शब्दरूप लेऊन फुलल्या
मनातल्या मुक्या भावनांना शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत कविता लिहिली जाते. खरे तर लिहिलेल्या शब्दांच्या मधल्या अवकाशात कविता कितीतरी सांगत असते. या लेखमालिकेत आपण वाचणार आहोत, अशा कवितांविषयी. दोन शब्दांच्या मधल्या अवकाशाचा शोध घेण्याचा हा तोकडा प्रयत्न आहे.
—-----------------------------------------------------------------------------------
या ऋतुचक्रातला हा शेवटचा अंक आणि म्हणूनच हा या लेख मालिकेतील शेवटचा लेख देखील आहे. ह्या अंकाचा विषय आहे दिवा. त्या निमित्ताने इथे लिहू पहाते आहे, माझ्या एका आवडत्या कवितेविषयी. कवितेचे संपूर्ण आकलन होवो न होवो, ह्या कवितेने मनाला मोहवून टाकलेले आहे हे नक्की.
दिवे लागले रे, दिवे लागले रे,
तमाच्या तळाशी दिवे लागले;
दिठीच्या दिशा खोल तेजाळताना
कुणी जागले रे? कुणी जागले?
रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी
असे झाड पैलाड पान्हावले
तिथे मोकळा मी मला हुंगिताना
उरी गंध कल्लोळुनी फाकले…
उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा
कुणी देहयात्रेत या गुंतले?
आरक्त त्याच्या कृपेच्या कडा
अन् उष: सूक्त ओठात ओथंबले
कवी शंकर रामाणी
पहिल्या ओळीतच प्रकाशाची जाणीव आहे. पण हा प्रकाश कुठे उमलला आहे? तर तमाच्या तळाशी.. तम- अंधार. कोणता अंधार आहे हा? ह्या सृष्टीच्या आधीपासून असलेला असा अंधार? सृजनाच्या अनेक शक्यता दाखवणारा अंधार? अज्ञानाचे प्रतीक असणारा अंधार? दिठींच्या दिशा तेजाळत असताना ‘कुणी जागले’. कुणी म्हणजे कोण? हा प्रतिभाशक्तीचा संदर्भ आहे? अध्यात्मिक चेतनेचा संदर्भ आहे? पुढे शंकर रामाणी लिहितात,’रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी’. माणूस ह्या जगात येतो तो रित्या ओंजळीने आणि जातो ते ही रित्या ओंजळीनेच. पण इथे हा रितेपणा पुष्पवृष्टीने संपन्न झाला आहे आणि नुसती आत्ता झालेली पुष्पवृष्टी नाही तर असे करणारे एक संपूर्ण झाड पलीकडे वाट पाहते आहे.
शंकर रामाणी - कोणतीही काव्य वाचने, संमेलने, परिसंवाद, अध्यक्षीय भाषणे अशा कोणत्याही वाङ्मयीन व्यवहारात न गुंतलेला, काहीसा एकटा राहणारा कवी. त्यांच्या कोकणी आणि मराठी दोन्हीही कवितांना गोवा आणि महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले. त्यांची कविता अस्सल गोव्याच्या मातीतली. ती कविता बोरकरांच्या कवितेची तर आठवण करून देतेच पण त्यापेक्षाही जास्त आठवण आरती प्रभू आणि ग्रेस ह्यांच्या कवितेची आठवण करून देते.
संपूर्ण आयुष्यभर कविता ह्या एकाच साहित्यप्रकाराशी एकनिष्ठ राहिलेले कवी फार थोडे. जगण्याची धडपड, हलाखीची परिस्थिती, आयुष्यातील दुःख ह्या सगळ्यांतुन जात असतानाही शंकर रामाणी कविता लिहीत राहिले. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर त्यांना ‘ कविता यायची’ आणि मग ती कुठे येईल? कधी येईल? कशी येईल हे काहीच त्यांच्या हातात राहायचे नाही.
‘दिवे लागले रे दिवे लागले’ या कवितेविषयी बोलायचे तर त्यांना ती सुचली ती एका अतिशय अवघड वेळी. त्यांनी लिहिले आहे, ‘‘१५ जुलै १९७० हा तो दिवस. माझी(प्रथम) पत्नी खूप आजारी होती. तिला हार्टडिसीज तर होताच, पण काही नवीनच आजार उद्भवला होता. तिला खूपच त्रास होऊ लागला. ताबडतोब हॉस्पीटलमधे घेऊन जाण्यासाठी ऍम्ब्युुलन्स् आणायला आमचा शेजारी गेला. तेव्हा मी त्यांची वाटच पाहत बसलो होतो. आत बायको अक्षरश: तळमळत होती. वेदनांनी ओरडत होती. अत्यंत निराशेचा असा तो क्षण होता. आणि.. आणि मला कविता आली! आपोआप आली. त्याचा या घटनेशी संबंध असेल किंवा नसेलही. कुणाला ठाऊक? त्या ओळी मनातून निसटून जाऊ नयेत म्हणून हातात मिळालं त्या कागदाच्या चिरोट्यावर खरडली.’’
तीव्र वेदनेच्या वेळी सुचलेलं हे उषा सुक्त काहीसे अतर्क्य म्हणायला हवे. पण ही कविता केव्हा सुचली याविषयी त्यांच्याच शब्दात आपण वाचल्यावर मग देह यात्रा, रित्या ओंजळी, पैलाड, देहयात्रा या सगळ्याचा अर्थ लागत जातो. ओंजळीत जे काय आयुष्यभर मिळवले होते त्याचे समर्पण झाले आहे आणि ती ओंजळ वाहून टाकून आता रिती झाली आहे.
आयुष्याविषयी इतकी लख्ख जाणीव झाल्यावर कोणतेच पाश बांधून ठेवू शकत नाहीत आणि मग अवस्था ‘ उरी गंध कल्लोळुनी फाकले” अशी होते. शंकर रामाणी ह्यांच्या आणखी एका कवितेत त्यांनी लिहिले आहे,
“माझिया दारात चिमण्या आल्या
अबोल काहीसे बोलून गेल्या
कळले सारे नि कळले नाही
अबोध मनाची हासली जुई
दाटून दिशांत उतला गंध
झडली जाणीव गळले बंध
प्राणास फुटले अद्भुत पंख
तंद्री त भिनला आकाश डंख
माझिया दारात चिमण्या आल्या
आगळे वेगळे सांगून गेल्या”
ही ‘झडली जाणीव गळले बंध, प्राणास फुटले अद्भुत पंख’ ही अनुभूती त्यांच्या कवितातून वारंवार आपल्याला वाचायला मिळते आणि त्याचाच एक अविष्कार दिवे लागले रे मध्ये देखील पाहायला मिळतो.
मग पुन्हा आपण आधीच्या ओळी कडे जातो. ‘कुणी जागले रे कुणी जागले’. दुसऱ्या एका कवितेत शंकर रामाणी म्हणाले होते, ’ मला जन्मांधाला अवचित नेत्र फुटले’
ही ज्ञान प्राप्ती, जाणीव जागृती आपल्याला ‘ दिवे लागले रे’ या कवितेत देखील पाहायला मिळते.
रोमरोमातुनी चैत्रवाटा उभ्या राहताना म्हणजेच वसंताची, नवनिर्मितीची, फुलण्याची, पुन्हा बहरण्याची चाहूल लागताना ही देहयात्रा बांधून ठेवते आहे का? अपुरी पडते आहे का? जे गवसले आहे ते ह्या देहाच्या पार जाणारे आहे का?
‘ आरक्त त्याच्या कृपेच्या कडा’.. हा ‘तो’ कोण आहे? तो जगन्नियंता, सृष्टीकर्ता आहे? की कधी तुम्हाला झाकोळून टाकणारे तर कधी प्रकाशाने उजळून टाकणारे तुमचे मन आहे? की तुमच्या प्रतिभा शक्तीला हुंकार देणारा असा कोणी आहे? ‘उष:सूक्त ओठात ओथंबले’. इथे एका नव्या आशेने, एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होणे आहे. जणू आत्मसाक्षात्कार होण्याची ही घटना आहे. उष:सूक्त आपण वाचले तर लक्षात येते अत्यंत अवघड परिस्थितीतून सत्य आणि ज्ञानाच्या मदतीने मार्ग काढण्याची प्रेरणा देणारे असे हे सूक्त आहे. ( ऋग्वेद - ४-५१-५८). मग वाटून जाते शंकर रामाणींच्या आयुष्यात पत्नी अत्यवस्थ असल्याने आलेली उदासी आणि त्यातून आशेचा प्रकाश दाखवणारे हे काव्य म्हणून त्यांच्या उषासूक्ताचा संदर्भ आला असावा का? उषा सूक्ता मध्ये एके ठिकाणी म्हटले आहे की उषादेवीने कृपा करण्यासाठी काही भाग्यवान लोकांना जागृत केले आहे आणि बाकी अभागी अज्ञानी लोक मात्र अंधारामध्ये, त्याच्या अगदी काळ्याकुट्ट गाभ्यामध्ये तसेच निजून आहेत. इथे आपल्याला तमाच्या तळाशी दिवे लागण्याचा संदर्भ मिळतो.
ह्या कवितेशी माझा एक सुंदर अनुभव जोडला गेला आहे. अखिल भारतीय विज्ञान परिषदेचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन २०१६ मध्ये भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरमध्ये आयोजित केले गेले होते. अनेक थोर वैज्ञानिक उपस्थित होते. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे वैज्ञानिक उपस्थित असल्याने ते संमेलन तारांकित होते. संमेलनाला मी एक श्रोता म्हणून उपस्थित होते. संमेलनातील एका संध्याकाळी पद्मश्री पद्मजा फेणाणी ह्यांचा मंगलदीप हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. स्वतःच्या ह्या कार्यक्रमाचे त्या निवेदनही करतात. निवेदनात त्यांनी सांगितले की शंकर रामाणी ह्यांच्या ‘दिवे लागले रे’ ह्या गाण्याचे संगीत मला न्हाणीघरात सुचले आहे. असे सांगताना त्यांनी त्याचा संबंध ‘युरेका युरेका’ असे न्हाणीघरातून ओरडत येणाऱ्या आर्किमिडीजशी जोडला आणि नंतर गाणे संपल्यावर हे गाणे खरे तर एडिसनने म्हणायला पाहिजे होते अशी मिस्कील टिपणीही केली.
त्यांचे दिवे लागले रे हे गाणे देखील अतिशय रंगले. अक्षरशः तमाच्या तळाशी दिवे लागण्याचा अनुभव उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आला असेल. त्या क्षणी वाटून गेले की हे विलक्षण आहे. केवळ शब्दांचा आणि सुरांचा, संगीताचा अविष्कार नाही. त्या पल्याडची अनुभूती देणारे असे काहीतरी आहे.
‘दिवे लागले रे ‘ ही कविता माझी आवडती होतीच. ह्या अनुभवाने ती आणखी जवळची झाली.
कवितेच्या वाचनाच्या आणि आनंदाच्या अनेक चैत्रवाटा आपल्या सर्वांना लाभो ह्या शुभेच्छांसह हा लेख, ही लेखमालिका दोन्हींसाठी इथेच थांबते आहे.