Wednesday, 15 May 2013

"झिणीझिणी वाजे बीन"

 घरात बाळ येते ते बरोबर गाणे घेऊनच. बाळाच्या निमित्ताने प्रत्येक जण गुणगुणू लागतो. ह्यावेळी "झिणीझिणी वाजे बीन" मध्ये बाळाच्या आयुष्यात येणाऱ्या व बाळाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात येणाऱ्या काही गाण्यांविषयी.


 "बाळा जो जो रे " हे बहूतेक प्रत्येक बाळाने ऐकलेले पहिले गाणे असेल. ते देखील आजीच्या तोंडून. आई वर वेळ आलीच बाळाला झोपवण्याची तरी आईला तोपर्यंत " बाळा जो जो रे " म्हणणे झेपायला लागलेले नसते. ती आपली "निंबोणीच्या झाडामागे" किंवा "सुरमई अखियोंमे " म्हणून वेळ भागवून न्यायचा प्रयत्न करते. बाळाला खरोखरीच झोप आलेली असेल तर बाळ त्या गाण्यांनी झोपते देखील, पण नाहीतर, त्याच्या तोपर्यंत ओळखीच्या झालेल्या, "बाळा जो जो रे " च्या लयीसाठी अडून बसते!! मग शेवटी एकतर आजीला किंवा "बाळा जो जो रे" ह्या अंगाईला शरण जाण्यावाचून आईला पर्याय रहात नाही. [अर्थात लहानपणी बाळाला झोपवण्यात जेवढा वेळ घालवला नसेल, तेवढा वेळ बाळ मोठे झाल्यावर आई त्याला जागे करताना घालवते, हा भाग अलाहिदा!!]


केवळ आई आणि आजीच नाही, तर हळू हळू सारे घरच बाळाचे "आशिक " बनलेले असते. बाळाची प्रत्येक कॄती एक सोहळाच बनून जाते. बाळाला तेल लावणे, बाळाची अंघोळ सारे कसे ह्या आशिकांच्या घोळक्यात व्हायला लागते. बाळाला तेल लावताना, "डोल मैना डोलाची, हाती परडी फ़ुलाची" म्हणत आजी त्याला डोलवते. हाताच्या थोड्याशा आधारावर, पायात जोर येउ लागलेले बाळ रेटे देते, तेव्हा आजीचा चेहरा कौतूकाने उजळतो आणि बाजूला जमलेले प्रजाजन "काय हे अद्भूत" असे भाव चेहऱ्यावर वागवत खूश होतात.


मग येते अंघोळीची वेळ. बाळाच्या नाजूक टाळूवर आपल्या तळव्याचा आडोसा करून पाणी घालताना आजी "बाळाच्या डोक्यावर तो तो तो, बाळाची बायको योयोयो" असे गाणे म्हणते. बाळाची अंघोळ होईपर्यंत त्याचे अंथरूण सारखे करून ठेवू या, म्हणत त्याच्या पाळण्यातील गादी, दुपटे नीट करत असलेली आई आपल्याला अजून बाळाला सांभाळायला्च जमत नाहीये, तर त्याच्या बायकोला आपण कसे सांभाळणार असा विचार करत राहते. बाळाचे आवरताना, "अडगुले,मडगुले, सोन्याचे कडगुले, रुप्याचा वाळा, तान्ह्या बाळा तीट टिळा" हे गाणे मदतीला असतेच.


बाळ मोठे होत जाते, तसे स्वत:च्या नव्या सुरावटी तयार करते. आईला गाण्यातली बाकी घराणी ओळखता आली नाहीत तरी आपल्याच घराण्यातल्या ह्या सुरावटींचा अर्थ मात्र लग्गेच ओळखता येत असतो. कोणते सूर म्हणजे भूक लागली, कोणते सूर म्हणजे दुपटे बदलायची वेळ झाली हे ती अगदी तत्काळ सांगू शकते. अर्थात आता काही सुज्ञ माता बाळांना सतत डायपर वापरून, दुपटे ओले होण्याची वेळच येऊ देत नाहीत म्हणा..पर्यावरणाची हानी होताना येणारा करूण सूर बहुधा त्यांना ओळखू येत नसावा.


बाळाला भरवताना "हा घास चिउचा, हा घास काऊचा" असे धृपद घालून तमाम ओळखीच्या व्यक्ती आणि वस्तूंच्या नावे घास देऊन आणि गाणी म्हणून होतात! शिवाय बाळाने ताटलीवर, वाटीवर हात मारू नये, म्हणून त्याच वेळी त्याला "इथे इथे बैस रे मोरा, बाळ घाली चारा, चारा खा, पाणी पी, बाळाच्या डोक्यावरून भूर्रकन उडून जा" म्हणून त्याचे हात गुंतवून ठेवायची शक्कल पण लढवली जाते. ’जशा चाणाक्ष आया, तशीच चाणाक्ष मूले ’, ही नसलेली म्हण बाळ ”भुर्रकन " म्हणताना डोक्यावर नेलेले हात खाली आणताना, ताटलीवर मारून सिद्ध करतेच!!


बाळाला, "तळहात, मळहात, मनगट, कोपर, खांदा, गळागूटी, हनुवटी, भाताचे बोळके, वासाचे नळके, काजळाच्या डब्या, देवाजीचा पाट, देवाजीच्या पाटावर चिमण्यांचा किलबिलाट " हे गाणे म्हणून एकेक अवयव दाखवायला शिकवताना, बाळाने खरोखरच हात, खांदा, तोंड, नाक, डोळे, कपाळ, डोके दाखवायला सुरूवात केली, की आईला प्रेमाचे एकदम भरतेच येते. पूर्ण जगात आपल्या बाळाएवढे हुश्शार कोणीच नाही, अशी त्या क्षणी तिची खात्रीच पटलेली असते. इतके छान गाणे लिहणाऱ्या, कपाळाला देवाजीचा पाट म्हणणाऱ्या कवीने, बाळाच्या गोबऱ्या गोंडस गालांसाठी काहीच का लिहिले नसेल असा प्रश्नही तिला पडतो.


बाळ उभे रहायला लागले, की "बाळ उभे राहिले,कोणी नाही पाहिले" हे गाणे म्हणून सर्वांना पहायला बोलवण्याची योजकता तर महानच! बाळ उभे तर रहायला शिकते, पण अजून उभे राहून झाल्यावर बसायचे कसे हे मात्र त्याला यायला लागलेले नसते. मग तो इवला जीव बावरतो, गांगरतो. उभे राहून राहून पाय दुखल्यावर, मग तो गब्दुल देह, बुद्कन खाली पडतो. लागलेले तर असतेच शिवाय भितीही वाटलेली असते. आईला समजते, बाळाच्या मनात काय आहे ते. पण आत्ताच ह्याची भिती घालवायला हवी, नाहीतर हा कायम भित्राच राहील, एवढे मानसशास्त्र तिलाही अवगत असते. मग बाळाच्या पडण्याकडे जास्त लक्ष न देता, बाळाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, ती "हात रे, कोणी आमच्या बाळाला लागवले. तो बघ उंदीर पळाला!” ह्या ओळींचा आधार घेते. आता नव्या पिढीतल्या आया अशावेळी "उन्दीर पळाला" हे पुरातन गाणेच म्हणतात की, "कोंबडी पळाली" असे नवे गाणे म्हणतात ह्या विषयी संशोधन व्हायला हवे!!


जिला छोटे बाळ आहे त्या आईला दिवस उगवतो कसा आणि मावळतो कसा हे बाळाच्या वेळापत्रकावरूनच कळते, इतकी ती बाळात गुरफटलेली असते. पण दिवस थोडीच थांबून रहातात. बाळ झपाट्याने मोठे होत असते. आता खूप शब्द बोलता यायला लागलेले असतात. स्वत:च्या मागण्या शब्दात सांगता यायला लागतात. मग बाळाला शिकवायसाठी सारेच जण पुढे सरसावतात. एक, दोन, वन, टू, जानेवारी, फ़ेब्रुवारी, चैत्र, वैशाख सगळे बाळाला शिकवले जाते. रोज बाळाला कडेवर घेऊन म्हटलेले पसायदान, बाळाचेही पाठ होऊन जाते.


आपले होकार, नकार, मागण्या, निषेध शब्दांच्या भाषेत सांगता येणाऱ्या, उभे रहाणे, बसणे, उंच ठिकाणी चढता येणे, पळणे अशा सर्व हालचाली करता यायला लागलेल्या बाळाला आता स्वतंत्र व्यक्तिमत्व प्राप्त झालेले असते. काठीचा घोडा करून घरात दुडकत दुडकत फ़िरत, "अबडक खबडक घोडोबा, घोड्यावर बसले लाडोबा, लाडोबाचे लाड करते कोण? आजी, आजोबा, मावश्या दोन" हे गाणे म्हणत खिदळणाऱ्या बाळाकडे बघताना, मनात खूप आनंद होत असतानाही, डोळे का भरून येतात, ते आईचे आईलाच माहिती.

-वृंदा टिळक. 

(ऋतुगंध -२००९)


No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...