बा.भ.बोरकरांची अतिशय अर्थपूर्ण, मधूर कविता, श्रीधर फडके यांचे संगीत दिग्दर्शन व आशा भोसले यांचा आवाज, सगळे कसे जमून आलेले आणि म्हणूनच हृदयाचा ठाव घेणारे. खुपदा संगीताच्या तालाने, आवाजाच्या माधुर्याने, ऐकणाऱ्याचे शब्दांकडे थोडे दुर्लक्ष होऊ शकते. पण ह्या गीताच्या बाबतीत मात्र असे होत नाही. शब्द आपले मन वेधून घेतातच घेतात.
कोणती बरं बीन वाजते आहे ती? आणि कोण वाजवते आहे? विचार करणाऱ्या प्रत्येकाला ह्याची उत्तरे आपापल्या मनोवृतीनुसार,अनुभवानुसार नक्कीच वेगवेगळी मिळणार. मिळालेली उत्तरेदेखील तीच कायम रहातील ह्याचीही शाश्वती नाही. क्वचित कधी काळाबरोबर उत्तरे बदलतही रहाणार.
हे आयुष्याचे तर वर्णन नव्हे? रोज नव्या रुपात सामोरे येणारे, रोज बदलत रहाणारे..आणि असे बदलत रहाणे हेच नैसर्गिक नव्हे का? निसर्गातही ऋतू बदलत असतात. झाडांची जीर्ण पाने गळून नवी पालवी येत असते. एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे दिसणारी नदी देखील दर क्षणाला नवनव्या जलबिंदूंनी युक्त असते.
माणूस मात्र सारे कळत असुनही, काहीच बदलू नये अशी मनोकामना करतो. बोरकरांनीच म्हटल्याप्रमाणे, पुण्याची मोजणी नसलेले, पापाची टोचणी नसलेले, गंगौघासारखे खळाळते, शुद्ध, निर्मळ असे वर्तमानात जगता येणे किती भाग्याचे.
कधी कधी आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा अर्थच लागेनासा होतो. हे का घडते आहे? कोणामुळे? कोणासाठी? ह्याचे परिणाम काय? काहीच कळेनासे होते. पण त्या त्या वेळी, घडणाऱ्या त्या त्या घटनांचे अर्थ न लागणे, ह्यातच मानवी जीवनाचे सारे रहस्य असते, हेच खरे.
कधी अर्थाविण सुभग तराणा म्हणताना बोरकरांना "अर्था" चा काही दुसरा अर्थ अभिप्रेत असू शकेल का? त्याही ’अर्था ’शिवाय काही नाही हे खरेच, पण तो”अर्थ ’म्हणजेच सारे काही नव्हे, हे ही तितकेच खरे. आपल्या प्रतिभेच्या जोरावर उदंड पैसा कमवून, तो उदारपणे सुस्थळी दानही करून, आपले आयुष्य अर्थपूर्ण करणारे पु.ल. व सुनीताबाई आपल्या पहाण्यात आहेतच ना. शहरात दवाखाना उघडून आयुष्य जसे ’अर्थ’पूर्ण झाले असते, त्या पेक्षाही वनवासी विभागात काम करून, आयुष्य जास्त ‘अर्थपूर्ण’ करणारे डॉ.अभय/राणी बंग, डॉ.प्रकाश/मंदा आमटे हे ही माहिती आहेत. त्या ’अर्था ’विणही सुभग असणारे आयुष्य असेच असेल का?
माणसाला कधी स्वत:तल्या, काही सकारात्मक घडवून आणू शकणाऱ्या शक्तीचा प्रत्यय येतो, तर कधी वेगाने उताराकडे जाणाऱ्याला रोखता न आल्यामूळॆ मन हताश होते. सारं काही संपले असे वाटायला लावणारा क्षण येतो आणि उलटूनही जातो, कायमची सल ठेवून. पण आयुष्य वहात रहाते.
काय करायचे आहे मला ह्या आयुष्यात?
देखणी ती पाउले, जी ध्यासपंथे चालती,
वाळवंटातूनी सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती.
मला तर वाळवंट नव्हे, मिळाली आहे चांगली हिरवळ. पण तरी तीतही एखादे तरी स्वस्तिपद्म, किंवा निदान त्याची सुरुवात करणे तरी शक्य होइल का मला? वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाता येईल का कधी मला?
हे सारे गुज ऐकणारा सखा कोण आहे? मनचे सारे ज्याच्यापाशी बोलावे, आणि ज्याने ते निर्विकल्प मनाने ऐकावे, समजून घ्यावे असा. पण जिथे द्वैत आहे तिथे असे होणे खरेच शक्य आहे?
मी कशाला गीत गाऊ, कोण आहे ऐकणारा,
मी कशाला दीप लावू, कोण आहे जागणारा?
असे जगताना कित्येकदा वाटून गेलेलेच नसते का? मग हे मनोभावे सांगणारे आणि ऐकणारे दोघे म्हणजे देह व आत्मा तर नव्हेत?
ही वीणा आहे ज्ञानदेवतेच्या, सरस्वतीच्या हातातले वाद्य. मग हे झिणी झिणी वाजणाऱ्या बीन चे वर्णन करताना, बोरकरांना कशाचे ज्ञान होणे, काही जाणून घेणे अभिप्रेत आहे का?
" काही शोधायचे नाही, सारे इथेच येणार " असे तेच तर म्हणाले होते ना? मग आता कशाची ही ज्ञानलालसा?
ह्या बीन मधून, सुरात तारा जुळवून, अत्यंत मधुर असा झिणीझिणी नाद करणारा कोण आहे ह्याचेच तर ते ज्ञान नव्हे? कोण आहे तो? सहजपणात प्रवीण असलेला? सारे करूनही स्वत:कडे किंचितसेही श्रेय न घेणारा? तो ’तो ’च तर नव्हे, ज्याचे वर्णन करताना वेदही मुके झाले असे बोरकरांनी म्हटले तो?
मला माहिती आहे, की खूप सारे प्रश्नच मांडले आहेत मी आपल्यासमोर. पण प्रश्नांची उत्तरे आपली आपण शोधणे ह्यातही एक आगळीच मजा आहे ना?
सुरुवातीला म्हटले तसे, बदल हा नैसर्गिकच आहे. अवघ्या दोन महिन्यात नवे ऋतूचक्र सुरू होईल. नव्याचे आगमन व्हायचे तर आधी जुन्याने संपणे महत्वाचे. त्या नुसारच संपेल, "झिणी झिणी वाजे बीन " हे सदरही.
नुकत्याच सुरू झालेल्या कॅलेंडर वर्षानिमित्त आणि अवघ्या दोन महिन्यात येणाऱ्या चैत्र शुद्ध प्रतिपदेनिमित्त आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा, अवघ्या आयुष्याचा आनंदसोहळा करू शकण्याचे मर्म सांगणाऱ्या बा.भ.बोरकरांच्याच कवितेसह.
वाहत्या पाण्याचे : पालापाचोळा ठरेना
घोर घावाचीहि रेघ चार पळेहि
दुःख वितळे उन्हात, सुख भिजे चांदण्यात
प्रेम गारवा होऊन दरवळे वागण्यांत
उरीं भेटल्याची कोठे तळीं साखर पाझरे
जातो तेथे भोवताली मळा मातून मोहरे
येते उदासता कधी ओल्या काळोखासारखी
मध्यरात्री तिची पण फुले नक्षत्रपालखी
-वृंदा टिळक
ऋतुगंध -शिशिर २००९
No comments:
Post a Comment