Tuesday, 15 January 2013

झिणीझिणी वाजे बीन- ’वसंत”


ऋतु - कालचक्राचा, एक छोटासा तुकडा. निसर्गाच्या, हवामानाच्या बदलत्या रुपाचा प्रत्यय देणारा. हे बदल सजगपणे,रसिकतेने अनुभवायचे भाग्य मात्र शहरीकरणाने आपल्यापासून हिरावून घेतले आहे. सिंगापूरसारख्या, ऋतुना जणु कुणी ’स्टॅच्यु"केले असावे, अशा ठिकाणी रहाताना तर, ऋतुंचे बदल केवळ भिंतीवरच्या दिनदर्शिकेतच बघायला मिळतात. पण आपल्या आठवणीत मात्र हे सारे ऋतु अगदी तसेच टवटवीत असतात. .असेच हे स्मरणरंजन.

धुळवडीच्या दिवशी महानगरपालिका खास दुपारच्या वेळी पाणी सोडायची. मग त्या गार पाण्याने अंगावरचे रंग काढतानाही पाण्याचा थंडपणा जाणवायचा नाही, तेव्हाच लक्षात यायचे की उन्हाळा आलाय. होळीनंतरच्या दिवसात, कैरीच्या फ़ोडीना तिखट-मीठ लावुन खात खात, मस्त अभ्यास व्हायचा. सुट्टीचे बेत ही सुरु असायचे. त्या योजनांमधे येणारा परिक्षांचा बारिकसा अडथळा दुर झाला की मग मोकळे सुट्टीभर मजा करायला.

सरत्या फ़ाल्गुनातच चैत्राची चाहुल लागलेली असायची. रेशमी साड्या, कपडे उन्हे दाखवायला गच्चीवर जायचे. वाळवणांनाही सुरुवात व्हायची. कावळ्यांवर लक्ष ठेवायला वाळवणांशेजारी आम्हा मुलांची प्रतिष्ठापना व्हायची आणि आमचे सर्वात आवडते वाळवण असायचे डाळीच्या सांडग्यांचे. कारण लक्ष ठेवता ठेवता ते मनसोक्त खाता यायचे. वाळण्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची चव कशी लागते ह्याचा अभ्यास ही व्हायचा!!

 उन्हाळ्यात असायची भरपुर लग्ने आणि मुन्जी. ह्या समारंभाच्या निमित्ताने खुपदा बाहेर जाता यायचे, नवे कपडे घालायला मिळायचे आणि सतत पाहुणे येत रहायचे. त्या समारंभातही जेवण्याव्यतिरिक्त प्रत्यक्ष समारंभाशी आमचा संबंध तसा कमीच यायचा. कार्यालयांपेक्षा आम्हाला कार्यालयांची अंगणे आणि गच्चीच जास्त ओळखीची असायची.

 तेव्हा’ वसंत ऋतु’आम्हाला चैत्र / वैशाख -वसंत असे पाठ करण्यापुरता माहिती असायचा. पण प्रत्यक्ष आमच्या जिव्हाळ्याचा असायचा तो वसंत नाही तर उन्हाळ्याची सुट्टी! वसंताची महती माहिती होण्यासाठी, पुढे कित्येक उन्हाळे, पावसाळे जावे लागले! 

त्या दिवसातली एक खास गोष्ट म्हणजे रामाचे नवरात्र. गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत रामाच्या मंदिरात, ज्याला आमच्या गावी का कोणास ठाउक पण रामाचा मठ म्हणत असत, विविध कार्यक्रम चालत. पहाटे उठून रामाच्या मठात काकड आरती साठी जाताना कडुनिंबावरून वहात येणाऱ्या शीतल झुळका, दुपारचे मठातले सामुहिक जेवण, रात्रीची कथेकरी बुवांची प्रवचने, अगदी रात्री रामाची शेजारती आणि ह्या साऱ्या गोष्टी घडत असताना, पार्श्वभुमीवर वाजणारी कोकिळेची शीळ, सारेच भारून टाकणारे. रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी रात्री गावकऱ्यांनी बसवलेले नाटक असायचे. पुर्ण वर्षभर ज्याकडे डोळे लावून बसावे,असे हे दिवस असायचे हे निश्चित.

चैत्र गौरीची आरास, डाळ, पन्हे हे सर्वांच्या आवडीचे असायचे. त्या वेळी उत्सुकता असायची ती त्या दिवशीपर्यन्त मदन-बाणाची फ़ुले फ़ुलायला लागतील की नाही ह्याची. अशा चांगल्या चाललेल्या सुट्टीत, "परिक्षांचे निकाल" नावाचा भीषण खडखडाट यायचा, पण वर्षानुवर्षांच्या अनुभवाने त्यावर मात केली जायची. त्याच्या यातना कठीण सोसल्यानंतर बाजारात यायचे, ते रसराजेश्वर-आंबे. त्या आनंदापुढे आधीची सारी दु:खे कस्पटासमान वाटायची.

दुपारी आमरस-पुरीचे जेवण झालेले आहे. घरातील मोठी माणसे झोपलेली आहेत. बाहेर कडक उन्हाच्या झळा जाणवत आहेत. अशावेळी रंगायचा पत्त्यांचा डाव. खुप चुलत, आत्ते, मावस, मामे भावंडे एकत्र जमलेली असायची. लहान भावंडांना रॅगिंग करणे अगदी रीतसर चालू असायचे. विशेषत:"चॅलैंज"वा"नॉट at होम” सारखे खेळ चालू असतील तर मग त्या लहान भावंडांचे हाल विचारायलाच नकोत. ह्या साऱ्यांतून सुटका व्हायची, ती जेव्हा आई विळी समोर घेउन घागरीएवढे मोठे कलिंगड चिरायला बसायची तेव्हा. कलिंगडातला मधला लालेलाल भाग जिंकुन आम्ही इतक्या वेळ झालेल्या छळाचे उट्टे काढायचो!!

ह्याच सुमारास केव्हातरी लोणची घालण्याचा उत्सव साजरा व्हायचा. ते ही एक व्रतच असायचे! प्रत्येकाची कुल-देवता वेगळी. त्या प्रमाणे ह्या व्रतामधल्या काही टप्प्यांवर बदल आढळायचा. पण शेवटची प्रथा तीच.. आजु-बाजुला मुले उभी असतील. त्यांच्या ही हातावर दोन फोडी ठेवाव्यात. हे व्रत जे मनोभावे आचरतील, त्यांचे वर्ष खमंग जाईल, अशी फ़लश्रुती होती. कोण आज हे व्रत आचरणार आहे, त्याची माहिती आम्हाला असायचीच. त्या मुळे आमचा घोळका त्या घरी जायचा आणि आमचा दिवस सार्थकी लागायचा.

 त्या वैषाख झळांच्या दुपारी,मधेच कधीतरी ssssरे..ssगा sss र अशी हाक कानी यायची. अशी हाक कानी आली की सगळ्या घरातील सगळी मुले बाहेर येणार हे नक्कीच. असे बाहेरचे आणि ते ही गाडीवरचे खायला आम्हाला परवानगी नसायचीच, पण बाकी मुले कसा हट्ट करतायत आणि आइसप्रुट मिळवतायत हे पहाणे ही करमणूकीचे असायचे. एकतर आपल्याला खायला न मिळाल्याची खंत आणि आइस्प्रुट चा आकार, कित्येक वर्षे,"मीठी छुरी"म्हटल्यावर आइसप्रूटच डोळ्यांपूढे यायचे!!

मग त्या दु:खावर जणू चंदनाचा लेप असा, घरी पॉट आणून आइसक्रीम करायचा बेत ठरायचा. पॉट आणणे, खडेमीठ आणणे ह्या सगळ्या महत्वाच्या बाबी पुर्ण होईपर्यंत घरात आइसक्रीम साठीचे दुध आटवून गार करुन तयार असायचे. ह्या शुभ प्रसंगी स्नेही जनांची उपस्थिती अनिवार्यच. गच्चीवर एकीकडे गप्पा, गाणी ,जोक्स, कथाकथन असे चालू असायचे. आलटुन पालटुन प्रत्येकजण पॉट फ़िरवायला बसायचा. खुप सारा धीर धरल्यावर मग फळे रसाळ गोमटी खायला मिळायची!!!

अशी अनेक आंबट-गोड, थंड-उष्ण..वळणे घेत सुट्टी संपायची. येणार येणार म्हणुन जिची आतुरतेने वाट पाहिली, ती आली कधी आणि संपली कशी हे ही कळायचे नाही. हा कालावधी इतक्या झटकन संपायचा की "वसंत” हा साही ऋतुंमधील सर्वात लहान ऋतु आहे, अशी कित्येक वर्षे माझी ठाम समजुत होती.


वृंदा टिळक 

-ऋतुगंध वसंत २००९


महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...