगेच आपल्या कानात, "अमेरिकेतील माझ्या बंधू भगिनीनो "असे शब्द पण ऐकू यायला लागतात. तुम्हाला म्हणून सांगते, मला तर ह्या वाक्यानन्तरचा टाळ्यांचा कडकडाट पण ऐकू येतो दरवेळी!!!

कोलकात्यातील बिधान सारणी जवळच्या विवेकानंदांच्या घरी जेव्हा बाल वयातील, तरुण वयातील, मोकळ्या केसांच्या, उत्सुक डोळ्यांच्या नरेन्द्राचे फोटो पहिले तेव्हा एकदम मजाच वाटली. लांब केसांच्या कपाळावर रुळणाऱ्या बटा असणारे, विदेशी पोशाखातले नरेन्द्राचे रूप एकदम गोजीरवाणेच दिसते. आता विवेकानंद यांच्या विषयी बोलता बोलता मी मध्येच ह्या कोणा नरेन्द्राविषयी का सांगायला लागले असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडणार नाही, हे मला माहिती आहे. कारण तुम्ही सगळेच हुशार मुले असल्याने विवेकानंदांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते हे अर्थातच तुम्हाला माहिती असणारच!!!

विवेकानंदांचे घर एकदम ऐसपैस आणि खानदानी थाटाचे आहे. त्यांचे वडील कोलकाता येथील यशस्वी वकील होते. त्यांच्या रुबाबाला साजेसेच त्यांचे घर आहे. वडिलांच्या मृत्यू नंतर मात्र परिस्थिती खालावत गेली. काही वर्षांनी वाटण्या होऊन ह्या घरात मधेच भिंती उभ्या राहिल्या. कालांतराने अनेक भाडेकरू त्या घरात राहू लागले. त्या घराचा रुबाब नाहीसा होऊन ते अगदी छोट्या छोट्या खोल्यांचे, काहीही आराखडा नसलेले असे बकाल वास्तू बनले. जसजशी वर्षे गेली, तसतसे तर दुरुस्तीच्या, निगराणीच्या अभावी तर ते अधिकच केविलवाणे दिसू लागले. 

मग एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे रामकृष्ण मिशनने केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने त्या दुरावस्थेतल्या घराची जागा आणि त्याच्या बाजूची जागाही हस्तगत केली. पुरातत्व विभाग तसेच देशभरातील नामवंत वास्तुशिल्पीन्च्या मदतीने ते घर पूर्वी होते तसेच परत पुनर्स्थापित केले आहे. आता त्या जागेत एक संग्रहालय, एक वाचनालय तसेच विवध ज्ञान शाखांमध्ये संशोधन करणारे एक केंद्र, एक सांस्कृतिक केंद्र तसेच रामकृष्ण मिशनची एक शाखा असे सर्व वसले आहे. फार प्रसन्न आणि सुंदर वास्तू झाली आहे ती. 

तुम्ही कधी गेलात कोलकात्याला तर आईबाबांच्या मागे लागून नक्की ही वास्तू बघून या. जिथे विवेकानन्दान्चा जन्म झाला त्या जागेवर एक भव्य सिंहासन व त्यांचा फोटो आहे. त्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबाने वापरलेल्या वस्तू, त्यांच्या खोल्या जतन करून ठेवल्या आहेत. एक ध्यान मंडप आहे. जिथे नरेंद्राची आई व पुढे नरेन्द्रही पूजा करायचा ते घरातच करवून घेतलेले शंकराचे मंदिरही आहे. 

तिथे जायच्या आधी विवेकानंद ह्यांच्या विषयी काही वाचूनही जा. त्यांचे आयुष्य, त्यांचे कार्य, त्यानी जगाला केलेले मार्गदर्शन ह्याविषयी तुम्हाला काही माहिती असेल तर ती वास्तू पहाताना तुम्हाला आणखीनच छान वाटेल. कोलकात्याला गेलात तर दोक्खीनेश्वर मंदिर आणि बेलूर मठ पहायला अर्थातच विसरू नका. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद ह्यांच्या प्रेरणेने व वास्तव्याने पवित्र झालेल्या वास्तू आहेत त्या. दोक्खीनेश्वराच्या मंदिरात कालीमातेचे पुजारी होते रामकृष्ण परमहंस. तिथे त्यांची व मा. शारदादेवींची राहण्याची जागा पहायला मिळते. 

बेलूर मठाची रचना एकदम वेगळी आहे. विविध वास्तुशैलीन्चा आविष्कार व संगम आपल्याला तेथील रामकृष्ण मंदिरात पहायला मिळतो. त्याच आवारात विवेकानंद व मा. शारदादेवींची पण मंदिरे आहे. भव्य, शांत आणि सुंदर आवार, त्यात अनेक सुगंधी फुलांची झाडे तसेच अनेक फळझाडे आहेत. मागे गंगामाई वाहाते आहे. बेलूर मठ हा प्रत्येकाने जाणून घेण्याचा एक अनुभव आहे हे नक्की. 

तुमच्या इतिहासाच्या पुस्तकात कधी ना कधी तुम्ही सुभाषचंद्र बसूंचे नाव नक्की वाचले असेल. " तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा!!" हे त्यांचे वाक्यही कुठ्लायातरी परीक्षेत विचारले गेले असेल. कदाचित सिंगापुराच्या एस्प्लनेड पार्क मधील आझाद हिंद सेनेचे स्मारकही तुम्ही पाहिले असेल. अजूनपर्यंत पाहिले नसाल तर हिल व्यू अवेन्यू कडून बुकित तिमाह रोड ला येताना ओल्ड फोर्ड factory म्युझियम आहे तेही जरुर पहा. नेताजींचा आणि सिंगापूरचा फार जवळचा संबंध आहे. आझाद हिंद फौज म्हणजेच INA ची स्थापना आणि कार्य ह्यात सिंगापूरचा मोठा वाटा आहे. 

कोलकाता येथे त्यांचे घर आता संरक्षित वास्तू म्हणून घोषित झालेले आहे. तेथेही आता म्युझियम आहे. ब्रिटीश सरकारच्या नजरकैदेतून ते कसे निसटले ह्याची चित्रफीत पाहिल्यावर मग जेव्हा आपण त्या मार्गिकेवर केलेली पदचिन्हे पहातो, तेव्हा तो थरार आपणही प्रत्यक्ष अनुभवत आहोत असेच वाटते. सिंगापूरला असलेल्या स्मारकाची प्रतिकृती देखील आपल्याला कोलकाता येथील नेताजी भवनात पहायला मिळते. 

चौरंगी रोडवरील नेहरू चिल्ड्रेन'स म्युझियम तर पहाच पण त्या आवारात मुलांसाठी चालणारे विविध प्रकल्प देखील जरूर पहा. 

सर्व बाल मित्र मैत्रीणीना आवडतील अशी कोलकाता येथील ठिकाणे म्हणजे Birla Planetorium, Birla museum, Science city आणि वेगवेगळी थीम पार्क्स. ती साधारणपणे सर्व जण पहातातच. पण स्वामी विवेकानंदांचे घर वा नेताजींचे घर पहाण्यासाठी मात्र कदाचित तुम्हाला आई बाबांमागे हट्ट करायला लागेल. चांगल्या गोष्टींसाठी हट्ट करणारी मुले अर्थातच चांगलीच असणार!!!!

आता मी सांगते आहे त्या सगळ्या वास्तू म्हणजे विवेकानंदांचे घर, नेताजींचे घर वा रामकृष्ण परमहंस राहायचे ते घर, हे का पहायचे? त्या महान लोकांचे केवळ घर पहायचे म्हणून? त्यांच्या वापरातील विविध वस्तू, त्यांची छायाचित्रे पहायला मिळावी म्हणून? मला तर नेहमी वाटते की त्या वास्तूत एक प्रत्ययकारी अनुभव आपली वाट पहात असतो. ही सारी माणसे का व कशी मोठी झाली त्याचा विचार करावासा वाटतो. त्यांची शिकवण, त्यांचे कार्य समजून घ्यावेसे वाटते. आपापल्या कुवतीनुसार त्यातले काही आपल्या वागण्यात आणावेसे वाटते. ह्या साठी पहायची असतात ही घरे. नाहीतर फोटो काय आपल्याला घरबसल्या नेटवरूनही पहाता येतातच की!!! 

आता घरबसल्या करता येण्याजोगा आणि बंगाली संस्कृतीचा परिचय करून घेता येण्याचा आणखी एक सोपा उपाय सांगू?बंगाली पुस्तके वाचा!!! आता तुम्ही म्हणाल की, "आम्ही कशी वाचणार बंगाली पुस्तके? आम्हाला कुठे बंगाली भाषा येते? " घाबरू नका. आपल्याला एक युक्ती तर करता येईलच!! बंगाली पुस्तकांची मराठी, इंग्रजी भाषांतरे वाचता येतील ना?!!! 

तुम्ही सत्यजित राय ह्यांचे नाव ऐकले आहे का कधी? खूप प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक होते ते. त्यांना सिनेक्षेत्रातले काय करता येत नव्हते ह्याचा शोधच घ्यावा लागेल. स्क्रिप्ट लिहिणे, दिग्दर्शन करणे, एडिटिंग इत्यादी अनेक गोष्टी ते उत्तम रीतीने करायचे. त्यांच्या अनेक चित्रपटांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बक्षिसे मिळालेली आहेत. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात चित्रकार म्हणून केली. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यातील तुम्हाला आवडतील अशी पुस्तके म्हणजे फेलुदाच्या विविध कथा. फेलुदा हा एक तरुण मुलगा असतो. त्याला रहस्यकथा वाचायला खुप आवडत असतात. रहस्यकथा वाचून, विचार करून तो हळू हळू स्वत: एक डिटेक्टीव बनतो. त्याला मदत करणारा असतो त्याचा किशोरवयीन भाऊ तोपशे!!! 

(हे ऐकून बोक्या सातबंडे आणि त्याच्या दादाची किंवा फास्टर फेणेची आठवण होते ना? अरे, तुम्ही वाचले आहेत की नाही हे दोन्ही? अजूनपर्यंत नसेल वाचले तर आपल्या महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या वाचनालयात बोक्या सातबंडे तसेच फास्टर फेणे ही पुस्तके आहेत, नक्की वाचा. )

आपण फेलुदाच्या साहस कथांविषयी बोलत होतो ना??!!! तर मग फेलुदा वेगवेगळ्या रहस्यांची उकल करत असताना तोपाशे त्याला मदत करत असतो. त्यात त्यांच्यावर कोसळणारी संकटे, येणाऱ्या अडचणी, विचार करून उलगडवलेले रहस्य. पहाता पहाता आपण पण त्यात गुंतत जातो. 

सत्यजित राय ह्यांच्या फेलुदान्च्या गोष्टींची इंग्रजी भाषांतरे तर उपलब्ध आहेतच पण नुकतेच मराठी भाषांतर पण आले आहे. अशोक जैन यांनी मराठी अनुवाद केलेला " Fantastic Feluda "हा १२ पुस्तकांचा संच नुकताच २६ ऑक्टोबर ला प्रकाशित झाला आहे. फेलूदाच्या साहसानी चित्रपट निर्मात्यांना पण मोहात पाडले आहे. त्यावर चित्रपट देखील निर्माण केले गेले आहेत. 

सत्यजित राय ह्यांनी अनेक विज्ञान कथा पण लिहिल्या आहेत. प्रोफेसर शोंकू हा त्यांच्या विज्ञान कथांचा नायक. त्याचे जबरी शोध, साहसे, संकटे हे सगळे वाचायलाच हवे. 

बालामित्रानो, आता येते आहे डिसेंबर ची सुट्टी. त्या सुट्टीत करण्यासाठी बरेच प्रकल्प तुमच्याकडे जमा झाले ना? पण हे सगळे केल्यानंतर रोशोगुल्ला खात खात तुम्ही, "खूब भालो " म्हणाल ह्याची मला खात्री आहे!!!

वृंदा टिळक

Tuesday, 20 May 2014

वंगरंगी रंगले मी -वर्षा

काहिलीसारखी उष्णता तीक्ष्ण शस्त्राच्या वाराप्रमाणे मर्माचा वेध घेत चाललेली. मानवी शरीराची सहन शक्ती पणाला लागलेली. घामाच्या धारांनी उरलेसुरले त्राण पण नाहीसे होत चाललेले. कोरड्या होत जाणाऱ्या गळ्याबरोबरच जणु प्राणही सुकत चाललेले. 

अन अचानक हवेतील गरमी कमी होते. सोसाट्याचा वारा सुटतो. वाऱ्याबरोबर उडणारे वाळूचे कण डोळे उघडे ठेवणे कठीण करतात. काहीतरी आधाराला असल्याशिवाय रस्त्यात उभे राहणेही अशक्य होऊन जाईल एवढा वाऱ्याचा जोर वाढतो. चालणारी माणसे वाऱ्याच्या रेट्याने हे्लकावत झोकांड्या खाऊ लागतात.

वा-यामुळे आपटणाऱ्या दारेखिडक्यांचे आवाज, उंचावरून उडणाऱ्या, पडणाऱ्या वस्तू वातावरण भीतीदायक करतात. काहीतरी होणार आहे, काहीतरी भयंकर घडणार आहे असे वाटायला लागते. वादळापूर्वीच्या शांततेविषयी आपण ऐकलेले असते. पण हे मात्र वादळापूर्वीचे वादळ आहे ह्याची खात्री अंतर्मनाला पटत जाते.

आकाशावर जणु कोणी धारे झाकून टाकावे तसा काळोख पसरतो. ‘नभ मेघांनी आक्रमिले’ ह्या ओळींची अनुभूती येत जाते आणि मग होते पावसाचे आगमन.

भले मोठ्ठाले टपोरे थेंब तडतड ताशासारखा आवाज करीत जमिनीला सडकून काढतात. क्षणभर त्यांची गुर्मी टिकते न टिकते तोच त्या थेंबांची सारी मस्ती वारा उतरवून टाकतो आणि त्यांना पार कुठल्याकुठे वाहून नेतो. भन्नाट वाऱ्यामुळे हवेतच वाहत जाणाऱ्या पावसाच्या लाटा दिसायला लागतात. इतक्या तलम, इतक्या तरल की काही क्षणापूर्वी हाच पाउस तडतडाट करीत जमिनीला झोडपून काढीत होता हे खरे वाटेनासे होते. 

त्याच वेळी आभाळात वीज चमकून जाते. ह्या वीजेच्या चमकण्याने भयचकित झालेले मन जरा कुठे सावरते तोच भयंकर जोरात घनगर्जना होते. जीव धसकतो. हृदयाचे ठोके जलद गतीत पडून स्वत:चे अस्तित्व जाणवून देतात. सारेच प्रियजन सुरक्षित ठिकाणी असतील ना ह्याची काळजी वाटू लागते. कसली तरी अनाम हुरहूर मनात दाटून येते. कसली? माहिती नाही. इतके सारे उन्हाळे-पावसाळे सोसून, भोगून देखील अजूनही कळले नाही.

ह्यावर्षी पहिल्या पावसाचा अनुभव देणारी होती नॉर्वेस्टर्स. उत्तरेकडून, पश्चिमेकडून येणारे थंड वारे, ईशान्य भारतात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि वाढलेली आर्द्रता ह्या साऱ्याच्या परिणामाने येणारे वादळ म्हणजे नॉर्वेस्टर्स. असा वादळाचा अनुभव ह्या आधी ना महाराष्ट्रात कधी आला होता ना सिंगापूरमधे. ही नोर्वेस्टर्स म्हणजे बांगलादेश आणि त्याला लागून असणाऱ्या भारतीय प्रदेशाची खासियत.

 तुफान प्रलयकारी वादळ, त्या बरोबर येणारा पाऊस. त्या पावसाने तापमान ३७ वरून एकदम ३० वर आणून ठेवले हे माझ्यासारख्या अनेक कोलकातावासियांना सुखावून टाकणारेच ठरले. पण कित्येक लोक असेही होते की ज्यांच्यासाठी हे वादळ सुखद नव्हते. कारण त्यांच्या डोक्यावरचे छप्पर वादळाने उडून गेले होते, झाडे पडून घरांची वाताहात झाली होती. अचानक आलेल्या वादळात जे सुरक्षित स्थळी पोचू् शकले नाहीत त्यांना प्राणही गमवावे लागले होते. सरोवराच्या काठी फिरायला गेलेल्या लोकांनी पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली घेतलेला आसरा त्यांना महागात पडला होता. काहीजण जबर जखमी तर दोन जणांना प्राणही गमवावे लागले. खरे तर विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहु नये, हा धडा सगळेच शाळेत शिकलेले असतात. तरी असे कसे होते? शिकलेली विद्या ऐनवेळी विसरले जाण्याचा कर्णाला मिळालेला शाप आपण वारश्यात अजुन भोगतो आहोत की काय?

तरी असे म्हणतात की ह्यावर्षीची वादळे तुलनेने कमी तीव्र स्वरूपाची होती. ह्या वादळाच्या रौद्रभीषण स्वरूपामुळे, त्याने होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानीमुळे आणि प्राणहानीमुळे त्याचे बंगालीतले नावच मुळी, "काळबैषाखी "आहे. सहसा वैषाख महिन्यात काळ होऊन येणारे वादळ म्हणून काळबैषाखी !

मे महिन्यात अशा २/३ छोट्या मोठ्या वादळांनी हजेरी लावल्यावर जूनचा पहिला आठवडा मात्र मॉन्सूनच्या प्रतिक्षेत गेला.

एप्रिल/मे महिन्यात, कडक उन्हात देशातल्या बाकी सगळ्या नद्या पावसाची वाट पाहत आपापली सुकत चाललेली पात्रे सांभाळत होत्या, तेव्हा आसामात मात्र पूराने हाहा:कार माजला होता. ब्रम्हपुत्र नद तसाही भारतीय उपखंडातील इतर नद्यांपेक्षा आगळावेगळाच. बाकी साऱ्या नद्या आपापली स्त्रीलिंगी नावे अभिमानाने मिरवत असताना हा मात्र एकमेव पुरुषी नाव धारण करणारा, नदी नव्हे तर नद!!! पण आपण सवयीने त्याचे, ’तो ब्रम्हपुत्र’ बदलून ’ती ब्रम्हपुत्रा’ करून टाकले आहे !! 

 तिबेट, भारत आणि बांगलादेश अश्या तीन प्रदेशांतून वाहणारा हा नद. आशिया खंडातील मोठ्या नद्यांपैकी एक. पावसात तर ओसंडून वाहतोच पण वसंतातही वितळणाऱ्या बर्फाने फोफावत, आपल्या पूराने थैमान घालतो. तीनही प्रदेशात ह्याला वेसण कशी घालावी, ह्याचा उपयोग कसा करून घ्यावा ह्यावर चर्चासत्रे चालू असतात. आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करत, आपापल्या देशाला उपयोगी असणारे काम घडवून आणणे व दुसऱ्या देशाने केलेल्या उपाययोजनेमुळे आपल्या देशातल्या नदीच्या प्रवाहावर परिणाम होणार नाही ना हे जागरुकपणे बघणे हे या समितीतील तज्ज्ञांचे काम असते. गेली काही वर्षे चीनने ब्रम्हपुत्रवर म्हणजे यार्लुंग त्सांगपो वर एक प्रकल्प उभारला असल्याची कुणकूण होती. चीन मात्र हिरीरीने या वृत्ताचा इन्कार करीत होता. नुकतेच एप्रिल २०१० मधे चीनने आपण एक जल-विद्युत प्रकल्प उभारत असल्याची कबुली दिली आहे. त्याचबरोबर ह्या प्रकल्पाचा भारतातील ब्रम्हपुत्रवर काहीही विपरीत परिणाम होणार नाही ह्याची ग्वाही देखील दिली आहे.

मध्यंतरी बांगलादेश आणि चीनच्या पंतप्रधानांची ब्रम्हपुत्रच्या विषयावर चर्चा झाली अशी बातमी वाचली. आंतरराष्ट्रीय राजकारणात ब्रम्हपुत्र महत्वाची भुमिका बजावणार हे नक्कीच.

ब्रम्हपुत्रवर होणारे प्रकल्प, घातले जाणारे बांध, जलविद्युत प्रकल्प उ्भारले गेले तर ती उर्जा या सगळ्याच ईशान्येकडील राज्यांचे जीवन खूप सुखाचे करतील.

जूनमधे मॉन्सून किती तारखेला कोकण आणि मुंबईत पोचेल ह्याचे वर्तमानपत्रातले अंदाज, महानगरपालिकेने नाले सफाईचे काम पूर्ण झालेले आहे ह्याची दिलेली ग्वाही, आरोग्य संचालनालयाने पाणी उकळून प्या, उघड्यावरचे अन्न खाऊ नका हा दिलेला इशारा ह्या सगळ्याने मुंबई/ठाण्या्त पावसाळा जवळ आल्याची जाणीव होते. पावसाळ्यात पाणीपुरी, भेळ खाता येणार नाही की काय ह्या आशंकेने भरपेट चाट खायला सुरूवात होते. तशीही चातुर्मास पाळायची पूर्वतयारी म्हणुन कांदेनवमी साजरी करायची आपली परंपरा आहेच, नाही का? 

 इथे कोलकात्यातही वर्तमान पत्रातून वेगवेगळे सल्ले यायला सुरूवात झाली, तेव्हाच मनात म्हणले की आला वाटते खरा पावसाळा जवळ. जेव्हा ते सदर वाचायला सुरूवात केली तेव्हा लक्षात आले की अरे हे तर काही वेगळेच आहे प्रकरण. ते सल्ले असे होते, "जागरण कराल तेव्हा फास्ट फूड खाऊ नका. कमीतकमी ४ तास झोप मिळेल ह्याची काळजी घ्या. पॉवर-नॅप्स घ्यायचा आधीपासून सराव करा. महत्वाचे म्हणजे पुरेसा आधी वेळापत्रकाचा अभ्यास करून त्याप्रमाणे शिफ्ट्स बदलून घ्यायचा प्रयत्न करा." 

कोलकात्यातील अत्यंत महत्वाचा मोसम सुरू झाला होता- फूट्बॉल वर्ल्ड कपचा!! दर चार वर्षांनी येणारा हा मोसम भयंकर वादळी, उत्कंठाजनक, भान हरपून टाकणारा आणि हवाहवासा!! तसाही कोलकात्यातील प्रचंड मोठ्या मैदानांवर पावसात भिजत वा उन्हात तापत, भान हरपून फूटबॉल खेळणारे खेळाडू पहाणे, हा एक जिवंत व रसरशीत अनुभव असतो.

खरे तर पाऊस वैशाखाच्या शेवटी वा ज्येष्ठाच्या सुरूवातीलाच सुरू होतो. पण पाऊस म्हटला की भारतीय मनाला न चुकता आठवतो तो आषाढाचा पहिला दिवस आणि अर्थातच मेघदूत आणि मग कवी कालिदास. प्रियेच्या विरहाने व्याकुळ होऊन मेघासोबत तिला निरोप पाठवणारा यक्ष. तिच्या आठवणीने तळमळत असताना देखील विरहाच्या काळात केवळ आठवणच प्राण-विसावा बनू शकते ह्याची अगदी आरपार अनुभूती देणारा. मेघदूताने आजवर किती मनांना आधार दिला असेल, सुखावले असेल त्याची गणतीच नाही.

कालिदासाप्रमाणेच कोणत्याही कवीसाठी किंवा खरे तर कोणत्याही कलावंतासाठी हे किती मोलाचे की त्याच्या नावावरून त्याची कलाकृती ओळखली न जाता, त्याच्या कलाकृतीवरून तो आठवावा !! पावसाचे आणि कवीचे नाते तसेही अतूटच. असे तर नसेल की पाऊस मनाच्या तळातले काही ढवळून टाकत असावा आणि पावसाच्याच उत्स्फूर्ततेने, असोशीने ते मनातले काही शब्दात उतरवायला प्रवृत्त करीत असावा? 

-वृंदा 

-खास ऋतुगंधसाठी,वंगभूमीतून ,वृंदा टिळक.

ऋतुगंध -वर्षा २०१०




Sunday, 30 March 2014

वंगरंगी रंगले मी

 मागच्या ' वर्षा' अंकात आपण बोलत होतो ते पावसाविषयी आणि कवींविषयी. मग तोच धागा धरून बंगालातल्या कवींविषयी लिहायचे ठरवल्यावर सर्व प्रथम नाव आठवले ते कवी जयदेवाचे. 
कवी  जयदेवांच्याच लेखणीतून  अवतरले आहे  राधाकृष्णाच्या भक्तीची अनेकविध रूपे साकारणारे महान काव्य,"गीत गोविंद".कृष्णभक्तीने प्रेरीत होऊन, कृष्णचिंतनात तल्लीन होऊन एका वेगळ्याच भावावस्थेत जयदेव असायचा व त्याच भावावस्थेत त्याने गीत-गोविंद लिहिले असे म्हणतात.
जयदेवाचे जन्मस्थान केंदूली हे ओरिसातले केंदूली की बंगालातले ह्यावर वाद चालू आहे. त्याच्या जन्मस्थानाविषयीचा वाद काहीही असो, बंगालात जयदेव अत्यंत प्रिय आहे. बंगालातल्या केंदुलीला दर मकर संक्रांतीला जत्रादेखील भरते, जी प्रामुख्याने बाऊल कलाकारांसाठी प्रसिद्ध आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या वासूदेवाप्रमाणेच ही बाऊल परंपरादेखील नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे
 कोलकाता मुक्कामी आल्यावर एका मेट्रो स्टेशनच्या नावाने माझे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे कवी नझरूल. शिवाय एका रस्त्याचे नावही दिसले काझी नझरुल इस्लाम. १८९९ मधे एका गरीब मुस्लीम घरात जन्मलेला हा मुलगा. धार्मिक शिक्षण  त्यांनी घेतले होते, पण काव्य, नाट्य, साहित्य, संगीताशी त्यांचा संबंध आला तो नाटक कंपनीबरोबर काम करताना. पुढे ब्रिटिश सरकारची काही काळ चाकरी देखील केली. मग ती नोकरी सोडून देऊन कोलकाता येथे पत्रकार होण्याचे त्यांनी ठरवले. ब्रिटिश सरकारच्या जुलुमांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या कवितांमूळे विद्रोही कवी असा जनमानसाकडून किताब मिळाला आणि त्याचवेळी ब्रिटिश सरकारने अनेकदा लादलेला कारावासही सोसावा लागला. त्यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आजही " नझरुल गीती  " ह्या नावाने प्रसिद्ध आहेत. लघूकथा, कादंबरी, निबंध आदि अनेक प्रकारचे लेखन केले असले तरी त्यांची प्रामुख्याने ओळख कवी नझरुल हीच राहिली. बंगाली गझल हा नवा काव्यप्रकार त्यांनी लिहिला
दुर्दैवाने.तरूण वयातच त्यांना एका असाध्य रोगाने पछाडले आणि वाचा व स्मृती गमवावी लागली. अगदी शेवटी बांगला देश सरकारच्या निमंत्रणावरून ते बांगलादेश मधे वास्तव्यास गेले व तिथेच त्यांचे निधन झाले.
जे कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत आणि तरी त्यांच्या एका कवितेला त्या कादंबऱ्यांपेक्षाही अमाप प्रसिद्धी मिळाली, एवढेच नव्हे तर स्वातंत्र्यलढ्यात त्या  कवितेने मंत्राचे काम केले, त्या वंदे मातरम चे लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हेही बंगालचेच. एक कविता काय करू शकते, कसा इतिहास घडवू शकते ह्याचे वंदे मातरम ’ हे समर्थ उदाहरणच आहे.

          हे सर्व कवी प्रसिद्ध असले तरी  बंगालवर ज्या कवीची नाममुद्रा उमटली आहे ते म्हणजे कवीकुलगुरू रवीन्द्रनाथ ठाकूर. असा कर्तृत्ववान माणूस तर खरोखरीच विरळाच.काव्य, कथा, कादंबरी, नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला, शिक्षण साऱ्याच क्षेत्रांत गती असलेला आणि तरीही ज्याचे कवीपण ह्या साऱ्यांतून झळकत रहाते असा हा कवी. खुद्द रवीन्द्रनाथांनीही माझा धर्म कोणता असे विचाराल तर तो कवीचा धर्म आहे असे म्हटलेले आहे.
     कोलकाता येथे अनेक रस्त्यांना, इमारतींना, मेट्रो स्टेशनला रवींद्रनाथांचे नाव दिलेले आढळते. त्यांचे वंशपरंपरागत घर असलेल्या कोलकाता येथील ’ जोराशंको ठाकूरबारी ’ ह्या वास्तूत रवींद्रनाथांचा जन्म झाला. आता त्या भव्य इमारतीत रवींद्रभारती विद्यापीठ व संग्रहालय आहे.
     रवीन्द्रनाथांचे ’ शांतीनिकेतन ’ हे तर जगभरातल्या लोकांना मोहवणारे एक महाकाव्यच. शांतीनिकेतनाविषयी मी  इतके सारे वाचले होते, ऐकले होते की तिथे प्रत्यक्ष  जाणे हा केवळ, फक्त एक उपचार उरला आहे असे वाटत होते. तसेच  एखाद्या गोष्टीविषयी खूप ऐकलेले असावे आणि प्रत्यक्षात मात्र भ्रमनिरासच व्हावा, असे शांतीनिकेतनच्या बाबतीत तरी  होऊ नये अशी मनोमन प्रार्थना करीतच शांतीनिकेतनाला जायला निघाले. 
      वैश्विकीकरणाच्या रेट्यामूळे बाकी सगळ्या महानगरांसारखेच  बनू पहाण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असलेले कोलकाता तोपर्यंत माझ्या ओळखीचे झाले होते. मॉल्सच्या शिळ्या, थिजलेल्या थंडगार हवेत फिरताना ह्या प्रदेशाची  ही ओळख फार वरवरची व अपूरी आहे, खरा बंगाल तर आपल्याला अजून भेटलाच नाही अशी रुखरुख सतत मनात होती. 
     कोलकात्यापासून २०० कि.मी. अंतरावर असलेल्या शांतीनिकेतनाला जाण्याचा रस्ता मात्र ह्या रुखरुखीवर चंदनलेप लावून गेला. ग्रामीण बंगालचे सुखद रूप पहायला मिळाले. खरे तर ह्या वर्षी  बंगालातील काही जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. पाण्याअभावी करपलेली रोपे पहायला लागणार की काय ही आशंका मन कुरतडत होती.
     पण माझ्या भाग्याने मला पुन्हा एकदा योग्य वेळी योग्य ठिकाणी नेले होते. नुकत्याच झालेल्या पावसाने हिरवीगार दिसणारी झाडे, भाताच्या लवलवत्या शेतांनी दिलेले नव्या नव्हाळीचे हिरवेपण, अधून मधून आढळणारी केळीची बाग वा आमराई, ताडाची व नारळाची झाडे, शाकारलेली घरे, सतत सोबत करणारी अनेक छोटी छोटी तळी, निवांत चरणारी गूरे, शेतात, पाण्यावर, गूरांच्या पाठीवर बसलेले पक्षी.सारेच जणू स्वप्नवत होते.  कुठल्यातरी दूसऱ्याच जगातले असावे तसे आणि ह्या जगातले सारे व्यापताप विसरायला लावणारे होते.
ह्या प्रवासात नव्याने पहायला मिळाली ती तागाची शेती. ह्या परिसरात तागाचे सगळी रूपे व अवस्था पहायला मिळाल्या. लवलवत्या सुकुमार सडपातळ तरूणीप्रमाणे  तागाचे रोप असते. झाडांच्या जमातीतील ताग ही झिरो साईझवाली अभिनेत्री असावी! एका विशिष्ट उंचीपर्यंत वाढताच ती रोपे  कापून ,पाण्यात भिजवून ठेवतात. ह्यासाठी शेताच्या कडेकडेला खाचरे करून पाणी साठवलेले असते. ती बराच काळ भिजल्यावर म्हणजे जवळपास कुजल्यावर, त्यातून हाताने ओरबाडून त्याची साल काढतात व मधल्या कडक काठ्यांच्या मोळ्या बांधून उन्हात वाळत ठेवतात. जी साल निघालेली असते ती कापडाप्रमाणे दोरीवर, कुंपणावर वाळत ठेवतात. त्यातूनच तयार होतो रेशमाप्रमाणे चमचमणारा ज्यूट. त्याचे मोठाले गठ्ठे बांधून मग तो रवाना होतो. अक्षरश:  प्रत्येक भागाचा उपयोग होत असल्याने ही झाडे म्हणजे शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्षच. शाळेत असताना गाळलेल्या जागा भरा ह्या प्रश्नातील , {भारतातील तागाची सर्वात जास्त लागवड ----- ह्या राज्यात होते },त्याच राज्यात मी प्रवास करीत होते व तागाची लागवड प्रत्यक्ष पहात होते !
अशा सुंदर रस्त्यांवरून प्रवास करीत करीत आपण शांतीनिकेतन व श्री निकेतन परिसरात पोचतो.रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी साधी, देखणी घरे, अंगणात उभारलेली शिल्पे, सृजनचे  प्रवेशद्वार, सुगंधाची लयलूट करणारे वृक्ष आपल्याला आपण कलावंताच्या जगात प्रवेश करतो आहोत ह्याचा प्रत्यय देत रहातात. एक मातीचे छोटेसे घर आपले लक्ष वेधुन घेते. त्याच्या छपराच्या मधोमध तालवृक्षाचा शेंडा डोकावत असतो. झाडांवर प्रेम असल्याने, झाड तसेच ठेवून त्याच्या भोवती आपले घर बांधणाऱ्या तेजेशचंद्र सेन ह्या शांतीनिकेतनातील पहिल्या पिढीच्या शिक्षकाच्या रसिकतेला आपण मनोमन दाद देतो.

पूढे गेल्यावर झाडांखालच्या वर्गांच्या जागा दिसतात. अजूनही शाळेचे वर्ग तिथेच भरतात. शिक्षकांसाठी एक छोटा चबूतरा आणि विद्यार्थी त्यांच्या भोवती बसतात. विद्यार्थी व शिक्षकांची आसने मिळून एक वर्तुळाकृती पूर्ण होते. ह्यावर्गांवर सावली ढाळत उभे आहेत ते बकूल व आम्र वृक्ष. ह्या भागाचे नावच मूळी बकूळविथी व आम्रविथी असे आहे. विथी म्हणजे रांग. वर्गात विद्यार्थी अभ्यास करत आहेत. नजर जाईल तिकडे त्यांना भव्य वृक्ष दिसत आहेत. वाऱ्याच्या एखाद्या झुळकीबरोबर आकाशातून बकूळपुष्पे तरंगत खाली येत आहेत. हे कल्पनाचित्रदेखील किती सुखावणारे आहे ना !

        
शांतीनिकेतनाचे स्वप्न रवींद्रनाथांनी पाहिले तेच मूळी भारतीय संदर्भ घेत, विश्वभरातले ज्ञान देणारी,बंदिस्त नसलेली अशी गुरू कूल पद्धतीची शाळा उभारायची हे मनाशी पक्के करून. शांतीनिकेतनाच्या अनेक गुणवान विद्यार्थ्यांपैकी आपल्या सगळ्यांनाच माहिती असलेली नावे म्हणजे सत्यजित राय, अमर्त्य सेन व वर्ष /दोन वर्षे तिथे शिकलेल्या इंदिरा गांधी. अमर्त्य हे नामकरणदेखील रवींद्रनाथांनी केले असे म्हणतात. अमर्त्य सेन ह्यांचे एक घर ह्या परिसरात आहे जिथे त्यांच्या मातोश्री शेवटपर्यंत रहात होत्या.
शांतीनिकेतनातील इमारतींची, रस्त्यांची,भागांची नावेदेखील रसिक व कवीवृतीची निदर्शक आहेत. सारीच नावे सुंदर व अर्थगर्भ.
विद्यापीठातील निरनिराळे विभाग पहात पहात आपण येऊन पोचतो, ’ उत्तरायणात. ’ उत्तरायण हा ठाकूर कुटुंबियांनी  निरनिराळ्या वेळी बांधवून घेतलेल्या व रवीन्द्रनाथांनी  वास्तव्य केलेल्या घरांचा समूह आहे.
सध्या तिथे उभ्या आहेत त्या उदयन, कोणार्क, श्यामली, पुन:श्च व उदिची ह्या वास्तू. विविध वास्तूशैलींच्या संगमाने बनलेले उदयन लक्षवेधक आहे. ह्याच वास्तूतून रवींद्रनाथ अगदी शेवटी बोलपूरहून कोलकात्यास उपचारांसाठी गेले. " कोणार्क " मधे एक प्रदर्शनी लावलेली आहे. ’श्यामली’ आहे कवीच्या स्वप्नातले मातीचे घर. ते काही वर्षांनी गळायला लागल्यावर नव्याने बांधलेली वास्तू ती "पुन:श्च ". "पुन:श्च " मधे कोंडल्यासारखे वाटायला लागल्यावर कवीला हवेसे वाटले ते खुलेपणाचा अनुभव देणारे ,चहूबाजूंनी क्षितिज दिसणारे घर,ते  झाले "उदिची "ही सगळी नावे कवीराजांच्या कवितासंग्रहांची नावे म्हणून आपल्याला माहिती असतात. ' उदिची ' च्या शेजारी आहे,कवीराजांचा हस्तस्पर्श व निगराणी लाभलेली मोठी व फुलांनी बहरलेली बाग.
         ह्या परिसरात आणखी एक केवळ साहित्यात वाचलेले,ऐकलेले सुखनिधान लाभले ते म्हणजे " माधोबी" (माधवी ) ची फुले व वेल  प्रत्यक्ष पहायला मिळाले हे. रवींद्रनाथांच्या कवितासंग्रहाचे नाव म्हणुन तसेच इतरही जुन्या साहित्यात माधवी ह्या फुलांचे नाव अनेकदा ऐकले होते. पण ती प्रत्यक्ष कधी पाहिली नव्हती.त्याचा मंद सुगंध अनुभवला नव्हता. ती माधवी भेटली ती कवीच्या वास्तव्याने पूनीत झालेल्या परिसरात व योगायोगाने ज्या वेळी सिगापूरात शब्द-गंध सुरू असणार होता त्याच वेळी. 
    तिथे जवळच ऑगस्ट आला तरी अजुनही फुलत राहिलेला बहावा भेटला. बंगालीतले त्याचे नाव म्हणे ’ बांदरलाठी ’  म्हणजे माकडाच्या शेपटीसारखे घोस असणारे. पण इतके रुक्ष नाव वापरतील तर ते बंगाली लोक कसले ! नक्की नांव विचारले नाही, पण साधारण तशाच प्रकारच्या आपल्या 'संकासुरा' ला ते म्हणतात,’राधाचुरा’ म्हणजे राधेचा केशसंभार !! राधेचे केस इतके कुरळ्या लटांचे व सुंदर  असतील अशी कल्पना करून त्या झाडाचे नामकरण करणाऱ्या रसिकतेला सलाम ! विविध  छटांच्या जांभळ्या फुलांचे घोस असणाऱ्या झाडाला म्हणतात ’जारूल’.तशाच प्रकारच्या गुलाबी फुलांच्या झाडाला 'गोलोपी' म्हणतात की आणखी काही ते मात्र  विचारायचे राहूनच गेले.
  त्याच परिसरात आहे  ’ विचित्रा ’ ही वास्तू. तिथे एक कायमस्वरूपी संग्रहालय तसेच वाचनालय आहे. मूळ नोबेल पारितोषिक गहाळ झाल्याने आता त्याची प्रतिकृती आपल्याला पहायला मिळते. त्या गहाळ होण्याविषयी ह्या लेखात काही न लिहिलेलेच बरे.
       शांतीनिकेतनातील सुविधा,व्यवस्था ह्या त्या काळच्या किंवा ५० वर्षांपूर्वीच्या शांतीनिकेतनाला योग्य अशाच आहेत.तिथेच विश्वभारती विश्वविद्यालय पण आहे.सरकार दरवर्षी करोडो रुपयांची मदत करते. तरीदेखील ह्या सर्व परिसराला डागडुजीची,सुव्यवस्थेची गरज आहे असे सतत भासत रहाते. जाताजाता दोन घटनांचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. 
    संग्रहालयाजवळच्या पुस्तकांच्या दुकानात गेले असताना पूर्ण दुकान अस्ताव्यस्त होते.हे कशामूळे असे विचारले असता,तेथील विद्यार्थ्यांनी केले असे तो कर्मचारी म्हणाला .गेले दोन महिने फी वाढीविरुद्ध विद्यार्थी आंदोलन तिथे चालू होते. तसेच विश्वभारतीचा मानबिंदू व खासियत असलेला वसंतोत्सव यावर्षी विद्यार्थ्यांच्या निदर्शनांमुळे होऊ शकला नाही हे  ही आपल्याला माहिती आहेच.
      का होते आहे हे सारे? विद्यार्थ्यांच्या मागण्यांत काही तथ्य आहे की राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपामूळे हे सारे होते आहे? याला अनास्था जबाबदार आहे की भ्रष्टाचार? ह्याविषयी पुन्हा कधीतरी बोलू या.असो.
   तेथील संग्रहालयात रवींद्रनाथांची छायाचित्रे,त्यांच्या उपयोगात असणाऱ्या वस्तू तसेच त्यांनी काढलेली चित्रे,ते वाजवत होते ती वाद्ये एवढेच काय त्यांनी केलेले अप्रतिम लाकूडकाम,त्यांनी तयार केलेली पाठ्यपूस्तके हे सगळे तिथे आपल्याला पहायला मिळते. एक माणूस एवढा गूणवान कसा असू शकतो ह्याचा अचंबा परत परत वाटत रहातो. अवघ्या दीड शतकापूर्वी होऊन गेलेल्या व कर्तृत्वाचे  प्रत्यक्ष पूरावे असलेला हा चमत्कार पहाताना मन भारावून जाते.       
    रवींद्रनाथ तर कधीच बंगालच्याच काय पण भारताच्याही सीमा ओलांडून विश्वकवी बनलेले आहेत.पण .आत्ता  खुद्द बंगालात त्यांची किती जणांना माहिती आहे,त्यांच्या साहित्याचा परिचय आहे याची मला उत्सुकता होती.मी घरकामात मला मदत करण्यासाठी येणाऱ्या मुलीला विचारले की तुला ह्यांची कविता पाठ आहे का एखादी? तिला कविता पाठच काय पण  माहितीदेखील नव्हती.अर्थात शिक्षणाशी तिचा संबंधच आलेला नाही.त्यामूळे एखाद्या माहिती असलेल्या "गानाचे" कर्ते ते रोबीन्द्रोनाथच हे तिला माहिती असणार नाही.. साहित्य,कला ह्या सगळ्या भरल्या पोटी करायच्या गोष्टी आहेत हे खरे आहे की काय? खरेच हे  खरे असावे की काय?असा विचार मी करीत राहिले.
    नंतर मी तिला  विचारले,"तुला हे रोबिन्द्रो्नाथ ठाकूर कसे माहिती मग ?"तेव्हा ती उत्तरली,"टी.व्ही.वर त्यांचा फोटो दाखवतात ना?"त्यांच्या जन्माला १५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने इथे अनेक कार्यक्रमांचे आयोंजन सतत चालू असते..
  नंतर रविंद्र सदन व नंदन हा कला अकादमीसारखा साहित्य तसेच नाट्य,चित्रपटविषयक घडामोडींचा  परिसर बघत असताना, काही तरूण मूलींशी संवाद साधला.त्यांना रवीन्द्रनाथ किती माहिती आहेत,जवळचे आहेत ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्यांना अभ्यासात तर रविन्द्रनाथांची कविता,नाट्य उतारे होतेच .शिवाय आता आपापले  नोकरी व्यवसाय सांभाळून काही जणी रविन्द्र संगीत शिकत होत्या तर काहींनी रविन्द्र शैलीतील न्रुत्योनाट्यो चा अभ्यास केलेला होता. रविन्द्रनाथांच्या समग्र साहित्याचे वाचन करायचे आणि कलांचा आस्वाद घ्यायचा तर एक जन्म अपूराच अशीच त्या मूलींची भावना होती. मग घरी येणाऱ्रया इलेक्ट्रीशियन,प्लंबर,सुतार आदि मंडळींना रवीन्द्रनाथ किती माहिती आहेत ह्याचा शोध घेण्याचा उपक्रम मी सुरू केला. बऱ्याचजणांना एखादे रोबिन्द्रोगान पूर्वी येत होते. आता मुखोद्गत नसले तरी कोणी सुरुवात केली तर आपल्याला ते पूर्ण म्हणता येइल हा विश्वास होता.कोणी कधीतरी रोबिन्द्रोसंगीत ऐकलेले होते.ह्या सगळ्यांशी बोलल्यावर रवीन्द्रनाथ हे केवळ एक दंतकथा बनून रहाणार नाहीत व कलाक्षेत्रातील उच्चभृंची मक्तेदारी बनून रहाणार नाहीत,तर जनसामान्यांच्या जगण्यात ते झिरपत रहातील,विचारात फूलत रहातील हा दिलासा मिळाला.
       अर्थात रवीन्द्रनाथांमूळे त्यांच्या जगण्यात,विचारात कसा व किती बदल झाला,त्यांच्या आयुष्यावर किती प्रभाव पडला हे जाणून घ्यायचे तर मला ह्या कारागिरांशी संवाद साधता येणारी बंगाली भाषा शिकून घ्यायला हवी. तेव्हा तो प्रकल्प भविष्यकाळासाठी राखून ठेवला आहे ! 
    ठाकूर घराण्यात दत्तक गेलेले द्वारकानाथ म्हणजे रवीन्द्रनाथांचे पूर्वज.रवीन्द्रनाथ धरून त्यांच्या वडिलांना एकूण १५ मुले झाली. नियतीच्या अजब खेळाने आजमात्र  त्यांच्यापैकी कोणाचाही ,एकही वंशज आज हयात नाही.मूलींची मुले,नातवंडे  देखील नाहीत. त्यांचा संपूर्ण वंशच खुंटला असे आमचा मार्गदर्शक पुन्हा पुन्हा खेदपूर्वक सांगत  होता.मला त्याला म्हणावेसे वाटले ," ही सारी ग्रंथसंपदा,रोबीन्द्रोसंगीत, हे आहेच की वंशाचे  नाव चालवायला पूरेसे."
      नुकतेच मला असे कळले आहे की रवीन्द्रनाथ कोलकात्यात रहायचे ती जोराशंको ठाकूरबारी,विश्वनाथ दत्तांचे घर,( जिथे त्यांचा नरेन्द्र नावाचा मुलगा,जो पुढे विवेकानंद ह्या नावाने जगविख्यात झाला तो रहायचा) , शिवाय जगदीशचन्द्र बसू व प्रफ़ुल्लचन्द्र राय ह्यांची घरे हे सारे चालत चालत १०/१५ मिनिटांच्या परिसरात आहे. दोख्खिनेश्वर ही काही मग फार दूर नाही. शिवाय नावेत बसून गंगा ओलांडली की त्या तीरावर बेलूर आहेच. ह्या सगळ्यापासून थोडे दूर पण कोलकात्यामधेच नेताजी भवनही आहे. किती जादूई व भाग्यवान  माती असेल ती,जिथे अशा नररत्नांचे वास्तव्य झाले,त्यांचे कर्तृत्व  बहरले !.
    
        .
     
     

Thursday, 27 March 2014

खेळ मांडियेला

८-८-८ ला सुरु झालेल्या बिजिन्ग ओलिम्पिक्स मधे मायकेल फ़ेल्प्सने आठव्या दिवशी आठ सुवर्णपदके आपल्या खात्यात जमा करुन स्वतःचे नाव ऑलिम्पिक्सच्या पटावर कायमचे कोरुन ठेवले. त्या आधी भारताने मिळवलेले पहिले वैयक्तिक सुवर्णपदक, सिंगापूरचे रजत पदक ह्या मुळे सगळीकडे खेळांचीच चर्चा चालू आहे. वर्तमानपत्रे, टेलीव्हीजन, नेट सारी माध्यमे खेळांविषयीच्या माहितीने ओसंडून वहात आहेत. अशा वेळी स्मरणिकेसाठी लिहीताना माझ्या आवडीच्या खेळांविषयी मी लिहीले नाही तर वाचकांचे फ़ार मोठे नुकसान(!!!) होइल, ह्याची जाणीव मला झाली आणि त्यामुळे ह्याच विषयावर लिहायचे मी ठरवून टाकले.

मला आठवणारा अगदी पहिला खेळ म्हणजे ठिकरी किंवा चिरकी. एक चपटा दगडाचा तुकडा आणि चौकोन आखायला एक खडू किंवा विट्करीचा तुकडा एवढीच सामग्री त्याला पुरायची. एक-एक चौकोन पार करत मजल जेव्हा घर बान्धण्यापर्यन्त यायची तेव्हाच नेमकी घरातून हाक यायची. मग आखलेले चौकोन तसेच ठेवुन आम्ही घरी जायचो, ते संधी मिळताच परत येउन डाव सुरू करण्याचे ठरवुनच! 

प्रतिस्पर्ध्याचे घर ज्या चौकोनात असेल तो चौकोन ओलांडून जावे लागे, अन्यथा आउट होण्याची भीति असे. म्हणुनच जेव्हा जेव्हा मी "जिस गली मे तेरा घर ना हो बालमा, उस गलीसे हमे तो गुजरना नही" ऐकायची, तेव्हा तेव्हा '"अरे, आउट होशील ना मग, घरावरुन गेलास तर..त्या पेक्षा घर नसेल तिथून जा बाबा" असे मनात येउन जायचेच!!! तेव्हा सगळ्यांच्या दारासमोर असे आखलेले चौकोन दिसायचेच. परवा अचानक आमच्या नेबरहुड पार्क मधे दोन मुले चिरकी खेळताना दिसली तेव्हा विश्वबन्धुत्वाच्या भावनेने माझे मन भरुन आले!

 दुसरा जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे क्रिकेट. हा खेळायचा नसे तर ऐकायचा असे! रेडिओवर कॉमेन्ट्री ऐकत असलेल्या बाबांशेजारी बसुन रहाणे, हा मोठा आनंद असायचा. घरातली कामे तसेच गृहपाठ व बाकी अभ्यास चुकवायसाठी ह्यापेक्षा सुरक्षित जागा दुसरी कोणती सापडणार? पण एकदा बाबांनीसुद्धा "जा आता अभ्यासाला " असे सांगितले तेव्हा जे वाटले,ते "you too Brutus.."ला समांतर होते असे मोठे झाल्यावर लक्षात आले!!!

 शाळेतून घरी यायचे, जेवायचे, थोडाफ़ार अभ्यास असायचा तो उरकुन टाकला की मग चार कधी वाजतायत त्याची आम्ही वाट पहात असायचो. कारण चार वाजता आम्हाला खेळायला जायला मिळायचे. ज्या काळी भारतात पण कॉलनीत खेळाची मैदाने असायची व मुलांनी संध्याकाळी खेळायला जायची पध्दत होती तेव्हाची गोष्ट आहे ही !!! खूप मुले असायची खेळायला आलेली. मग दोन टिम करून सुरू व्हायचा बेसबॉल. तेव्हाच्या चिमुकल्या जगातली सर्वात मोठी काळजी असायची, ती ही की सगळीच जण बेस वर राहिलो आणि बॅटिंगला कोणीच नाही उरले तर??? तसे अधुन मधून बास्केट बॉल,थ्रो बॉल पण खेळायचो. सगळ्यांच्या हाताची आणि पायाची मिळून बरीचशी बोटे मुरगळली गेली कि आपोआप आम्ही परत बेसबॉल कडे वळायचो.

फ़क्त टिममधे खेळुन भागत नाही, तुम्हाला वैयक्तिक पण काही गेम खेळता यायला लागतात, हे कळायचे वय आले आणि मग आयुष्यात आले बॅडमिंटन. खुपच धम्माल यायची. त्या शटलची माझ्या रॅकेट बरोबर काय दुष्मनी होती माहिती नाही, ते दोघे कधी एकमेकांना भेटायचेच नाहीत!!! जर का कधी चुकून शटलची आणि रॅकेट्ची भेट झालीच तर शटलला नन्तर नेटविषयी एवढा आदर निर्माण व्हायचा की ते 'पाय लागू 'म्हणत नेटच्या पायाशी !! त्यालाही माझी हरकत नसायची, पण निदान नेट्च्या त्या बाजूला तरी त्याने जावे की नाही? तर ते नाहीच...जुन्या काळच्या खानदानी स्त्री प्रमाणे ते आपले उंबरठ्याच्या म्हणजे नेट्च्या आतच !!

अशी माझ्या क्रीडाजीवनात अनेक स्थित्यन्तरे होत होत आता मी स्थिरावले आहे "स्पायडर सोलिटेर "वर. तो जगातला सर्वात चांगला खेळ आहे असे सध्या तरी माझे ठाम मत आहे. आपले वाढलेले वजन, आळशीपणा, नेट कनेक्शन उपलब्ध नसणे काही म्हणता काहीही त्याच्या आड येत नाही. काहीतरी काम करायला कॉम्प्युटरवर बसावे. एखादी रिक्वेस्ट 'स्टील वर्किंग 'असल्याची संधी साधुन गेम सुरु करावा मग तिकडे कीतीही वेळ "स्टिल वर्किंग" राहीले तरी वाइट वाटत नाही!!! गाणी लावावीत आणि खेळायला सुरुवात करावी. स्पायडर सॉलिटेर..अहाहा काय खेळ आहे म्हणुन सांगू! समता शिकावी तर ती इथेच. 


लहान थोर असा, कोणत्याही वर्णाचे, धर्माचे, पंथाचे असा, सिटिझन असा, PR असा वा DP वर असा, कोणीही खेळायला सुरुवात करा, तुम्हाला ५०० गुण बहाल होतात. मागच्या जन्मीच्याच काय पण अगदी मागच्या डावातल्या चुकांचा पण इथे हिशोब नाही. तुम्हाला मिळालेले गुण तुम्ही किती वाढवायचे ते तुमच्या कौशल्यावर अवलंबुन.

डिफिकल्टी लेव्हल कोणती ते ठरवायचा अधिकार पण आपल्यालाच. "तुमची यत्ता कन्ची??" ह्याचा न्यायनिवाडा व्यवहारी जग पावलोपावली करायला टपलेले असताना, खेळात का होइना, पण आपली लायकी आपण ठरवण्याचे स्वातंत्र्य मनाला सुखावून टाकते. पुढचा धडा लगेच हजर असतोच, तो हा की पात्रतेपेक्षा स्वतःची लायकी जास्त आहे असे समजाल तर अपयश ठरलेलेच!!

एकदा का तुम्ही लेव्हल ठरवलीत की खेळाला सुरुवात!! ह्या जगात किलवर,चौकट वगॆरे मंडळी नाहीतच असे समजून फ़क्त बदाम, इस्पिक ह्यानाच घेउन जोरात खेळ सुरु. लोकशाहीसारखेच....विरोधकांना आधीच नेस्तनाबुत करायचे वा खरेदी करायचे आणि मग व्यापक पाठिंबा असल्याची वल्गना करायची. इथे तर विरोधकांचे नामोनिशाणच नाही. फ़क्त राज्यकर्ते बदाम, इस्पिकच. आपल्यापुरते छोटेसे वर्तुळ आखावे, तेवढाच परिघ आबादीआबाद करुन टाकावा आणि जगात कुठे दुःख नाहीच म्हणत सुखात जगावे तसेच त्या दोघानाच खेळात घ्यायचे…

आयुष्यातला आणखीही एक नियम इथे चालतो. आपला फ़ायदा महत्वाचा.मार्क कशाने वाढणार आहेत? तर लाल वर लाल आणि काळ्यावर काळे पान लावल्याने. म्हणजेच असे की फ़ायदा असेल तर आणि तेव्हाच स्वजनांना जवळ करा. फ़ायदा नसेल तेव्हा स्वजन म्हणून मोहात पडण्याची जरुरी नाही, खुशाल परकियाना जवळ करा. लाल वर लावण्याजोगे लाल पान नसेल,पण काळे पान लागत असेल तर संधी सोडू नका. एक खेळी वाया घालवू नका.

 एवढे सगळे तुमच्या लक्षात राहिले की मग मैदान तुमचेच की! पण सगळे नियम, डावपेच वापरुनही कधी कधी वारंवार हार पत्करायला लागते, तेव्हा लक्षात ठेवायचे,

एखादा दिवस आपल्यासाठी नसतोच

एखादा डाव जिंकायसाठी नसतोच

हरलो म्हणुन निराश व्हायचे नसतेच

 पुन्हा प्रयत्न केल्यावाचून रहायचेही नसते.

परत परत रिस्टा्र्ट करत आपण गेम खेळत रहातो, कधीतरी अचानक डाव लागुन जातो आणि मग वाटते कि "अरे, हे इतके सोपे! मला इतका वेळ कसे जमले नाही?"

इथे चुका दुरुस्त करायची संधी पण आहे,अर्थात त्यासाठी मार्कांची किंमत मोजायला लागतेच. पण चुका दुरुस्त करण्यासाठी लागणारी मार्कांची किंमत आपण देउ शकतो हे ही नसे थोडके!!

सर्वात सुंदर क्षण असतो 'you won" सांगून आतषबाजी करणारा. मी सुरुवातीला त्याने किती हरखुन जायची ते मला अजून आठवतेय. पण आता मी मोहावर मात करुन कर्तव्य महत्वाचे मानायला शिकलेय. मी ती आतषबाजी पहाण्यात वेळ वाया न घालवता लग्गेच दुसरा डाव सुरु करते!!!!


स्पायडर सॉलिटेर खेळताना माझी अगदी ब्रम्हानंदी टाळी लागते. स्वैपाक, घरकाम असल्या क्षुद्र गोष्टी मला ध्येयापासून परावृत्त करू शकत नाहीत. मी खेळतच रहाते!! एवढेच काय लिखाणाच्या डेड्लाइन्स पण अगदी शेवटच्या क्षणी गाठते. आज १९ तारखेला मी हा लेख टाइप करते आहे ह्यावरुनच ओळखा काय ते!!

म्हटलेच आहे ना, खेळ मांडियेला कॉम्पुटर ठायी.. क्लिकती बोटे माउसवर रे//

-वृंदा टिळक 

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर स्मरणिका २००८

Wednesday, 26 March 2014

शून्यात गरगरे झाड

  "अंधार असा घनभारी चन्द्रातुन चन्द्र बुडले

 स्मरणाचा उत्सव जागुन जणु दुःख घराला आले 

दाराशी मी बसलेला दुःखावर डोळे पसरुन

 क्षितिज जसे धरणीला श्वासानी धरते उचलुन 

विश्रब्ध किनारे दूर जाऊन कुठे मिळताती 

जणु हृदयामागून माझ्या झाडांची पाने गळती

नाहीच कुणी अपुले रे प्राणांवर नभ धरणारे

दिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंदविणारे "

 प्राणावर नभ धरणारे कोणी नसल्याची खंत..दु:ख, वास्तव आणि कल्पना यांचे असे काही गूढ मायाजाल तुम्ही निर्माण करायचात .... की त्या नादमयी अनोख्या शब्दांच्या प्रेमात पडण्याखेरीज दुसरा काही पर्यायच उरायचा नाही.

" ही माझी प्रीत निराळी संध्येचे शामल पाणी 

दु: खाच्या दंतकथेला डोहातून बुडवून आणी

हाताने दान कराया           पोकळीत भरला रंग

तृष्णेचे तीर्थ उचलतो रतीरंगातील नि: संग

शपथेवर मज आवडती      गाईचे डोळे व्याकूळ

 घनगंभीर जलधीचेही        असणार कुठेतरी मूळ

आकाश भाकिते माझी नक्षत्र ओळ ही दंग 

 देठास तोडतानाही          रडले न फूलांचे अंग

तुम्हाला दिसणारे आकाशच वेगळे होते. संध्यारंग ल्यालेले. ना आदी ना अंत असे घनव्याकूळपण बरसवणारे तुम्ही...घन गंभीर जलधीचेही असणार कुठेतरी मूळ....शोधायचेच झाले तर मग विचार करावा लागेल की कसे होतात तुम्ही? ते तर कधी कुणाला सांगताच आले नाही. कारण तुमच्या सारखा झंझावाती वारा, हातून निसटणारा पारा असा का सहज शब्दात मावणार होता? 

ग्रेस हे नाव तुम्ही घेतलेत ते परमेश्वरी कृपा ह्या अर्थाने. पण खरोखरीच तुम्ही मराठी काव्य सृष्टीची "ग्रेस "होतात. तुमची सही देखील 'पोएट ग्रेस ' अशी.कवीपणाचा दिमाख मिरवणारी. हे कवीपण जपणे सोपे नव्हतेच. ते जपण्यासाठी तुम्हाला काय काय सहन करावे लागले ते तुमचे तुम्हालाच माहिती. असा कवीपणाचा पेटता निखारा हातात धरून ठेवत, तो दाह तुम्ही सतत जागता ठेवलात. त्याची धग तुमच्या कवितेतून सतत जाणवत राहिली. 

कोणत्याही परंपरेत बसवता येईल अशी तुमची कविता नव्हतीच कधी, ना तिच्यावर कोण्या पूर्वसुरींचा उमटला होता ठसा. ती होती संपूर्णपणे स्वयंभू. तिच्यावर उर्दू काव्याचा वा इंग्रजी काव्याचा प्रभाव आहे असेही म्हटले गेले. तुमच्या कवितेची म्हणावी तशी दखलही घेतली गेली नाही. पण ह्या कशाचाच परिणाम करून न घेता, सगळ्या चर्चेपासून अलिप्त रहात तुम्ही लिहित राहिलात. एकटेपणा,अलिप्तता आणि विरक्तीच्या मार्गावर चालत राहिलात. 

एकांताविषयी तुम्ही म्हणालात की एकांतात मी सर्वत्र विहार करू शकतो. कोणताच काळ मला अवरुध्द करू शकत नाही. कवीच्या कल्पनेने मी कुठेही जाऊ शकतो, काहीही पाहू शकतो. पोएट ग्रेसचे घरटे अशी पाटी असलेल्या असलेल्या घराच्या दारावर,"मी मोकळा आहे पण उपलब्ध नाही" असे लिहू शकणारे केवळ तुम्हीच असू शकता.

"गेले उकरून घर, नाही भिंतीना ओलावा; भर ओंजळी चांदणे करू पाचूचा गिलावा.",

 "आण लिंबोणी सावल्या, नाही आढ्याला छप्पर; वळचणीच्या धारांना लावू चंद्राची झालर " असे म्हणण्याची कुवतही तुमचीच.

तुमची कविता लेवून आली होती एक अप्रतिम शब्द कळा, जी केवळ तुमचीच असू शकत होती. वाचक त्या शब्दांच्या मोहात नाही पडला असे कधी झालेच नाही. पाउस, गाय, कावळे, सांज, कृष्ण ,निळाई ह्या तुमच्या कवितेत नेहमी आढळणाऱ्या संकल्पना.. हो संकल्पनाच. कारण त्या केवळ प्रतिमा म्हणून येत नाहीयेत तर स्वत:चे विश्व घेऊन अवतरतात.

ती गेली तेव्हा निनादत असणारा पाउस, दु:खाचा मंद सूर वाटणारा पाउस, कधीचा पडणारा, ताऱ्याच्या प्रहरापाशी कोसळणारा अशा अनेक रुपात पाउस तुम्हाला भिजवत होता व वाचकालाही तोच प्रत्यय देत होता. अनवट, नादमयी शब्दांचे एक भांडारच तुम्ही रसिकांना खुले करून दिलेत.

ती कविता समजण्याइतकी नव्हतीच आमची कुवत कधी आणि सुरुवातीला तुम्हीही कधी ती समजावून सांगायच्या भानगडीत पडला नाहीत. म्हणालात," मी काही माझ्या कवितेचा प्रियकर नाही.मी कशाला तिची पाठराखण करू? " त्या काळात तुमच्या कवितेतून वाचकांनी काही पारंपारिक अर्थ लावायचा प्रयत्नही केला. तरीही तुम्ही अलिप्तच. तसेही एकदा लिहून झाले की मग ते लेखन वाचकाचे. त्यांनी आपापल्या समज शक्तीच्या परीघानुसार तिचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा आणि मग मला कविता समजली म्हणून खुश व्हावे. कवीला त्याच्याशी काय देणेघेणे !!

 पण काळाच्या एका टप्प्यावर अचानक तुम्ही आपली अलिप्तता सोडून मुलाखती द्यायला लागलात, सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊ लागलात. आपल्या कवितेचा, एकमेवाद्वितीय अशा प्रतिमासृष्टीचा अर्थही सांगू पाहिलात. तुमचे अनुभव विश्व, त्यातील प्रतिमा, अस्सल भारतीय परंपरेतील रामायण आणि महाभारतातले संदर्भ एका वेगळ्याच दृष्टीकोनातून तुम्ही दाखवलेत. 

 " आईंची नेहमीची उदात्त महन्मंगल मातृत्वाची कल्पना मी मांडत नाहीये तर तिच्यातील आदिम मादीपण मी मांडतोय " असे तुम्हीच सांगितलेत. त्या अनुभवाने होरपळलेले बालपण एक भळभळती जखम होऊन तुमच्या कवितेत वाहात राहिले. तुम्ही ती जखम सतत नखलून कायम ठसठसत ठेवलीत. म्हणालात,"आईचे आदिम मादी रूप, बीजरुपातील मादीचे अव्यंग रूप, सृजन रूप हेच माझ्या काव्य व गद्य विश्वाचा कणा आहे. माझे सगळे कल्पनाविश्व त्याभोवती उभे केलेले आहे. तिचे मादीपण हा माझ्या अस्तित्वाला सर्पाने घातलेला विळखा आहे. "

 सतत जाणवत राहिले तेच तुमच्या कवितेत प्रगट होणाऱ्या भाव विश्वातही. तिच्या मनस्वीपणात आणि देहस्वीपणात तुम्ही होतात साक्षीदार .त्याची मुद्रा तुमच्या आयुष्यावर कायमची कोरली गेली होती. आईला, तुमच्या शब्दात सुमित्रा बाईला, म्हणालात,

"तुझा आला ग साजण, नको त्याच्यापुढे जाऊ,

त्याने यात्रेत भेटल्या कोण्या पोरीला दिले आभाळाचे बाहू, 

त्याला हात नाही वेडे.उभा अंधारी साजण..तिने जीव दिला तरी, त्याने वाहत्या पाण्याचे ..इथे आणले पैजण.." 

तुम्ही असेही म्हणालात की सुमित्रा बाईचा देहस्वीपणा तिच्या आतले आणि बाहेरचे गोंदण गाव जाणून घ्यायचे तर आत्मदिपाचा प्रकाश पाहिजे." आयुष्यावर उमटलेला आईच्या ठसा कसा आहे ह्या विषयी म्हणालात ," आज ती निवर्तल्यावरही, ह्या कधी वैराण तर कधी बहरलेल्या चंद्र माधवीच्या प्रदेशात मला तिच्या हाका ऐकू येतात...मी कुठेही जात नसताना, तिच्यापासून पळत नसताना ती मात्र माझा सुसाट पणे पाठलाग करते आहे."

एकदा वाचल्यावर तुमची कविता देखील नाही का वाचकाचा पाठलाग करत रहात? दर वाचनाबरोबर नव्याने उलगडत, झोंबत, कुरतडून टाकत आणि तरी मोहात जखडत ती वाचकावर गारूड करते. तुमची कविता आहे एक चांदणचकवा. परत परत वाचकाला स्वत:कडे खेचणारा, स्वत:पाशी बांधून ठेवणारा. तुमची कविता समजली आहे असा भास होतोही क्वचित कधी पण तो भासच.

 तुम्हीच म्हटले आहेत ना ,"कर्णाला ज्याप्रमाणे जन्मतःच कवचकुंडले मिळालेली होती, तशी माझ्या काव्याला जन्मतःच दुर्बोधतेची बेसरबिंदी टोचलेली आहे...माझी कविता जगता जगता वाढेल..तोच तिचा... वंश-वृक्ष!''

माझ्या कवितेशी थांबणार्‍या माझ्या रसिकाचे काय होत असेल? याची कल्पना मी करु शकत नाही. 'गाईच्या दुधाला आच दिली की साय धरणार' असे निर्मितीचे साधे कोष्टक घेऊन तो उभा रहात असावा..पण माझी प्रश्नचूर निर्मिती असल्या साध्या प्रश्नांची उत्तरे देतेच कोठे?,

ती म्हणुन टाकते--'चंदनाच्या झोपाळ्याला, इंधनाचे भय, वाघिणीच्या दुधावर आली कशी साय'... 

माझी कविता हे एक बेटच आहे, मी ही एक बेटच आहे...बेटावर माणसे सफरीसाठी येतात, किंवा समुद्र जिवावर उठला तर... माझ्या कवितेच्या बेटावर येणार्‍या काव्यरसिकाला परतीच्या बोटीची कुठलीही हमी मी देऊ शकत नाही...परतावेसे वाटले तर स्वतःच होडी झाले पाहिजे!'

स्वत:च्या कवितेविषयी अभिमानाने तुम्ही म्हणालात, ती मर्त्य मानवासाठी नाहीच.. ती आहे एखाद्या सुफी फकीराप्रमाणे विष देखील अमृतासारखे पिणाऱ्यासाठी.एखाद्या एकांत ताऱ्यासाठी. तुम्ही म्हणालात देखील एकदा,"कोण पाण्याला शिवतो, गूढ घावांचे अस्तर, नांगी पिळून विषाचे जसे काढावे अत्तर" "मी रसिकाच्या हातात देतो आहे एक ओल्या,जिवंत वेळूची बासरी.." स्वत:च्या कवितेच्या वंश वृक्षाविषयी बोलणारे तुम्ही म्हणता ,"माझ्या मृत्युनंतरची माझ्या कवितेची व्यवस्था मी केव्हाच करून ठेवली आहे.' घरभर सरणाचे पात्र सांडून जाई..फिरुनीफिरुनी माझा निर्वंश होई.'

तुमच्या कवितेसारखेच तुम्हीही समजायला अवघड. एकांत आवडणारे तुम्ही, माणूसघाणे नव्हतात. एकदा मैत्र जुळले की मग तुम्ही दिलखुलास गप्पा मारायचात. वेदनेच्या, दु:खाच्या कविता लिहिणारे तुम्ही प्रत्यक्षात किती जिंदादिल होतात ह्याचे वर्णन तुम्हाला भेटून येणारे लोक नेहमी करत रहातात. कशाचे तरी भय, झाकोळून टाकणारे भय वर्णन करणारे तुम्ही मृत्यूला कसे हसत, टेचात सामोरे गेलात ह्याचेही वर्णन आम्ही वाचले.

 " भयभारच देहाचा का? ते जादूचे परिमाण;

 लाजते सुरीची जात ठेविता तिच्यावर मान. "

 तुमचा मनस्वीपणा, झोकून देऊन एखादी गोष्ट करण्याची तुमची वृत्ती, अगदी खास ग्रेसची अशी.

मृगजळाचे बांधकाम करू शकण्याची शक्ती देखील खास तुमचीच.

स्वत:च्या अक्षरातली अर्पण पत्रिका ही तुमची खासियत.

 तुम्ही लिहिलेत,

" पण मला तर हे बांधकाम, तुझ्याच निर्मितिसत्त्वाचे शील म्हणून करणे भाग पडलेय ना ?

तेव्हा हे मृगजळाचे बांधकाम, मी तुलाच अर्पण करतोय.

अर्पण, तर्पण, समर्पण आणि दर्पण (ही) यांचे, 

या सर्वांचे काही वेगळे अर्थ, अनर्थ असतात काय? संभवतात का..य? "

आज तुमच्या स्मरणाचा उत्सव जागत असताना वाटते आहे ह्या लेखाचा शेवट कसा होईल? नाही..होणारच नाही खरे तर ह्या लेखाचा शेवट.. कारण तुम्ही होतात आणि तुमच्या कवितेच्या रुपात तुम्ही आहात आणि राहाल.

फोटो आंतरजालावरून साभार. 

-वृंदा टिळक 

-(ऋतुगंध -वसंत २०१२ )


महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...