Sunday, 25 October 2020

पावसाची आली सर

 ऋतुगंध वर्ष ९ अंक ३ 

पावसाची आली सर

पावसाची आली सर
घालूनिया कोडे
उत्तरांची वाढे झार
गुन्तवीत तिढे

येई सरीवर सर
पागोळ्या गळती
दाटलेली सांज होई
उनाड धरती

अशी कोसळता सर
मन अनावर
नभ उतरुनी डोळा
सांडे काठावर

बरसली अशी सर
गूढ चित्रलिपी
जन्मावरी गोंदलेली
प्राक्तनाची नक्षी

- वृंदा टिळक

शहाणीव

 

शहाणीव

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २

कोरिया 

 सध्याचे दिवस वैशाखवणव्याचे. काहिली होण्याचे. ह्या काहिलीत आधार वाटतो तो अमलताश -बहाव्याच्या पिवळ्या लटकघोसांचा आणि नक्षीदार झालरफुलांच्या ताम्हण वृक्षांचा. आमच्या घराकडे येणारा रस्ता तर दोन्ही बाजुंनी ताम्हणवृक्ष असणारा आणि ह्या दिवसात सुंदर दिसणारा. ताम्हण -महासोना -जारुल अनेक नावांनी ओळखले जाणारे हे सुंदर फूल महाराष्ट्राचे राज्य फूल आहे. असे म्हणतात की पद्म आणि नारद नामक दोन बुद्धांना ह्याच वृक्षाखाली ध्यान करताना ज्ञानप्राप्ती झाली होती.

ताम्हण 

इतके दिवस मला बुद्धाला ज्ञानप्राप्ती म्हटले की  एकाच एका बोधीवृक्षाची -अश्वत्थ वृक्षाची आठवण व्हायची. पण नुकतेच वाचनात आले की अठ्ठावीस बुद्धांना ज्या वृक्षांखाली ज्ञानप्राप्ती झाली ते वृक्ष वेगवेगळे होते. 

बुद्धाच्या तुलनेत आपली आयुष्ये अगदी क्षुद्र आणि आपल्याला होणारे साक्षात्कार देखील त्याच प्रमाणात छोटेसे. पण आपापल्या छोट्या आयुष्यात वेगवेगळ्या निमित्ताने साक्षात्कार होत असतात आणि शहाणपण देऊन जात असतात हे देखील खरेच.

वेगवेगळे प्रसंग, अनुभव, माणसे आपली शहाणीव वाढवत असतात. दंतकथा, आख्यायिका, इतिहास, संस्कार, वास्तव, भय आणि स्वप्ने ह्यांनी विणलेला एक घट्ट गोफ आपले सांस्कृतिक संचित बनलेला असतो. आपण आयुष्य जगतो, जगभर फिरतो, ह्या संचिताच्या नजरेतून विश्व पाहतो आणि नकळत आपली शहाणीव क्षणाकणाने वाढवत जातो.

संगमबूरी - कोरिया 

नुकतेच दक्षिण कोरियामधील जेजू बेटावरील संगमबुरी येथे गेलो होतो. आम्ही संगमबुरीला पोचलो तेव्हा आभाळ कसेबसे ढगांना आवरुन उभे होते. कधीही बांध ढासळेल आणि ढग अनावर होऊन कोसळू लागतील अशी स्थिती. थंड हवेमुळे तो झाकोळ देखील अगदी प्रसन्न वाटत होता. थोडा चढ चढून वर गेलो आणि एका अवर्णनीय दृश्याने मन वेधून घेतले. ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या विवराच्या कडेवर असलेले विस्तीर्ण पठार. त्याच्या बाजूला डोलणारे चमचमते गवताचे पिवळसर सोनेरी तुरे. मुरुमदगडांच्या लांबच लांब नागमोडी रांगा आणि एका बाजूला हिरवळीच्या विस्तारावर विखुरलेली स्मृतिस्थळे. ती स्मृतिस्थळे कोणाची? कधीची? काहीच कुठे उल्लेख नाही.

ती अज्ञात वीरांची स्मृतिस्थळे आणि वाईट शक्तीपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी उभारले गेलेले दगडी पुतळे आपल्याला शतकांचा प्रवास घडवतात पण मनात रुतून राहतो तो एका उंचवट्यावर असलेला, आकाशाच्या पार्श्वभूमीवर मान उंचावून बघत असलेला हरिणाचा पुतळा. पुतळा इतका जुना नाही पण त्या जागेचे गारुड आणि पुतळ्याच्या देहबोलीतून व्यक्त होणारी प्रतीक्षा आणि ओढ आपल्याला अनेक युगे मागे घेऊन जाते.

संगमबुरीची दंतकथा सांगते ती एक अनोखी प्रेमकहाणी. स्वर्गातील जेड सम्राटाची मुलगी मलजात आणि हानगम नावाचा एक तारा प्रेमात पडतात. सम्राटाला कळताच तो त्यांना स्वर्गातून हद्दपार करतो. ढगांच्या वाटेवरून वाऱ्याच्या साथीने ते दोघे येतात पृथ्वीवर संगमबुरीला. तेव्हाही जेजू बेट आणि संगमबुरी निसर्गसुंदर आणि स्वर्गाइतकेच रमणीय असणार. त्यांना ती जागा खूप आवडते, एकमेकांची हवीहवीशी साथ आणि रमणीय जागा .. काळ पंख लावून उडत असणार. इथेच खरे तर ह्या कथेचा सुखांत व्हायला हरकत नव्हती. पण .. 

त्यांची खाण्याची आवडनिवड आणि सवयी अगदी भिन्न. मलजात फक्त फळे आणि भाज्या खाणार तर हानगम फक्त प्राण्यांचे मास. खाण्याच्या भिन्न आवडींमुळे लवकरच त्यांच्यात भांडणे सुरु होतात. मलजात सांगते की मला तुझ्या अन्नाचा वास सहन होत नाही. आपण वेगळे राहू या. मलजात संगमबुरी सोडून जाते हानगम तिथेच राहतो.

संगमबूरी 

हरिणाचा पुतळा खरे तर त्या विभागात सापडणाऱ्या प्राण्यांचे प्रतीक म्हणून उभारलेला आहे पण ही गोष्ट ऐकल्यावर मला सारखे वाटत होते की एकमेकांसमवेत घालवलेले सुंदर दिवस आठवत ह्या जागेत हानगमने मलजातची वाट पाहिली असेल आणि ते सगळे सौंदर्य आणि वाट पाहणे त्या पुतळ्यात भिनले आहे. आजही तिथे कधी पाऊस, कधी धुके, कधी ढग तर कधी ऊन असेल सांगता येत नाही. स्थानिक लोक मानतात की हानगमचा मूड बिघडला की असे होते!!!

ह्या दंतकथेला अर्थाचे अनेक पदर आहेत. अगदी भिन्न प्रवृत्तीवर प्रथमदर्शनीच प्रेम जडणे आहे, त्या प्रेमाच्या कबुलीपाठोपाठ येणारी त्याबद्दलची शिक्षा विनातक्रार भोगणे आहे. सतत सोबत राहताना कंगोरे टोचायला लागल्यावर आधी जुळवून घ्यायची धडपड आहे आणि नंतर वैयक्तिक स्वातंत्र्य, प्रेमासाठी गहाण न ठेवता, वेगळे व्हायचा घेतलेला निर्णय आहे. माणसांनी माणसांपर्यंत पोचण्याच्या वाटा डोळ्यांदेखत नाहीश्या होणे आहे. त्या वाटा हरवतानाचा सोसलेला आकांत आहे. स्वप्न पाऱ्यासारखे निसटून जाणे आहे. साऱ्या आकांताच्या पार जात धारण केलेला खंबीरपणा आहे. अटळ एकांत आहे. 

अशा परीक्षेच्या, अवघड निर्णय घेण्याच्या वेळा प्रत्येकाच्याच आयुष्यात वळणावळणावर सामोऱ्या येतात. निर्णयाची जबाबदारी 'भोगणे' फार कमी जणांना जमते. अनेकदा परिणामांचे भय वाटून निर्णय घेणेच टाळले जाते आणि मग वाट्याला येतो तो चकवा. न घेतलेले निर्णय जर का घेतले असते तर? त्यांचे परिणाम काय झाले असते? अशा विचारांच्या चकव्यात माणूस गोल गोल फिरत राहतो.

गाठी पडूच नयेत अशी तरकीब शिकवणारा यार जुलाहे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. मग एकतर गाठी पडूच नयेत किंवा पडल्याच तर त्यांचीच सुंदर नक्षी बनवून टाकावी ही शहाणीव आपली आपल्यालाच मिळवावी लागते.

ती शहाणीव असतेच चकव्याच्या सीमारेषेवर तिष्ठत.  .. आपली वाट पाहत !


स्वगत - मन करा थोर


मानवी मनात भावनांचे अनेक तरंग उमटत असतात. कधी आसपासचा निसर्ग, माणसे, घटना, वस्तू ह्या कारण असतात तर कधी आठवणी!

हे तरंग शब्दांत उतरवता येतील का, ह्याचाच ध्यास प्रत्येक लिहू पाहणाऱ्याला असतो. कधी ते जमल्या सारखे वाटते, तर कधी शब्दांत उतरेपर्यंत भावनांनी वेगळेच वळण घेतलेले असते.

ह्या भावनांविषयी, त्या निमित्ताने स्वतःशी होणाऱ्या संवादाविषयी वृंदा टिळक लिहिणार आहेत, आपल्या 'स्वगत' ह्या सदरात! 

-----------------------------------------------------------

मन करा थोर !

काही वर्षांपूर्वी माझे एक घड्याळ हरवले. मी फार हळहळले. ती हळहळ केवळ ते घड्याळ सोन्याची डायल असलेले, मौल्यवान खडे जडवलेले होते म्हणूनच नव्हती, तर ते फार प्रेमाने, भेट म्हणून मिळालेले होते म्हणूनही होती. खूप वाईट वाटले. स्वतः ला वारंवार दोष दिला. नंतर कितीतरी दिवस दुसरी घड्याळे घालताना हरवलेल्या घड्याळाची आठवण, हळहळ, परत स्वतःला दोष असे चक्र चालूच राहिले. माझ्यासारख्या सामान्य माणसांची अशीच असते प्रतिक्रिया. 

हे तर झाले वस्तू हरवण्याबाबत. पण थोडक्यात ट्रेन वा बस चुकली तरी हळहळ वाटते. मन लगेच तोपर्यंत केलेली कोणती कृती केली नसती तर वेळ वाचला असता आणि ही ट्रेन मिळाली असती हा हिशेब करते. मग आठवतो शब्द, "मुदा ".

ती एक जपानी संकल्पना आहे . मुदा म्हणजे कुचकामी असणे, निरुपयोगी असणे, उधळपट्टी करणे. मोठाल्या कंपन्यात ही संकल्पना वापरून कुठे आपल्याला वेळ, संसाधने वाचवता येतील आणि फायदा वाढवता येईल ह्याचा विचार केला जातो. कुठे आणि कशी उधळपट्टी, नुकसान टाळता येईल ह्याची यादी मोठी आहेच. पण वैयक्तिक आयुष्यात मला त्यातील काही गोष्टी फारच महत्वाच्या वाटतात. त्या आहेत, unused skills, confusion आणि self doubt. 

माणसाचे मन आणि आयुष्य कुरतडणाऱ्या ह्या तिन्ही गोष्टी. किती आयुष्य, सकारात्मकता आणि उमदेपणा पाहता पाहता खाउन टाकतात. वेळोवेळी ह्या तिन्हींचा सामना करायला लागतोच. काही हरवले, आजारपण आले, प्रियजनांचा वियोग सहन करावा लागला की  ,"हे माझ्याच बाबतीत का? मीच का?" ही प्रतिक्रिया मनात उमटते. त्या विषयी एक चांगला विचार मध्यंतरी वाचनात आला की  तुझ्याच बाबतीत हे घडते कारण तू त्या दुःखावर,संकटावर मात करू शकतेस म्हणून! आपल्याबाबत "त्या" ला असा विश्वास वाटला ह्या विचाराने देखील अंगात खंबीरपणा येतो. मनोबल वाढते. संकटाशी दोन हात करायचे सामर्थ्य अंगी येते. 

काही जण दुःखावर मात करुन उभे राहतात. नुसते तेवढेच नाही, तर आत्मविश्वासाने त्या आपत्तीला एक सकारात्मक रुप देऊ शकतात. एक गोष्ट ऐकली होती.. साधारण अठराशे ऐंशीच्या काळातली. 

स्टॅनफर्ड विद्यापीठ 

एक साधे कपडे घातलेले प्रौढ जोडपे हार्वर्ड विद्यापीठात, अध्यक्षांच्या भेटीसाठी वाट पाहत बसले होते. खूप वेळ थांबल्यावर भेट झाली. ते अध्यक्षांना म्हणाले की आम्ही ह्या विद्यापीठासाठी, आमच्या मुलाच्या स्मरणार्थ काहीतरी करू इच्छितो. त्यांचे कपडे आणि एकूण अवतार पाहून अध्यक्ष त्यांना म्हणाले की तुम्ही काय करणार? विद्यापीठातील इमारती बांधायला आणि रोजचा कारभार चालवायला किती खर्च लागतो ह्याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? असे म्हणून त्यांनी खर्चाचा आकडा सांगितला. कथा पुढे असे सांगते की  आकडा ऐकल्यावर त्या बाई आपल्या नवऱ्याला म्हणाल्या,” एवढाच खर्च येत असेल तर मग आपण वेगळे विद्यापीठच स्थापन करू या ना! ” आणि स्टॅनफर्ड विद्यापीठाची स्थापना झाली.

ही कथा कपोलकल्पित असू शकते, बहुतेक आहेच. पण स्टॅनफर्डस दांपत्याने, टायफॉईडने गेलेल्या आपल्या मुलाच्या स्मरणार्थ, आठ हजार एकरांच्या भूखंडावर, स्टॅनफर्ड विद्यापीठाची स्थापना केली हे शंभर टक्के सत्य आहे.

आपला एकुलता एक मुलगा गेला म्हणून नुसते दुःख करत न बसता, सर्व मुले आपलीच आहेत असे समजून त्यांच्या शिक्षणाची सोय करणारे स्टॅनफर्ड दाम्पत्य unused skills, confusion आणि self doubt ह्या तिन्ही ‘मुदां’वर मात करताना दिसते! आत्मविश्वासाचे हे रुप अतीव आदराला पात्र असेच! मानवता आणि संस्कृतीवरचा विश्वास दृढ करणारे. आज स्टॅनफर्ड विद्यापीठ संशोधनाची, नव कल्पनांची, अनेक मातब्बर कंपन्यांची जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध झाले आहे. जग बदलणाऱ्या अनेक गोष्टी तिथल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत, करत आहेत. 

“त्या” ने आपल्या खंबीरपणावर ठेवलेला विश्वास सार्थ करत, परिस्थितीशी दोन हात करून, शिवाय इतरांच्या उपयोगी पडणारे अनेक जण आपल्याला आजूबाजूला दिसतात. डोळे उघडून पाहायला मात्र हवे. 

नेवासा 

स्वतःचे मन किती विशाल होऊ शकते, ह्याचे एक उदाहरण तर नतमस्तक करणारेच! लहानपणीच आईवडील गेल्याने आलेले पोरकेपण. आईवडील असतानाच काही कारणांनी सहन करायला लागणारा आत्यंतिक सामाजिक विरोध आणि बहिष्कार त्यांच्या मृत्यूनंतरही संपलेला नाहीच. तो तसाच आणि नेहमी सहन करायला लागला. वाट्याला सतत आली अवहेलना, उपेक्षा आणि तिरस्कार. कितीदा प्रायश्चित्त घेऊनसुद्धा समाज-मान्यता नाहीच.

अशा परिस्थितीत कोणीही कडवट, निराश, बंडखोर झाले असते. समाजाचा तिरस्कार करायला लागले असते; पण हे पाणीच वेगळे होते. त्यांनी स्थापना केली भक्तिमार्ग सांगणाऱ्या वारकरीसंप्रदायाची. शिकवले सगळ्यांना प्रेम करायला, सहृदय राहायला. शिकवले अद्वैत तत्त्वज्ञान. स्वतः ला आलेल्या अतोनात वाईट अनुभवांनंतरसुद्धा लिहिला तो अमृतानुभवच. संस्कृतातील गीतेचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना कळावे म्हणून प्राकृतात आणले.

पैसाचा खांब 

समाजाने दिलेले सगळे विष पचवून, समाजाला परत दिला तो अमृत कुंभ, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी! विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले अशी मनोवस्था असल्याने, स्वतःसाठी काही न मागता, 'त्या'च्याकडे मागितले काय तर, ”भूतां परस्परे मैत्र जडो” आणि “जो जे वांछील तो ते लाहो!” 

ज्ञानेश्वरांचे अवघे एकवीस वर्षांचे आयुष्य मला एखाद्या अद्भुत चमत्काराप्रमाणे वाटते. त्यांच्या आयुष्यातील पहिला भाग जणू सर्वसामान्यांना हे दाखवायलाच, की हालअपेष्टा कोणालाच चुकल्या नाहीत आणि दुसरा भाग ह्यासाठी की सर्व दुःखांवर मात करून मन बुद्धी किती विशाल होऊ शकते!

संपूर्ण विश्वाला जणू त्यांनी आपल्या कवेत घेतले. ज्ञान दिले ते देखील अत्यंत ऋजुतेने, कोमलपणे, प्रेमाने. उगीच नाही त्यांच्या नावापुढे ‘माउली’ हा शब्द जोडला जात! आकाशाच्या पार जातानाही त्यांनी वर्षाव केला तो कैवल्याच्या चांदण्याचा! शांतीचे, विश्वकल्याणाचे मागणे मागणारे ज्ञानेश्वर विश्वास दृढ करतात दुःखावर मात करता येण्याचा, मन विशाल करता येण्याचा!
( पूर्वप्रसिद्धी ऋतुगंध सिंगापूर )


नित्यकल्याणी

                         

घरातली बाग कितीही लहान असू दे, त्यातील झाडांची कामे कधी न संपणारी. गंमतीचा भाग असा की झाडे आवडणाऱ्या माणसांसाठी, ह्या कधी न संपणाऱ्या कामांचा भार न होता, दगदग न वाटता, ती कामे म्हणजे सुखनिधान होऊन जातात. जिवाचा विसावा होऊन जातात. रोज वाढणाऱ्या झाडांकडे पाहत राहणे, कळ्या कधी धरतात ,फुले कशी फुलतात ह्याकडे लक्ष ठेवणे हे दिवसातला महत्वाचा भाग बनून जाते.

सकाळी डोळे उघडताच मनात विचार येतो तो, आज कोणते फुल फुलणार आहे ह्याचा ! कधी कधी असे दिवस असतात की अनेक झाडे फुलांनी बहरत असतात, पण कधी असेही दिवस येतात की एकाही झाडाला फुल येणार नसते. आयुष्यातही नाही का कितीतरी वेळा अशा येऊन गेलेल्या असतात? अशावेळी देखील झाडांतला, त्या दिवसातला आणि एकूणच जगण्यातला उत्साह टिकवून ठेवणे ह्यालाच आयुष्य जगणे म्हणत असावेत बहुतेक! 

नित्यकल्याणी 

माझ्या छोट्याश्या बागेतले सदैव बहरणारे झाड म्हणजे सदाफुली. वर्षभर, कोणत्याही परिस्थितीत फुलत राहणारी सदाफुली. इतर भाषांतून ती सदाबहार, नयनतारा, नित्यकल्याणी ह्या नावांनी देखील ओळखली जाते. 

सदाफुलीचे रोप मी आणले होते माहेरच्या अंगणातल्या बागेतून, खास आईच्या सांगण्यावरून. म्हणूनही ते माझे फार लाडके. मी त्या रोपाचे गाव बदलले, त्याला प्रवासातले धक्के सहन करायला लागले. त्याला मातीत वाढायची सवय होती, त्याचे अमर्याद अवकाश मी कुंडीत बंदिस्त करून टाकले. नंतर इथे आणल्यावर देखील गावातल्या गावात घर बदलणे, कुंडी बदलणे असे सगळे बदल अगदी लीलया झेलत, ते झाड आजपर्यंत छान वाढत राहिले आहे. फुलत राहिले आहे. 

काही महिन्यांपूर्वी झाड वाढत वाढत फांद्या वेलासारख्या कुंडीच्या बाहेर झेपावयाला लागल्या. झाडांचे ते बाहेर विस्तारणे, पानाफुलांचे नैसर्गिक सुशोभन होणेदेखील फार लोभस होते. पण नंतर फांद्या जमिनीला टेकायला लागल्या. अगदी लोळायलाच लागल्या. मी विचार केला की जेव्हा फांद्यांना फुले आणि कळ्या नसतील तेव्हा खाली टेकणाऱ्या त्या फांद्या कापून टाकेन. म्हणजे मूळ झाड चांगले सशक्त होईल. 

कित्येक महिने असेच गेले, झाडाने मला त्याला कापायची संधी दिलीच नाही. कळ्या नाहीत, फुले नाहीत असा एकाही फांदीचा , एकही दिवस गेला नाही. अखेर मन कठोर करून एक दिवस जमिनीला टेकणाऱ्या फांद्या कापून टाकल्या. कळ्या, फुले असलेल्या फांद्या कापताना आणि नंतरदेखील फार अस्वस्थता आली होती. 

त्या कापलेल्या फांद्या दुसऱ्या एका कुंडीत खोचून ठेवल्या. आज जवळजवळ महिना होत आला तरी, अजूनदेखील त्या कुंडीत खोचलेल्या फांद्या फुलत आहेत. आपल्यातला जीवनरस कणाकणाने वापरत आहेत. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपला फुलण्याचा धर्म प्राणपणाने जपत आहेत, निभावत आहेत.

कुंडीतले मूळ झाड आपल्या फांद्या कापल्या गेल्या म्हणून मनात कष्टी झाले असेल का? त्याला दुःख झाले असेल का? झालेही असेल..कोणास ठाऊक? पण बाहेर मात्र त्या झाडाने तसे काहीच दिसू दिले नाही. त्या फांद्या नसण्याची कसर झाडाने अधिकच फुलून भरून काढली. फुलांचा आकार अधिक मोठा आणि झाडाची पाने अधिक तजेलदार दिसत होती.

एवढेच नाही, तर कुंडीत अजून बारकी बारकी रोपे देखील आली होती. फांद्या कापल्या गेल्याचे संकट झाडावर कोसळले, पण झाडाने, त्या संकटाने खचून न जाता, अतिशय सकारात्मकतेने संकटाकडे पाहिले. संकटाचा उपयोग स्वतःला अधिक मजबूत करण्यासाठी, रुजण्यासाठी करून घेतला. नित्य कल्याणाचाच विचार करणारी म्हणून ती नित्य कल्याणी असेल का?!! 

सदाफुली जमिनीवर लावताना, ती आक्रमकतेने वाढते, चिवट आहे हा धोका लक्षात घ्या, असे सांगितले जाते. कारण ती सर्वत्र पसरते. अगदी मानवजातीसारखेच वर्णन. आक्रमकतेने वाढणारी, इतर जीवसृष्टीवर आक्रमण करणारी, इतर जीवसृष्टीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करुन घेणारी अशी मानवजात!

हे वर्णन तर मानवजातीचे आणि सदाफुलीचे बरोबर जुळते, पण सकारात्मकतेने विचार करण्यात तेवढा माणूस सदाफुलीपेक्षा कमी पडतो. छोट्या/ मोठ्या संकटांनी निराश, हताश होऊन जातो. खचून जातो. नैराश्याने ग्रासलेली अनेक माणसे आपल्या आसपास आढळतात. ते नैराश्य संपूर्ण अस्तित्वावर बांडगुळासारखे वाढत जाते. त्याचा वचपा आपल्या परिघातील माणसांशी वाईट वागून काढावासा वाटतो. कोणी आपल्या भल्यासाठी काही सांगितले तरी ते ऐकावेसे वाटत नाही.. एकूणच संपूर्ण आयुष्य गढूळ होत जाते. असा एक माणूसही आसपासची अनेक आयुष्ये झाकोळून टाकायला पुरेसा असतो

आपल्याही आयुष्यात अशा नैराश्याच्या वेळा तर येऊन गेलेल्याच असतात. त्या त्या वेळी, माझे कोणी नाही, माझ्यासाठी कोणी नाही, आता जगण्याजोगे काहीच उरले नाही असे वाटून गेलेले असते. आपण खोल खोल बुडत आहोत आणि वर येता येत नाही, कोणीतरी खालीच दाबून ठेवते आहे असेही वाटलेले असते. अशा वेळी दुप्पट उत्साहाने उसळी मारून पाण्याच्या पृष्ठभागावर यायचे आहे ..आपले आपल्यालाच हे एकदा जाणवले आणि अंगी बाणवता आले की नैराश्य हरलेच समजा. हुरहुरत्या तिन्हीसांजेपासून शाश्वत पुनवेपर्यंतचा प्रवास आत्मबळावरच करावा लागतो. प्राणांवर नभ पांघरणारे प्रत्येकाच्या वाट्याला कसे कोणी येणार? 

घनदाट निबिड वन किर्र गातसे गाणी
कलतात सावल्या कुणी डहूळले पाणी
भयनादआवर्त गरगरे तमाच्या पैंजणी
स्मरणातील काहुर मनी कोरती लेणी ।।१।।

मौनात निमाले लागट बोचरे कोंब 
निवविते साधना जनीमनीचे डोंब 
स्वतःच सुज्ञशा स्वतःने पूर्ण होताना 
सरे हुरहूरी सांज, प्रकाशले चंद्रबिंब ।।२।।

किरणांसवे गुंफिली असली लाघव माया
कि पाण्यावर थरथरली गर्द धुकेरी छाया
होता चंद्र्स्पर्श सावल्यांना, उजळले पात्र 
विकसली मनी पुनवेची तृप्त शाश्वत रात्र ।।३।।

कल्याणाचा उत्साहपूर्ण, सकारात्मक. आशादायक विचार आणि कृती करणे, त्याच्या साहाय्याने नैराश्यावर मात करणे माणसालाही शक्य आहे. कोणालाही हानी न पोचवणारे कल्याण. कोणाचेही हक्क ओरबाडून न घेणारे कल्याण. मग माझ्या कल्याणापासून ते विश्वाच्या कल्याणापर्यंत पोचता येईलच.असे झाले की केवळ सदाफुलीचेच नव्हे तर मानवजातीचेही नाव नित्य कल्याणी ठेवता येईल!!
(पूर्वप्रसिद्धी - ऋतुगंध सिंगापूर )

Monday, 19 October 2020

राधा कमळ
बहिणी कडे ही फुले आणि ह्या ओळी उमलल्या!!
उमलले फूल,
पडली गं भूल
वेलीच्या कानांधले , 
जणू हलते डुलते डूल
- अंजली चितळे

मग आमच्याकडे ही कविता उमलली.

उमलले फूल
पडली ग भूल
वेलीच्या कानांत
हलले ग डूल
लालडी चुनरी
राधा ग ल्याली
वारियाने हाले
कशी सावरली?
बासरीचे सुर
उमटले दूर
मन ते आतूर
राधा बावरली
सूर ते गुंजले
तनात मनात
हलले ग डूल
राधेच्या कानात!!
भरला ग मोद
पूर्ण त्रिभुवनी
कान्हा तो मोहन
वसे ध्यानी मनी
- वृंदा टिळक.

त्यावरच्या बहिणीच्या ओळी! 

नाजूक माझी वेल,कसा सोसेल?
प्रीतीचा खेळ,बघ भांबावेल
ही कमलण माझी राधा
का तिज मदनाची बाधा?
सवंगडी तिचाही साधा,
नच लौकिक जगती शोधा
- अंजली चितळे.

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...