Monday, 16 November 2020

 


आली आमच्या घरी दिवाळी- रोज एक पोस्ट- दिवाळीची गोष्ट ४

महाराष्ट्रातील दिवाळीचा एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक.  दिवाळी अंकांची १११ वर्षांची समृद्ध परंपरा . 

घराची दिवाळीसाठी साफसफाई सुरु करण्याच्याही आधी आणि दिवाळीचे बाकी प्लॅन्स करण्याच्याही अगोदर कोणत्या दिवाळी अंकात कोणाचे लेख आहेत ह्याच्या जाहिरातींकडे लक्ष ठेवले जाते. 

ह्या वर्षीच्या आव्हानात्मक परिस्थितीत देखील, निराश न होता दिवाळी अंक प्रकाशित झाले आणि ही १११ वर्षांची परंपरा निरंतर चालू राहिली. 

आत्ता माझ्याकडे ह्या फोटोतील सगळे अंक आहेत. चैत्रेय हे खरे तर वासंतिक आहे. पण तो गेल्याच महिन्यात माझ्यापर्यंत पोचला, तो देखील वाचायचा आहे. तसा रामनवमी ला ऑनलाईन प्रकाशित झाला तेव्हा वाचला होता. पण हार्ड कॉपी वाचण्याची मजा अनुभवायची आहे. 

चिकूpiku चा अंक मी चक्क माझ्यासाठी घेतला. तो साधारण ५-१० वर्षांच्या मुलांना तर आवडेलच पण मी त्यापेक्षा थोडीच मोठी असल्याने मलाही फार आवडला. निज शैशव जपणाऱ्या कोणालाही आवडेल असाच हा अंक आहे!!तो फॉन्ट, चित्रे , गोष्टी, कविता, वेगवेगळे खेळ.. अंक उघडला की  हरखून जायला होते. 

बाकी दिवाळी अंकातील ऋतुरंग हा अंक वाचायला सुरुवात केली आहे. "आम्ही तर कुठल्याही संकटाशी लढत राहू. रात्री नंतर पहाट पाहण्याची आम्हाला सवय आहे," असे सांगणारे अरुण शेवते लिखित संपादकीय, 'लढत ' विशेषांकाला साजेसेच आहे. 

आत्तापर्यंत धूप आने दो -गुलजार, धडपडीचे धडे - विनय सहस्रबुद्धे, माझे अवस्थांतर- संजय पवार, घुंगरांचा सन्मान -गुलाबबाई संगमनेरकर आणि मुंबई नि कोरोना - अंबरीश मिश्र हे लेख वाचून झाले. 

इतक्या उतार चढावांचे, अनिश्चिततेचे आयुष्य जागून सुद्धा आज ८८ व्या वर्षी गुलाबबाई संगमनेरकर म्हणतात," आज आयुष्यात मागे वळून बघताना मी आयुष्यात केलेल्या संघर्षांची बेरीज न करता जे काही चांगले झाले त्याची बेरीज करते आहे." 

फाळणीचे दुःख गुलजार ह्यांच्या लेखनातून वारंवार उमटत राहिले आहे. ह्या लेखात कोरोना मुळे  झालेल्या स्थलांतराच्या निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा फाळणीच्या वेळच्या स्थलांतराची आठवण झाली आहे.. घरात राहणे सक्तीचे, आलेले एकटेपण . "कधी कधी खूप कोंडमारा झाल्यावर वाटते कि समुद्र पाहून यावा, तो कोरडा तर पडला नसेल ना? मग त्याचं ते गिळू पाहणारं रूप तसाच आहे की नाही पाहून येऊ असेही वाटले." असे ते म्हणतात. आलेल्या संकटांची, समाजाने त्याच्याशी दिलेल्या  लढतीची, सकारात्मक प्रयत्नांची हकीकत सांगून ते म्हणतात, "मात्र मानवी आयुष्याची असुरक्षितता तीव्र झाली आहे. तिच्याशी आपल्याला एकत्र येऊन लढायचे आहे."

संजय पवार ह्यांचा माझे अवस्थांतर हा लेख फार वैशिष्ट्य पूर्ण. स्वतःच्या आयुष्याचे इतके बारकाईने विश्लेषण, त्या त्या वेळी घडलेल्या घटनांनी नेमके काय साधले, मनात आणि आयुष्यात घडलेल्या घडामोडी ह्यांचे  नेमके वर्णन वाचायला मिळते. त्या अवस्थांतराचे, केवळ एका व्यक्तिच्याच नव्हे तर त्या वेळच्या समाजकारणाचे पडसाद उमटलेले दिसतात.  भावना इतक्या नेमक्या, इतक्या मोजक्या शब्दात कशा लिहायच्या, प्रत्ययकारी वर्णन कसे असावे ह्याचा वस्तुपाठ असलेला हा लेख. 

 अंबरीश मिश्र ह्यांचा लेख आणि त्याचे नाव  'मुंबई नि  कोरोना' इतके  गद्य?? माझ्याप्रमाणेच तुम्हालाही क्षणभर वाटेल. पण लेख वाचायला सुरुवात कराल तर मात्र ..केवळ आ sss ह!! एखाद्या महानाट्याची नांदी असावी तसा  हा लेख.  मनातले अतिशय उत्कटतेने सांगणारा हा लेख. इथे खरे सांगणारा हा शब्दही योग्य नव्हेच. बहुतेक स्वत:शी बोलत आहेत ते. किती महत्वाच्या आणि अक्षरश: विराट मुद्द्यांना स्पर्श केला आहे त्यांनी! संदर्भ तरी किती विविध, त्यांच्या समृद्ध वाचनाची प्रचिती देणारे. त्या लेखाविषयी  लिहायला खरे तर अजून किती तरी लेख लिहायला हवेत. शेवटी ते म्हणतात, "तुम्हीही माझ्यासारखेच असाल तर कधीतरी भेट होईल. भेटलोच तर समुद्राच्या साक्षीने मुंबईची दृष्ट काढू."

विनय सहस्रबुद्धे ह्यांच्या धडपडीचे धडे ह्या लेखात त्यांच्या आयुष्यात आलेल्या दुविधा, त्याला सामोरे जाताना केलेली धडपड, त्याचे मनावर आणि जीवनावर झालेले परिणाम असे वाचायला मिळते.  विनय सहस्र्बुद्धे ह्यांनी स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याविषयी लिहिलेले मी तरी पहिल्यांदाच वाचले. मुख्यत्वाने आणीबाणीच्या कालखंडाविषयी हे लेखन आहे. ह्या लेखकाच्या लेखणीतून अजून बरेच वाचायची उत्सुकता निर्माण करणारा हा लेख आहे.

 त्यांनी त्यांच्या धडपडीतून मिळालेल्या 'खऱ्या कमाईच्या' तीन गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली म्हणजे अनिश्चितता पावलोपावली असतेच पण आपल्या कामामागचे 'अधिष्ठान' आपण लख्खपणे जाणत असू तर विचलित व्हायची वेळ येत नाही.  बाकीच्या दोन गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात वाचा!

 शेवटी ते म्हणतात की चांगल्याचा चांगुलपणा ठळकपणे पुढे येत नाही तोवर त्याच्या यशाची  शक्यताही वाढत नाही आणि चांगुलपणा यशस्वी झाला नाही तर त्यावरची स्वतः ची आणि इतरांची श्रद्धाही अबाधित राहू  शकत नाही. 

घरात इतके दिवाळी अंक वाचायला असल्याने तुळशीच्या लग्नापर्यंतही दिवाळी संपत नाही..नक्कीच!!!

माझे बाबा गोष्ट सांगायचे तेव्हा शेवटी असायचे ,"एक होते पोस्ट ..संपली आमची गोष्ट" इथे तर दिवाळीच्या गोष्टीच्या चार पोस्ट झाल्या!! ही दिवाळी आपल्या सगळ्यांसाठीच वेगळी होती. अस्वस्थ होती आणि तरीही दिवाळीने सर्वांच्या  मनात उत्साह जागवलाच. 

आपल्या घराखेरीज अजून किमान  एका तरी घरी दिवा लागेल हे आपण सगळ्यांनी आवर्जून पाहिले. आपल्या घरी फराळाचे करताना अजून कोणाला तरी तसेच घरात गोडधोड करता यावे ह्याची काळजी घेतली.  अवघ्यांनी मिळून सुपंथाकडे चालण्यासाठी जमेल तेवढ्या शक्तीने पाऊल पुढे टाकले. हा प्रकाश आपल्या सगळ्यांच्या मनात निरंतर उजळत राहो. ।। शुभं भवतु .. कल्याणमस्तु ।।





Sunday, 15 November 2020

 आली आमच्या घरी दिवाळी- रोज एक पोस्ट- दिवाळीची गोष्ट ३  

तुमचे जितके ग्रुप्स असतील त्या प्रमाणात तुम्हाला ऑरगॅनिक दिवाळी कशी साजरी करावी हा मेसेज आला असेल. नाही आलाय म्हणता? त्या मेसेज कम जोक चा सारांश असा कि बायकोने केलेला फराळ आयते बसून खा आणि तरी हा अमकी तमकी सारखा नाही झाला म्हणा ..की आपोआप घरबसल्या फटाके ..विना धूराचे .. 

तद्दन सेक्सिस्ट, पकाऊ जोक आहे. त्यावर तर निबंध लिहिण्याजोगा आहे. पण ते जाउ दे. आपला आजचा विषय तो नाही. 

हा जोक वाचला तेव्हा वाटले ठाण्यात म्हणतील ... तरी श्रद्धा किंवा अलकनंदासारखा नाही! आणि तरीही फटाके वाजणार नाहीत. कारण तिलाही मान्य असेल की ह्या दोन्ही ठिकाणचे पदार्थ उत्तमच असतात!! 

आता ठाणेकर नसलेल्याना श्रद्धा किंवा अलकनंदा कोण हे माहिती नसेल. त्यांच्यासाठी - श्रद्धा आणि अलकनंदा ही दोन ठाण्यातील अस्सल मराठी खाद्यपदार्थ मिळणारी दुकाने आहेत. भाजणी, कुरडया, मेतकूट,  तळणीच्या मिरच्या,पाचक इथपासून ते विविध मसाले, पुरणपोळ्या,गूळपोळ्या, ओल्या नारळाच्या करंज्या,उकडीचे मोदक असे सगळे पदार्थ उत्कृष्ट दर्जाचे जिथे मिळतात अशी दुकाने.( अनुभव हीच खात्री!! मी करून घेतलेली आहे अनेकदा!)  तिथे मिळणाऱ्या पदार्थांची यादी करायची तर मराठी खाद्यपदार्थांचीच यादी करावी लागेल. इतके पदार्थ तिथे मिळतात. काही पदार्थांसाठी आधी ऑर्डर द्यावी लागते, पण मिळते सगळे. 

विविध कारणांनी जेव्हा घरी करणे शक्य नसेल तेव्हा इथून पदार्थ आणावे आणि रसना तृप्त करावी. स्वच्छता आणि चवीची खात्री! तेल, तूप ओघळणारे पदार्थ, अजागळ बांधणीतले पदार्थ इथे दिसणार नाहीत. सगळे अगदी नीटनेटके. 

अजून अस्सल पणाचा  पुरावाच हवा असेल तर श्रद्धाचे माहिती नाही, पण अलकनंदा दुपारी बंद देखील असते!! हा गंमतीचा भाग सोडल्यास दोन्ही दुकाने माणुसकी जपणारी, सामाजिक बांधिलकी मानणारी दुकाने आहेत. काही सेवाभावी संस्थांच्या कामाच्या निमित्ताने हा अनुभव घेतलेला आहे. 

एक वैयक्तिक अनुभव सांगायचा  तर सिंगापूरला नेण्यासाठी बऱ्याच  पुरणपोळ्यांची ऑर्डर अलकनंदात दिलेली होती. त्यांनाही माहिती होते की हे सिंगापूरला पाठवायचे आहे. दुर्दैवाने त्यांचे जवळचे  नातेवाईक गेले त्या दिवशी म्हणून त्यांनी  दुकान बंद ठेवले . तर त्यांचा घरी फोन आला आणि म्हणाले  तुम्ही किती वाजता पोळ्या घ्यायला येणार ते सांगा, तेव्हा येऊन मी तुमच्यासाठी दुकान उघडून पोळ्या देतो आणि मग परत बंद करतो. त्यांनी दाखवलेली ही माणुसकी आणि बांधिलकी थक्क करणारी होती. 

आपल्याला आलेले चांगले अनुभव आपण सगळ्यांसोबत शेअर करत नाही, म्हणून हे मुद्दाम लिहिले!!तेव्हा ठाण्यात मराठी वळणाचे खाद्यपदार्थ खायचे तर आवर्जून श्रद्धा किंवा अलकनंदाला भेट द्या. घरी जाऊन निवांत खा. 

घरी जर का बरीच माणसे येणार असतील तर अलकनंदा ला केटरिंग ची ऑर्डर देता येते. तो अनुभव देखील उत्तम असाच आहे. ह्याखेरीज मी अनुभव घेतलेले आहेत वृंदावन केटरर्स चे वृषाली आणि वृंदावन गद्रे आणि मुक्तछंद चे सागर वामन संजीवनी. उत्तम स्वैपाक. तुम्ही सांगाल त्या स्पेसिफिकेशन्स सहित व्यवस्थितपणे घरी पोचणार. 

ह्या खेरीज स्वाद वाले कर्वे देखील केटरिंग ऑर्डर्स घेतात. मी खाल्लेला आहे त्यांच्या कडाचा स्वैपाकही. पण मी स्वतः मागवला मात्र नाही. 

तेव्हा इतके सगळे सांगितल्यावर आता फराळाचा फोटो हवाच ना!! तो मात्र सगळा मीच केलेला आहे. ह्या कोणाकडेही ह्याच्यापेक्षा चांगलाच मिळतो!!





Saturday, 14 November 2020

 


आली आमच्या घरी दिवाळी - रोज एक पोस्ट -दिवाळीची गोष्ट २



आज नरकचतुर्दशी! अभ्यंग स्नानाचा दिवस. 

ह्या फोटोत आहे, खादी नॅचरल चंदन मसाज ऑइल,  Amruta Ayurved Panchkarma Center चे आयुर्वेदिक सुगंधी उटणे आणि The Earthen Lather चा १०० % व्हीगन साबण






खादी नॅचरल चंदन, अप्रतिम सुगंध. ग्रामोदय आश्रमाची निर्मिती. प्रिय सखीने भेट दिलेले असल्याने त्याला मैत्रीचा सुगंध पण येतोच आहे. 

आयुर्वेदिक सुगंधी उटणे, अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर चे. अमृता आणि आनंद कुलकर्णी हे  तरुण उत्साही डॉक्टर्स आपल्या क्लिनिक सोबतच अशी  अनेक आयुर्वेदिक उत्पादने तयार करीत आहेत. 

वैशाली, चैतन्य ने भेट  दिलेले साबण १०० टक्के व्हीगन! The Earthen Lather च्या अनुराग आणि देविका चिटणीस ह्यांनी व्हीगन साबणांचे अनेक प्रकार तयार केले आहेत. त्या साबणाचे रूप इतके सुंदर आहे की  आधी त्यांचे मनसोक्त फोटो काढून ठेवले आहेत. आता आज साबणाचा शुभारंभ केला!! फोटोत हिरवा दिसणारा साबण Aloe Vera चा, त्यात मिंट पण असल्याने एकदम थंडा थंडा कुल कुल चा  अनुभव!!

आणि पाच वर्षांपूर्वी मुग्धाने स्वतः रंगवून दिलेल्या सुंदर पणत्या .. दर दिवाळीत वापरते! 

एरवी नेहमीसारखे सगळे चालू असले की आपल्याला काहीतरी बदल हवा असतो. हे वर्षच वेगळे होते, दिवाळी देखील वेगळीच. तर ती नेहमीसारखी आहे असे स्वतःला वाटायला लावण्याचे सगळे प्रयत्न आपण सगळेच करतो आहोत! असो. 

तर मी सांगत होते गोष्ट स्थानिक वस्तू वापरण्याची. तर त्यातले उटणे आणि साबण अगदी आमच्या ठाण्यातच तयार झालेला आहे हो!

तुम्ही सगळे पण नक्की तुमच्या परिसरात तयार होणाऱ्या वस्तू शोधत असाल. स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देत असाल ह्याची खात्री आहेच. अवघे धरु सुपंथ.. ठरलेच आहे आपले!!. 















 
#दिवाळी # शुभदिपावली # आत्मनिर्भरभारत #Local4Diwali # Diwali #ShubhDeepawali #AtmaNirbharBharat #HillViewPrestigeResidency #DiwaliSpirit #Happytimes #RojEkPost #DiwaliGosht # WeAreTogether #SilverVeganTravels 

Friday, 13 November 2020

 आली आमच्या घरी  दिवाळी  - रोज एक पोस्ट, दिवाळीची गोष्ट - १

           ।।श्री ।।

गोष्ट तुमच्या माझ्या इथली 

ठाण्याच्या  वडवली नगरातली 

 येऊन एकत्र  काही उत्साही तरुणांनी

शिकविले कंदील करणे स्वतः दाखवूनी 

 पाचवड पाडा   लोक करती कंदील तयार 

उचलले पाउल त्यांनी होण्या आत्मनिर्भर 

देण्या त्यांच्या कष्टाना  दिलखुलास दाद 

गृहसंकुलाने केला समोर मदतीचा हात 

जाणिले मनी  वचन कि एकमेका साह्य करू 

सुपंथ धरुनी आपण सारे सदैव पुढती सरू 

आले कंदील आणि लागले घरोघरी 

एकसारख्या कंदिलांची मौजच भारी 

वारियाने डुले  कंदील, फडके भगवा गर्वाने 

शुभ दीपावली, शुभ  चिंतू  सारे एक दिलाने 

पाचा उत्तरी सुफळ कहाणी साठा उत्तराची 

गोष्ट सौहार्दाची -सर्वसमावेशक दिवाळीची ।।






#दिवाळी # शुभदिपावली # आत्मनिर्भरभारत #Local4Diwali # Diwali #ShubhDeepawali #AtmaNirbharBharat #HillViewPrestigeResidency #DiwaliSpirit #Happytimes #RojEkPost #DiwaliGosht # WeAreTogether #SilverVeganTravels 


महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...