आली आमच्या घरी दिवाळी- रोज एक पोस्ट- दिवाळीची गोष्ट ३
तुमचे जितके ग्रुप्स असतील त्या प्रमाणात तुम्हाला ऑरगॅनिक दिवाळी कशी साजरी करावी हा मेसेज आला असेल. नाही आलाय म्हणता? त्या मेसेज कम जोक चा सारांश असा कि बायकोने केलेला फराळ आयते बसून खा आणि तरी हा अमकी तमकी सारखा नाही झाला म्हणा ..की आपोआप घरबसल्या फटाके ..विना धूराचे ..
तद्दन सेक्सिस्ट, पकाऊ जोक आहे. त्यावर तर निबंध लिहिण्याजोगा आहे. पण ते जाउ दे. आपला आजचा विषय तो नाही.
हा जोक वाचला तेव्हा वाटले ठाण्यात म्हणतील ... तरी श्रद्धा किंवा अलकनंदासारखा नाही! आणि तरीही फटाके वाजणार नाहीत. कारण तिलाही मान्य असेल की ह्या दोन्ही ठिकाणचे पदार्थ उत्तमच असतात!!
आता ठाणेकर नसलेल्याना श्रद्धा किंवा अलकनंदा कोण हे माहिती नसेल. त्यांच्यासाठी - श्रद्धा आणि अलकनंदा ही दोन ठाण्यातील अस्सल मराठी खाद्यपदार्थ मिळणारी दुकाने आहेत. भाजणी, कुरडया, मेतकूट, तळणीच्या मिरच्या,पाचक इथपासून ते विविध मसाले, पुरणपोळ्या,गूळपोळ्या, ओल्या नारळाच्या करंज्या,उकडीचे मोदक असे सगळे पदार्थ उत्कृष्ट दर्जाचे जिथे मिळतात अशी दुकाने.( अनुभव हीच खात्री!! मी करून घेतलेली आहे अनेकदा!) तिथे मिळणाऱ्या पदार्थांची यादी करायची तर मराठी खाद्यपदार्थांचीच यादी करावी लागेल. इतके पदार्थ तिथे मिळतात. काही पदार्थांसाठी आधी ऑर्डर द्यावी लागते, पण मिळते सगळे.
विविध कारणांनी जेव्हा घरी करणे शक्य नसेल तेव्हा इथून पदार्थ आणावे आणि रसना तृप्त करावी. स्वच्छता आणि चवीची खात्री! तेल, तूप ओघळणारे पदार्थ, अजागळ बांधणीतले पदार्थ इथे दिसणार नाहीत. सगळे अगदी नीटनेटके.
अजून अस्सल पणाचा पुरावाच हवा असेल तर श्रद्धाचे माहिती नाही, पण अलकनंदा दुपारी बंद देखील असते!! हा गंमतीचा भाग सोडल्यास दोन्ही दुकाने माणुसकी जपणारी, सामाजिक बांधिलकी मानणारी दुकाने आहेत. काही सेवाभावी संस्थांच्या कामाच्या निमित्ताने हा अनुभव घेतलेला आहे.
एक वैयक्तिक अनुभव सांगायचा तर सिंगापूरला नेण्यासाठी बऱ्याच पुरणपोळ्यांची ऑर्डर अलकनंदात दिलेली होती. त्यांनाही माहिती होते की हे सिंगापूरला पाठवायचे आहे. दुर्दैवाने त्यांचे जवळचे नातेवाईक गेले त्या दिवशी म्हणून त्यांनी दुकान बंद ठेवले . तर त्यांचा घरी फोन आला आणि म्हणाले तुम्ही किती वाजता पोळ्या घ्यायला येणार ते सांगा, तेव्हा येऊन मी तुमच्यासाठी दुकान उघडून पोळ्या देतो आणि मग परत बंद करतो. त्यांनी दाखवलेली ही माणुसकी आणि बांधिलकी थक्क करणारी होती.
आपल्याला आलेले चांगले अनुभव आपण सगळ्यांसोबत शेअर करत नाही, म्हणून हे मुद्दाम लिहिले!!तेव्हा ठाण्यात मराठी वळणाचे खाद्यपदार्थ खायचे तर आवर्जून श्रद्धा किंवा अलकनंदाला भेट द्या. घरी जाऊन निवांत खा.
घरी जर का बरीच माणसे येणार असतील तर अलकनंदा ला केटरिंग ची ऑर्डर देता येते. तो अनुभव देखील उत्तम असाच आहे. ह्याखेरीज मी अनुभव घेतलेले आहेत वृंदावन केटरर्स चे वृषाली आणि वृंदावन गद्रे आणि मुक्तछंद चे सागर वामन संजीवनी. उत्तम स्वैपाक. तुम्ही सांगाल त्या स्पेसिफिकेशन्स सहित व्यवस्थितपणे घरी पोचणार.
ह्या खेरीज स्वाद वाले कर्वे देखील केटरिंग ऑर्डर्स घेतात. मी खाल्लेला आहे त्यांच्या कडाचा स्वैपाकही. पण मी स्वतः मागवला मात्र नाही.
तेव्हा इतके सगळे सांगितल्यावर आता फराळाचा फोटो हवाच ना!! तो मात्र सगळा मीच केलेला आहे. ह्या कोणाकडेही ह्याच्यापेक्षा चांगलाच मिळतो!!

No comments:
Post a Comment