ग्रीष्म झळा?? छे..छे..प्रीतीचा चंदन वाळा...
ज्येष्ठ आणि आषाढ हे दोन महिने, स्मरण दोन महाकाव्यांचे.
ही दोन महाकाव्ये म्हणजे जणू प्रेमाची दोन रुपेच.
एकात प्रेमामूळे कर्तव्य भावना उजळून निघाली,
तर दुसऱ्यात प्रेमामूळे कर्तव्यात कुचराई झाली.
पण दोन्हीमुळे मनावर ठसली ती प्रेमाची महती.
ती होती ती होती एक राजकन्या, उपवर, सुस्वरूप, गुणवान,.
सहचराच्या निवडीचे स्वातंत्र्य असणारी.
जबाबदारीने ते स्वातंत्र्य पेलू शकणारी.
निवडला तिने एक गुणवान राजपुत्र.
ती एक राजकन्या, तो एक राजपुत्र.
पण...पण ती राजकन्या होती एका वैभवशाली देशाची,
तर तो होता हद्दपार राजपुत्र एका गमावलेल्या राज्याचा.
त्याच्याकडे गुण, चारित्र्य सारे काही होते, नव्हते फ़क्त राज्य.
आप्तांनी केलाही, निष्फळ प्रयत्न राजकन्येचे मन वळविण्याचा.
पण पक्का होता निर्धार राजकन्येचा.
वरीन तर ह्यालाच, नाहीतर मग विवाहच नको.
तिच्या प्रेमापुढे, जिद्दीपुढे झुकावेच लागले साऱ्यांना.
झाला त्यांचा विवाह.
महालातल्या ऐषोआरामांचा त्याग करून ती वनातही रमली.
दृष्टीहीन सासू-सासऱ्यांची सेवा, घरातली कामे करू लागली.
प्रेमापुढे त्या कष्टांची तिला तमा नाही वाटली
चेतविली सहचरात आकांक्षा तिने विजय प्राप्तीची,
जागी केली त्याची ईर्षा गमावलेले राज्य परत मिळवण्याची.
जिद्दीने केला तिने साक्षात यमाचाही पाठपुरावा.
सहचराचे केवळ प्राणच नाही तर सन्मानही परत मिळवला.
परिस्थिती पुढे झुकणारी नव्हे, तर परिस्थिती बदलवणारी,
ठरली ती दोन्ही कुळांना तारणारी.
पतीचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देणारी.
शतकानुशतके गायिली जातेय गाथा तिच्या प्रेमाची, निष्ठेची, जिद्दीची.
पतीवरच्या प्रेमाने उजळलेल्या तिच्या कर्तव्यभावनेची.
...
आषाढाचा पहिला दिवस
न चुकता होणारी त्याची आठवण.
कोण होता तो?
.
पत्नीच्या प्रेमपाशात तो रममाण,
अष्टौप्रहर तिचाच ध्यास, तिचेच गुणगान,
आणायची होती पुजेसाठी कमळे त्याला मानसरोवरातून
पण प्रियेच्या स्मरणात मग्न तो, गेला कर्तव्य विसरून
कुबेर झाला क्रोधाविष्ट, दिली त्याला शिक्षा कठोर
अलकापूरीहून केली त्याची रवानगी थेट रामगिरीवर.
विरहाने तो कृश झाला, प्रियेच्या आठवणीने तळमळला.
मेघही त्याला दूत भासला, संदेश पाठवण्या प्रियेला.
कालिदासाच्या लेखणीतून उतरली साक्षात प्रेमभावना
विरहाग्नीतून उजळून अधिक तीव्र,अधिक शुद्ध झालेली
एका कर्तव्यच्युत हद्दपार गुन्हेगारालाही,अजरामर करणारी.
...
No comments:
Post a Comment