Monday, 29 July 2013
फुरसत
Monday, 15 July 2013
"झिणीझिणी वाजे बीन"
.तप्त दुपार उतरत निवत चालली होती. एकामागून एक वेगवेगळ्या स्पर्धा चालू होत्या. शेजारी लाडकी लेक, हातात कॉफ़ीचा कप आणि समोर टी.व्ही.त जीव तोडून एशियन युथ गेम मधल्या विविध स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करणारे ऍथलेट्स. माणसाला आनंदात असायला अजून काय हवे??? सुखावून मी आरामात बसले आणि टी.व्ही.पाहू लागले.
गोळाफ़ेक, भालाफ़ेक, उंच उडी अशा कित्येक स्पर्धा होत होत्या. आपापले कौशल्य दाखवत प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठी, चांगल्यात चांगली कामगिरी करण्यासाठी धडपडणारी तरूणाई समोर दिसत होती. ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेची घो्षणा झाली. स्पर्धकांवर फिरता फिरता कॅमेरा भारताच्या स्पर्धकावर आला आणि माझ्याही नकळत मी ताठ बसून पाहू लागले. रवीकुमार-मध्यम बांधा, मवाळ चेहरा. जिंकण्याची इर्षा ना त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती ना हालचालीत.
मी मुलीला म्हटले, "नक्की ह्याचे वडिल उच्चपदस्थ सरकारी अधिकारी असणार आणि ह्याची वशिल्याने टीम मधे वर्णी लागलेली असणार. वाटतोय तरी का हा स्पर्धेत भाग घेणारा खेळाडू?"
सगळे स्पर्धक सज्ज झाले. इषारा होताच पळू लागले. आमचे सगळे लक्ष अर्थातच भारताच्या रवीकुमार वर लागले होते. सुरुवात तर त्याने एकदम जोषात केली. "अरे, इतक्या वेगात आत्ताच धावू नकोस...माहितीये ना ८०० मीटर ची स्पर्धा आहे. शेवटी दम रहायला हवा वेग वाढवायसाठी." सोफ़्यावर बसल्या बसल्या मी रवीकुमारला माझा मोलाचा सल्ला देत होते.
एक वर्तुळ धावून झाले. रवीकुमार पहिल्या पाचात होता. मी पुढे सरकून सोफ़्याच्या कडेवर येऊन टेकले होते. सर्वच खेळाडू आता जास्त वेगात धावत होते. सुरुवातीपासून प्रथम क्रमांकावर असणारा खेळाडू अजूनही अग्रभागीच होता. रवीकुमारच्या अगदी पाठोपाठ आता दुसरा एक स्पर्धक धावत होता. रवी कुमार आता पहिल्या तिघात आला होता.
स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली होती. शेवटचे २०० मीटर राहिले होते आणि रवीकुमारने आघाडी घेतली. रवीकुमार आता सर्वांच्या पुढे होता. त्याच्या मागचे खेळाडू ही शक्य तितक्या जास्तीत जास्त वेगात धावत होते. आता अगदी शेवटचे काही मीटर्स राहिले होते. लेकही लॅपटॉप मधले लक्ष काढून टी.व्ही.कडे बघत होती.
अचानक रवीकुमारच्या मागच्या स्पर्धकाने आपला वेग वाढवला. आता शेवटचे ५० मीटर राहिले असतील. आमचा श्वास रोखला गेला होता. रवीकुमार अजुनही सगळ्यांच्या पुढे धावत होता. निमिषार्धात मागच्या स्पर्धकाने रवीकुमारला गाठले. आता फिनिश लाईन पावलाच्या अंतरावर होती. दोघांचीही शरीरे एकाच लयीत पुढे झेपावली. दोघांचे पायही एकाच रेषेत पडत होते. फिनिश लाईन ओलांडली गेली तीही दोघांनीही बरोबरच. फिनिश लाईन ओलांडताच रवीकुमार खाली पडला.
काही काळ संभ्रम निर्माण झाला. कोण जिंकले कोणालाच कळले नाही. रिप्ले दाखवला गेला. त्यातही पाय अगदी एकाच रेषेत, एकाच वेळी पडताना दिसले. "आले असले दोघे बरोबर तरी नंतर रवीकुमार पडला ना...त्या मुळे त्या दुसऱ्या स्पर्धकाला विजयी घोषित करतील बघ. इतका अटीतटीचा सामना आहे आणि भारतीय खेळाडू सुदैवी ठरलाय असे कधी होतच नाही." नाराज होऊन मी बोलत राहिले. कोणा खेळाडूची चुकलेली लेन, कोणी अन्तिम टप्प्यात धडपडलेले आणि ऑलिम्पिकची हुकलेली पदके माझ्या डोळ्यांसमोर फ़ेर धरून नाचू लागली.
सुरवातीला आपण हा वशिल्याने टीम मधे आला असेल असे म्हटले होते त्याची शरम नंतर त्याच्या चांगल्या कामगिरीबद्दलच्या आनंदात बदलली होती. पण आता तो नाहीच जिंकत असे वाटल्यावर मन खोल खोल कोसळत होते. आनंद व्यथेत रुपांतरीत झाला होता.
"तो नसताच ना चांगला पळाला तर काही वाटले नसते..पण इतका वेळ सर्वांच्या पुढे पळत होता आणि शेवटच्या क्षणी असे व्हावे, ह्याला काय म्हणायचे?"
अंतिम निकाल कळायला लागणारा काही सेकंदाचा वेळही तासांसारखा वाटत होता. "जाउ दे..आणखी निराशा नको व्हायला. इथुन जावेच हे बरे". मी कप घेऊन आत जाण्यासाठी उठले आणि आता वळणार इतक्यात निकाल जाहीर झाला. रवी कुमार चक्क जिंकला होता!!!!!
दोघांचे पाय आणि शरीर एकाच रेषेत असले तरी, शेवटच्या क्षणी रवीकुमारचे डोके प्रतिस्पर्ध्यापेक्षा पुढे झुकलेले होते, ह्या निकषावर त्याला विजयी घोषित करण्यात आले होते. डोके इतके पुढे झुकवल्यामुळे तोल जाऊन रवीकुमार खाली पडला हे खरेच, पण तीच कृती त्याला सुवर्ण पदक देऊन गेली होती.
माझा आनंद आता खरोखरीच गगनात मावत नव्हता. काही कारण नसताना मारलेले ताशेरे अक्षरश:बुमरॅंग सारखे उलटून माझ्यावर आद्ळले होते आणि तरी मी खुष होते!!!
प्रयत्नांती आत्मसात केलेले कौशल्य, त्याला समय सुचकतेची मिळालेली साथ आणि नशिबाचे वरदान, अशी भाग्य-वर्षा वारंवार होत नाही हे खरे..पण कध्धीच होत नाही हे मात्र खरे नाही, हा आयुष्यभर पुरेल एवढा दिलासा ती कृतार्थ दुपार देऊन गेली होती.
-वृंदा टिळक.
- ऋतुगंध -२००९
महाशिवरात्र - २०२६
महाशिवरात्र - २०२६ जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...
-
रहस्य - हस्तलिखित खलित्याचे सगळे वाटसरु उतरणार तर ह्याच धर्मशाळेत. त्यांचे गावच असे मोक्याच्या ठिकाणी होते. आधीच्या गावाहून निघून, डोंगर ओ...
-
इंकटोबर २०२२ चित्रे तर काढता येत नाहीत पण रोज दिलेल्या विषयावर काही लिहणे आवडेल. असे मनात आले तेव्हा ऑक्टोबर सुरु होऊन सात आठ दिवस होऊन गेल...
-
मी तेनु फिर मिलांगी.. अमृता प्रीतम प्रसिध्द पंजाबी लेखिका. कथा, कादंबरी, कविता सर्व प्रकारचे विपुल लेखन. त्यांचे साहित्य अनेक भाषांत अनुवाद...