Saturday, 15 December 2012

ऋतुगंध शिशिर २००८ संपादकीय

स्नेहीजनहो नमस्कार,
ऋतुचक्रातला हा शेवटचा महिना.बोचऱ्या थंडीतून,गळणाऱ्या पानातुन वसंताकडे आशेने पहाणारा. अव्याहत चालणारे सृष्टीचक्र, अनंत काळापर्यन्त असेच चालत रहाणार आहे ह्याची ग्वाही देणारा.तत्कालीन संकटांनी खचुन न जाता,भविष्याकडे उमेदीने जाण्याची शिकवण देणारा.
मानवी आयुष्यासाठी हे ऋतुचक्र किती दिलासा देणारे आहे, नाही का? कितीही अवघड काळ आलेला असला, तरी तो लवकरच संपेल आणि मग येईल वसंत असे सोनेरी भविष्याचे स्वप्न दाखवणारे असे हे ऋतुचक्र.
सध्याच्या जागतिक मंदीच्या काळात निराश न होता, तग धरून रहाण्यासाठी,कडाक्याच्या थंडीतही चिकाटीने आला दिवस निभावून नेत, वसंताकडे वाटचाल करण्याची तयारी करणाऱ्या झाडांची जिजीविषा आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे.
ह्या संपादकीय समितीचाही हा शेवटचा अंक.ह्या वर्षभरात आपण अनेक नवी सदरे सुरू केली. यशस्वीरित्या वर्षभर चालवली.
समाज-जीवनाचे शिल्पकार ह्या सदरातून श्री.प्रफ़ुल्ल पेंढारकर ह्यांनी अनेक महनीय व्यक्तीमत्वांची अप्रकाशित बाजूही दाखवली.समर्थ समाजाच्या निर्मितीसाठी ह्या महान व्यक्तींचे कार्य आपल्याला प्रेरणादायी आहे, ह्यात शंकाच नाही..
डॉ रुपाली गोंधळेकर ह्यांनी ऋतुचर्या ह्या सदरातून ऋतुनुरूप आहारा-विहाराविषयी शास्त्रीय माहिती अगदी सोप्या शब्दांत आपल्या वाचकांसाठी दिली.
श्री.धनंजय बोरकर ह्यांनी केलेला काव्यानुवाद रसिकांची दाद मिळवून गेला..
अनेक मान्यवर लेखकांनी आपले साहित्य ऋतुगंध साठी पाठवले.आपल्या सभासदांनीही आपल्या लेखन कौशल्याचा प्रत्यय दिला.आपल्या बाल सभासदांनीही आपली चित्रकला प्रस्तुत केली.
पुर्णपणे लहान मुलांसाठी असलेला अंक, एका बालचित्रकाराने केलेल्या मुखपृष्ठासह प्रकाशित करण्याचा अभिनव उपक्रम आपण केला.
आपण सुरु केलेले मिसळ-पाव हे सदर लोकप्रिय झाले. वाचकांनी ह्या शैलीचे,ह्या कल्पनेचे उत्स्फ़ुर्त स्वागत केले. वाचकांना इब्लिसराव आपलासा वाटायला लागला. येणारे अनुभव इब्लिसरावांच्या भुमिकेतून कसे दिसतील,ह्याचे कल्पनाचित्र मनात उभे राहू लागले.श्री.अरुण मनोहर यांनी इब्लिसराव कोरियाला गेले तर, अशी कल्पना करून लिहिलेले "कोर्या रे"असाच आनंददायी वाचनानुभव देऊन जाते.
मराठी भाषा काळाच्या ओघात टिकेल का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो.पण महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्याही बाहेर चालणारे अनेक कार्यक्रम,उपक्रम, अशी शंका घेणे देखील चुकीचे आहे, हेच सिद्ध करतात, नाही का?
ऋतुगंध असाच एक अभिमानास्पद उपक्रम आहे.संपादकीय समितीतल्या आम्हा सर्वांना ह्या उपक्रमाचा एक भाग होता आले,ह्याचा अतिशय आनंद व अभिमान आहे.
आज,वर्षाच्या शेवटी,आपला निरोप घेताना, आपण दिलेल्या प्रतिसादाने,केलेल्या कौतुकाने,दाखवलेल्या आपुलकीने,संपादकीय समिती भारावून गेली आहे.
भविष्यातही ऋतुगंध वर आपण असेच प्रेमाचा अविरत वर्षाव करित रहाल,ही खात्री आहेच.
निरोपासाठी आज मनात आहेत,शांता शेळके ह्यांच्या ओळी,
 असेन मी,नसेन मी,तरी असेल गीत हे,
 फ़ुला-फ़ुलांत येथल्या,उद्या हसेल गीत हे!
शुभंभवतु॥
-वृंदा टिळक.
ऋतुगंध शिशिर २००८

No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...