Tuesday, 26 March 2024
राधा
असे कुणी ना तेथे उरले
ज्याला न झाली रंगबाधा ||
ती ही रमली रंगी रंगली
रंगांच्याही पल्याड पोचली
आता निरंग झाली राधा ||
- वृंदा टिळक
Friday, 1 March 2024
शब्दरूप लेऊन फुलल्या - दर्पणी पाहता रुप ..
शब्दरूप लेऊन फुलल्या
मनातल्या मुक्या भावनांना शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत कविता लिहिली जाते. खरे तर लिहिलेल्या शब्दांच्या मधल्या अवकाशात कविता कितीतरी सांगत असते. या लेखमालिकेत आपण वाचणार आहोत, अशा कवितांविषयी. दोन शब्दांच्या मधल्या अवकाशाचा शोध घेण्याचा हा तोकडा प्रयत्न आहे.
—--------------------------------------------------
प्रसन्न वातावरण आहे. सुखाची चाहूल लागण्याची शुभचिन्हे दिसू लागली आहेत. वारा रुणझुणत वाहत आहे. अगदीच मंद वारा वाहिला असता तर कदाचित कळलेदेखील नसते. सोसाट्याचा वारा आला असता तर त्रेधा तिरपीट उडाली असती. पण आत्ता कसा तो अगदी रुणझुणत सुखकारक होईल असा वाहतो आहे. घन गरजत बरसत आयो रे मधला तडतडाट आत्ता ऐकू येत नाही आहे तर घन घुणघुणत आहेत. घुणघुणत ह्या शब्दाने आठवण होते ती गुणगुणत ह्या शब्दाची आणि लहान बाळाला रमवण्यासाठी खुळखुळा वापरतात त्याची देखील. इतकाच सुखद आहे आत्ता मेघांचा आवाज. पण माझं मन मात्र ह्या कशातच रमत नाही आहे. मला आता त्या भवतारक कान्हाची भेट लवकरात लवकर घडवून द्या.
चंद्र आणि चांदण्याचा शीतल प्रकाश कोणाला आवडत नाही? चाफ्याच्या सुवासाने मन कसे प्रसन्न होते. चंदनाची शीतलता तर काय वर्णावी ?!! त्याच्या नुसत्या सुवासाने देखील सुखशीतल वाटते. मग चंदन प्रत्यक्ष अंगाला लावल्यावर तर किती चांगले वाटेल. पण नाही ना... तो देवकीनंदन भेटला नाही त्यामुळे मला हे काहीच आवडत नाही आहे. चंदनाने तर मला चटके बसल्यासारखे वाटत आहेत. भेटवा हो लवकर मला तो वनमाळी.
कोमल, मुलायम, सुगंधी फुलांची शय्या तुम्ही माझ्यासाठी तयार केली आहेत. मला मात्र आपण आगीवर झोपलो आहोत असेच वाटते आहे. ही आग लवकर विझवाल का हो? मला रिझवण्यासाठी तुम्ही तुमच्या मधुर आवाजात गाणी म्हणता आहात. तुमचे गाणे ऐकून कोकिळा देखील आपला मधुर स्वर त्यात मिसळत आहे. पण थांबवा हे सारे. मला ह्या कशानेच आणि कशाचेच सुख वाटत नाही आहे. रूप, गंध, नाद, स्पर्श ह्या सर्वांना आणि ह्या सगळ्याने सुखावणारे काही नकोच आहे मला आता.
एरवी कशातच मन रमले नाही की दर्पणात स्वतःचे रूप पाहण्यात तरी मन मग्न होऊन जाते. पण आत्ता त्या दर्पणाचा मन शांत करण्यासाठी काहीच उपयोग नाही. उलट दर्पणात पाहून त्याच्या भेटीची आतुरता अजूनच वाढते आहे. कारण दर्पणात पाहिल्यावर मला माझे नाही तर त्याचेच प्रतिबिंब दिसते आहे. कोणी केली अशी जादू? हा चकवा कोणी लावला? मन परत परत फिरून फिरून त्याच्या भेटीकडेच का ओढले जाते आहे? त्या विठ्ठलाचेच आहे हे काम.
विरहिणींची राणी म्हणावी अशी ही अप्रतिम विराणी कोणी लिहिली आहे हे सांगायला देखील लागू नये अशी त्या सिध्दहस्त कवीची नाममुद्रा ह्या कवितेवर उमटलेली आहे.
शब्दांना उकार लावल्याने शब्द कसे लडिवाळ झाले आहेत पहा. कशाच्या तरी आधाराने, कशाला तरी धरून नुकतेच उभे राहू लागलेले गोंडस बाळ आपल्या पायाला धरून उभे राहावे आणि आपण प्रेमभराने त्याला उचलून कडेवर घ्यावे, तसे हे शब्द वाचताना वाटते.
ह्या लडिवाळ शब्दांना अजून मनमोहक करतो तो रचनेतला अनुप्रास. घन आहे तिथे कान्हा आहे, चंदन आहे तिथे देवकीनंदन आहे, चोळी, पोळी, वनमाळी आहे. वनमाळी देखील नुसते नाही तर कान्हो वनमाळी आहे.
कृष्णाचीच अनेक रूपे, अनेक नावे. माउलींनी म्हटलेच आहे, " अनंत रुपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी, बाप रखुमादेवीवरू खुण बाणली कैसी"
शब्दांचा अनुप्रास ही तर फार वरवरची खूण झाली. त्या शब्दांच्या अर्थातून ज्ञानेश्वर माउली जे सुचवत आहेत ते पूर्णपणे समजून घ्यायला हवे. उदाहरणच द्यायचे तर अगदी पहिल्या कडव्यात कान्हा आहे. जीवनात रमणारा कान्हा आहे. उत्पत्ती आणि स्थितीचे कारण असणारे असे हे रमणे आहे. म्हणूनच तो भवतारक आहे.
बाह्य संवेदनांपासून कवितेचा प्रवास आत्मभानापर्यंत पोचतो आहे असे वाटतानाच लक्षात येते की आता तर त्याही पलीकडे पोचणे आहे. अहंकाराचा पूर्ण लय झाला आहे. मी, माझा देह ही भावनाच नाहीशी झाली आहे. उरला आहे फक्त 'तो ' . 'असा मी' चा लय व्हायला अनेक जन्मांची साधना हवी, तेव्हा कुठे माझ्याजागी 'तो ' दिसणार आहे.
ही भावना माउलींनी अनेकवार वर्णन केली आहे. 'क्षेम देऊ गेले तंव .. मीचि मी एकली', ‘आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी' आणि अजून अनेकदा हे वर्णन आपण वाचतो. प्रत्येक वेळी तीच अनुभूती. श्रवण, कीर्तन, पादसेवन, स्मरण, अर्चन, वंदन, दास्य, सख्य ह्या सगळ्या पायऱ्या पार करून आत्मनिवेदनापर्यंत पोचणे ह्या शब्दांतून प्रतीत होते आहे.
ज्ञानेश्वरांचे शब्दभांडार अपरंपार होते. सहसा कोणीही कविता लिहिताना तेच तेच शब्द कवितेत घेणार नाही. एकाच अर्थाचे अनेक शब्द भाषेत सापडतात . ते कवितेत योजले जातात. पण इथे माउली वेगी भेटवा आणि पोळे हे दोनदा लिहितात आणि लक्षात येते ती विरहाची तीव्रता आणि भेटीची आतुरता. पं. हृदयनाथांचे संगीत आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांचा आवाज ह्या विराणीशी इतके एकरूप झाले आहेत की ही विराणी मनात येताच, ती चाल आणि तो स्वर ह्या सकटच आठवते.
गाणाऱ्यांसाठी तर हे गाणे म्हणजे अख्खे वर्कशॉप आहे. शब्द उच्चारावेत कसे, शब्दांतील भावना स्वरात व्यक्त कशी करावी त्याचा वस्तुपाठच जणू. घुणघुणा मधील पहिला घ ऐका, मेघांच्या आवाजाचा भास होतो की नाही?
ह्या लेखमालिकेच्या प्रस्तावनेत मी म्हटले आहे की दोन शब्दांमधील अवकाश शोधण्याचा हा तोकडा प्रयत्न आहे आणि ह्या वेळी ज्या कवितेविषयी, ज्ञानेश्वरांच्या विराणी विषयी लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे त्यातील शब्दांमधील अवकाश शोधण्यासाठी तर एक जन्म अपुराच...
—-------
घनु वाजे घुणघुणा ।
वारा वाजे रुणझुणा ।
भवतारकु हा कान्हा ।
वेगीं भेटवा कां ॥१॥
चांदवो चांदणें ।
चापेवो चंदनु । देवकी नंदनु ।
विण नावडे वो ॥२॥
चंदनाची चोळी ।
माझें सर्व अंग पोळी । कान्हो वनमाळी ।
वेगीं भेटवा कां ॥३॥
सुमनाची सेज । सीतळ वो निकी ।
पोळे आगिसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥
तुम्हीं गातसां सुस्वरें । ऐकोनि द्यावीं उत्तरें ।
कोकिळें वर्जावें तुम्हीं बाइयांनो ॥५॥
दर्पणीं पाहातां ।
रुप न दिसे वो आपुलें ।
बापरखुमादेविवर विठ्ठलें ।
मज ऐसें केलें ॥६॥
महाशिवरात्र - २०२६
महाशिवरात्र - २०२६ जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...
-
रहस्य - हस्तलिखित खलित्याचे सगळे वाटसरु उतरणार तर ह्याच धर्मशाळेत. त्यांचे गावच असे मोक्याच्या ठिकाणी होते. आधीच्या गावाहून निघून, डोंगर ओ...
-
इंकटोबर २०२२ चित्रे तर काढता येत नाहीत पण रोज दिलेल्या विषयावर काही लिहणे आवडेल. असे मनात आले तेव्हा ऑक्टोबर सुरु होऊन सात आठ दिवस होऊन गेल...
-
मी तेनु फिर मिलांगी.. अमृता प्रीतम प्रसिध्द पंजाबी लेखिका. कथा, कादंबरी, कविता सर्व प्रकारचे विपुल लेखन. त्यांचे साहित्य अनेक भाषांत अनुवाद...