घोडबंदर रोडवरच्या किंवा खरे तर कोणत्याही रस्त्यावरच्या भरगच्च ट्रॅफिक मध्ये जीवाच्या करारावर, आडवे तिडवे, पुढे जाणारे बाईक स्वार दिसतात. माझाच जीव कासावीस होतो. ते सगळे आणि त्यांच्या आजूबाजूचे ही सुरक्षित राहोत प्रार्थना मनात उमटत राहते.
अशी डोळ्याचे पाते लवेल इतक्या वेळात, झपाट्याने, झटपट आपल्या घरात येणारी सुगी किती जणांच्या प्राणांची बाजी लावून येते आहे याचे भान आपल्याला आहे का?
मान्य आहे की कधीतरी असे होईल की तातडीने, पंधरा मिनिटात एखादी गोष्ट हवी असेल. पण अशी वेळ दोन-तीन वर्षातून एखाददा आली किंवा काही आणीबाणीची परिस्थिती उद्भवली असेल तेव्हा आली तर समजूच शकते.
नेहमीच कशी तुम्हाला डोळ्याचे पाते लावायच्या आत वस्तू मिळावी अशा सुविधेची गरज भासते? आपल्याला काय हवे आहे त्याचे पूर्व नियोजन करणे आवश्यक नाही का? त्याच सोबत मनात आले की वस्तू समोर हजर पाहिजे असे आपल्याला वाटत असेल तर मनालाही वळण लावायची पण गरज नाही का?
मी त्या दुचाकी स्वारांना अजिबात दोष देत नाही. त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न आहे तो. आपण सगळे सतत मागवत राहू, अशीच वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढत राहील आणि असेच प्राणांवर उदार होऊन ज्यांना पैशांची आवश्यकता आहे ते दुचाकी पळवत राहतील.
हे चित्र तुम्हाला अस्वस्थ करत नाही का?